आगीत घर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:25 AM2019-01-13T11:25:40+5:302019-01-13T11:26:04+5:30

 लग्नासाठीची २० हजाराची रोकडही जळाली

Fire burnt the house | आगीत घर जळून खाक

आगीत घर जळून खाक

Next
ठळक मुद्देवाळू बंदीने रोजगारही झाला बंद

जळगाव : झोपडीला शॉर्टसकींटमुळे आग लागून संसार जळून खाक झाला, छतही उडाले, वाळू बंदीने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आणि दुसरीकडे घरातील कमवती व्यक्ती कामासाठी पुण्याला गेलेली अशी विदारक स्थिती समता नगरातील रमजान अन्वय पिंजारी यांच्या कुटुंबावर शनिवारी सकाळी उद्भवली. मुलीच्या संसारासाठी गोळा केलेली २० ते २५ हजाराची रोकडही यात जळून खाक झाल्याचे या कुटुंबातील महिलांनी सांगितले.
शहरातील समतानगर येथे रमजान अन्वर पिंजारी यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागून त्यात मुलीच्या लग्नासाठी जमविलेल्या २० ते २५ हजार रुपयांसह नवे कपडे, टीव्ही यासह संसारोपयोगी वस्तू, अन्न-धान्याची काही क्षणातच राखरांगोळी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. नागरिकांच्या सतर्कतेने घरातील सिलेंडर हलविण्यात आल्याने दुर्घटना टळली.
कुटुंबिय बाहेर असल्याने अनर्थ टळला
समतानगरातील वंजारी टेकडी येथे रमजान अन्वर पिंजारी हे आई, पत्नी, मुलांसह राहतात. गवंडी काम तसेच हातमजुरी करुन ते उदरनिर्वाह चालवितात. रमजान हे वाळू बंदीमुळे कामे नसल्याने पुण्याकडे कामाच्या शोधात गेले आहेत. तर त्यांची पत्नी परवीन हे वडीलांची प्रकृती खराब असल्याने त्यांना पहायसाठी गेली होती. समीर व अरबाज तसेच मोठी मुलगी मुस्कान हे सर्व शाळेत गेले होते. घरी त्यांची आई मोसमबाई पिंजारी या या एकट्या होत्या. घटना घडली त्यावेळी त्या बाहेर गेल्या होत्या. याच दरम्यान घरातील वायरींगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली.
एकच पळापळ
शॉर्ट सर्क्रिटमुळे पार्टीशनच्या या घरात आग लागली व हा हा म्हणता, आगीने संपूर्ण घराला घेरले. पिंजारी यांच्या घराशेजारील रामकृष्ण माळी यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ गल्लीतील सुभाष राठोड, राहूल राठोड, दयाराम तंवर, विकी कलाल यांच्यासह बजरंग दल, बंजारा टायगर्सच्या पदाधिकारी तसेच नशीर पठाण, इमाम पठाण, पंडीज जाधव, नासिर पठाण, अख्तर शेख, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घरात धुर दाटला असल्याने छतावरील पत्रे बाजूला करुन घरात उडी घेत दरवाजा उघडला. प्रथम घरातील सिलेंडर इतरत्र हलविण्यात आले. यानंतर आगीवर पाण्याचा मारा करुन आग विझविण्यात आली.
पैशांची राखरांगोळी
रजमान यांची मोठी मुलगी मुस्कान हिच्या लग्नासाठी पिंजारी कुटुंबिय स्थळ शोधत आहेत. यासाठी ते काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथील एका मुलाला पाहून आले होते. तसेच त्यांनाही जळगावाला येण्याचे निमंत्रण देवून आले होते. दोन ते तीन दिवसात ते मुलीला तसेच घर पहायला येणारच होते. त्यापूर्वीच दुर्घटना घडली. यात भिशीचे २० ते २५ हजार रुपये मुस्कानच्या लग्नासाठी त्यांनी राखून ठेवले होते. ते घरातील एका लाकडी कपाटात ठेवले होते. तेही आगीत जळून खाक झाले. आधीच हलाखीची परिस्थिती व त्यातच जमविलेले पैशांची राखरांगोळी झाल्याने मुलीचे लग्न कसे करणार असा प्रश्न पिंजारी कुटुंबियांना पडला आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल अडकमोल यांनीही घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांना धीर दिला.
खिन्न होऊन बसले घराबाहेर... पिंजारी कुटुंबातील महिला, लहान मुले आगीत भस्मसात झालेल्या घराकडे डबडबलेल्या डोळ्यांनी पहात बसले होते. तर वृद्धा मोसमबाई पिंजारी या रडत रडत सांगत होत्या. रोजी-रोटी बंद झाली, डोक्यावचे छतही गेले आता जगायचे कसे? असा प्रश्न त्या करत होत्या. शेजारील महिला त्यांची समजूत घालत होत्या.

Web Title: Fire burnt the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग