शिवसेनेची भूमिका ३० रोजी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:04 AM2019-03-27T11:04:55+5:302019-03-27T11:05:12+5:30

गुलाबराव पाटील : भाजपा केवळ लोकसभेसाठी युती करत असल्याने कार्यकर्ते नाराज

The role of Shiv Sena will be on 30th | शिवसेनेची भूमिका ३० रोजी ठरणार

शिवसेनेची भूमिका ३० रोजी ठरणार

Next
ठळक मुद्देशिवसेना-भाजपाला एकमेकांची गरज - गिरीश महाजन



जळगाव: शिवसेना व भाजपा केंद्रात व राज्यात जरी एकमेकांसोबत राहीली असली तरी इतर निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांविरोधातच राहिले. त्यामुळे शिवसैनिकांचे भाजपासंदर्भात काही दुखणे असून, त्यांची बाजू पक्षाकडून ऐकली जाणार आहे. यासाठी ३० मार्च रोजी शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान खान्देशातील चारही मतदार संघात युतीमध्ये कुरबुरी सुरूच असून भाजपाकडून सेनेच्या पदाधिकारी, शिवसैनिकांची मनधरणी सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुने वाद विसरून एकत्र येवून काम करावे यासाठी भाजपाकडून शिवसेनेचे नेते व पदाधिकाऱ्यांची दिलजमाई करण्यासाठी मंगळवारी शहरातील एका हॉटेल मध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या भाजपा-शिवसेना नेत्यांच्या संयुक्तीक पत्रकार परिषदेत गुलाबराव पाटील बोलत होते.
या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार चंदूलाल पटेल, उन्मेष पाटील, शिवसेनेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, भाजपा आमदार सुरेश भोळे, जळगाव लोकसभा मतदार संघाच्या भाजपाच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, विभाग सहसंघटक किशोर काळकर, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, मनपा स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, आरपीआयचे रमेश मकासरे, आनंद खरात, आनंद बाविस्कर आदी उपस्थित होते.
शिवसेना-भाजपाला एकमेकांची गरज - गिरीश महाजन
दोन्ही पक्ष गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असली तरी ती दुर करण्यासाठीच आजची बैठक घेण्यात आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज असून, सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करत असल्याचे महाजन यांनी सांगितले.
जयंत पाटलांनी आपली पोरं, नातवंडे सांभाळावीत
राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी गिरीश महाजनांवर इतर पक्षाचे उमेदवार चोरी करण्यात त्यांचा हातखंडा असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर महाजन यांनी ‘जयंत पाटलांनी आपली पोरं व नातवंडे सांभाळावीत’ असा सल्ला दिला. तसेच त्यांच्या पक्षात मुलांचे पालन-पोषण व्यवस्थित केले जात नसल्याने ते आमच्या पक्षात येत असल्याचेही महाजन म्हणाले.
भाजपाचे दोन्ही उमेदवार भरणार उमेदवारी अर्ज
भाजपाचे जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार स्मिता वाघ व रावेर मतदार संघाच्या उमेदवार रक्षा खडसे या दोन्हीचे उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केले जाणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. यावेळी भाजपा, शिवसेना व आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आधीच नाराज शिवसैनिकांचा कल राष्टÑवादीकडे
सेनेवर आधीच नाराज शिवसैनिकांचा कल राष्टÑवादीकडे असल्याचे दिसून येत आहे. मनपा निवडणुकीत शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक २ मध्ये अक्षय सोनवणे याची उमेदवारी ऐनवेळी रद्द केल्यामुळे नाराज चत्रभुज सोनवणे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे सेनेला शिवसैनिकांचा कल जाणून घेणे आवश्यक बनले आहे.
भाजपाकडून सेनेला गोंजारण्याचा प्रयत्न
जळगाव लोकसभा मतदारसंघात मताधिक्यासाठी भाजपा उमेदवाराला जळगाव शहर महत्वाचे आहे. मात्र, जळगाव महापालिकेत भाजपा व शिवसेना आमने-सामने असताना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन करण्यासाठी भाजपाला चांगलाच प्रयत्न करावा लागत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत खाविआने राष्टÑवादीचे उमेदवार डॉ.सतीश पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत तरी शिवसेना आपल्यासोबत रहावी यासाठी भाजपाकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला जात आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आधीच युतीधर्म पाळण्यात येणार असल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात खालच्या पातळीवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन होते का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची अनुपस्थिती
युतीच्या या महत्वपूर्ण बैठकीला शिवसेनेचे रावेर लोकसभा मतदार संघाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील उपस्थित नसल्याचे दिसून आले. जळगावचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे या बैठकीला होते. मात्र, बैठकीला पूर्णवेळ न थांबता पंधरा मिनीटातच ते या बैठकीतून निघून गेले. त्यामुळे दिलजमाईच्या बैठकीत रुसवे-फुगवेही दिसून आले.
शिवसैनिकांची नाराजी दूर करणार
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेनेची युती झाली असली शिवसैनिकांमध्ये काही प्रमाणात भाजपाबद्दल नाराजी आहे. कारण भाजपाकडून केवळ लोकसभा निवडणुकीसाठीच शिवसेनेशी युती केली जाते. जि.प., मनपामध्ये भाजपा युती करत नाही. त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली. चाळीसगाव, धरणगाव, मुक्ताईनगर येथे शिवसेनेच्या झालेल्या बैठकांमध्ये शिवसेनेने भाजपाचे काम करण्यास नकार दिला असल्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, ३० मार्च रोजी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या उपस्थितीत होणाºया बैठकीत त्यांच्या अडचणी समजून घेवून नाराजी दूर करणार असल्याचे सांगितले.
अपेक्षाभंग झालेले शिवसैनिक देताहेत सोडचिठ्ठी
राष्टÑवादी कॉँग्रेसच्या २५ मार्च रोजी झालेल्या मेळाव्यात माजी उपमहापौर गणेश सोनवणे व माजी नगरसेवक चत्रभुज सोनवणे, नगरसेविका जिजाबाई भापसे यांचे पती अण्णा भापसे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्टÑवादीत प्रवेश केला. या तिन्ही पदाधिकाºयांचा अपेक्षाभंग झाल्यामुळे नाराज होते. त्यातच भाजपा-शिवसेनेची युती झाली असल्याने भाजपात न जाता त्यांनी राष्टÑवादीत जाणे पसंत केले आहे.
शिवसेनेला लोकसभेच्या निवडणुकीत या पदाधिकाºयांनी पक्ष सोडल्याने फटका बसणार नसला तरी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत परिणाम होऊ शकतो. जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेनेतच मुख्य लढत पहायला मिळाली होती. तसेच महापालिकेत सत्ताधारी भाजपा व शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये नेहमीच खडाजंगी होत असते. अशा परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून भाजपाला मदत करण्याची भूमिका घेताना शिवसेनेचे नगरसेवक सैरभैर झाले आहेत.
मागील पाच वर्ष एकत्र सत्तेत राहूनही एकमेकांवर सातत्याने आरोप करीत राहिलेल्या भाजपा-सेनेची लोकसभेसाठी अखेर युती झाली असली तरीही खान्देशात मात्र अद्यापही या युतीतील दुरावा कमी झालेला दिसत नाही. खान्देशातील चारही जागा भाजपाकडेच असल्याने सेनेच्या आमदारांसह पदाधिकारी, शिवसैनिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याचे चित्र आहे.
सर्व्हे ए.टी.पाटलांच्या विरोधात असल्याने पक्षाने उमेदवारी नाकारली -गिरीश महाजन
ए.टी.पाटील यांच्याबद्दल पक्षाने निर्णय घेतला असून, त्यांच्या उमेदवारी आधी पक्षाकडून जळगाव लोकसभा मतदार संघात तीन वेळा सर्वे केले. त्या सर्व सर्वेमध्ये ए.टी.पाटील मागे पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच पक्षाने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ए.टी.पाटील यांची जी काही नाराजी आहे. ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही महाजन म्हणाले.
रावेर मतदार संघात राष्टÑवादी कॉँग्रेसला उमेदवारच मिळत नाही. अनेक उमेदवारांचा शोध घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरु असून, ज्यांना विचारले जात आहे. तेच उमेदवार व्हायला तयार नसल्याने रावेरची जागा बिनविरोध निवडून येईल असेच सध्याचे चित्र असल्याचे महाजन म्हणाले.

Web Title: The role of Shiv Sena will be on 30th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.