Independence Day : स्वातंत्र्याची पहाट उजाडताच शहरभर उत्साहाला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:11 AM2018-08-15T00:11:53+5:302018-08-15T00:14:43+5:30

ज्येष्ठांनी जागविल्या आठवणी

At the dawn of Independence floods | Independence Day : स्वातंत्र्याची पहाट उजाडताच शहरभर उत्साहाला उधाण

Independence Day : स्वातंत्र्याची पहाट उजाडताच शहरभर उत्साहाला उधाण

Next
ठळक मुद्देहाती तिरंगा घेऊन आनंदाने धावले होते विद्यार्थीपताका-फुलांनी सजली जळगावनगरी

विजयकुमार सैतवाल
जळगाव : दीडशे वर्षे इंग्रजांच्या जुलमी राजवटीत यातना सोसून प्रत्येक जण ज्या स्वातंत्र्याची प्रतीक्षा करीत होता, ती स्वातंत्र्याची पहाट उजाडताच अख्या जळगावनगरीत उत्साह, आनंदाला उधाण येऊन शालेय विद्यार्थी, तरुण हाती तिरंगा घेत अक्षरश: शहरभर धावले. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा परिपाक असलेला हा बहुमोल क्षण येताच सर्वत्र पताका, फुले लावून शहर सजले होते, अशा स्वातंत्र्याच्या गोड आठवणी शहरातील ज्येष्ठ मंडळींनी जागविल्या.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दरवर्षी स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या राष्ट्रीय सणाचे प्रत्येक जण साक्षीदार होतो, मात्र १५ आॅगस्ट १९४७ रोजीचा क्षण कसा होता, हे ‘लोकमत’ने जाणून घेत घेतले. त्या वेळी पहिल्या क्षणाचे साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ मंडळींनी ‘त्या’ सुखद आठवणी जागविल्या. त्या आठवणी ज्येष्ठांच्याच शब्दात......
हाती तिरंगा घेऊन शहरभर धावलो...
१९४७ला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून राष्ट्रसेवा दलाशी जुडलेलो होते. त्या काळी मी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असताना शहरातील ओसवाल वसतिगृहात राहत होतो. १५ आॅगस्ट १९४७ चा सूर्य स्वातंत्र्य घेऊन येताच शहरभर आम्ही पदयात्रा काढण्यासह तिरंगा हाती घेत दिवसभर शहरात धावलो. प्रत्येकाच्या भेटीगाठी घेत एकमेकांना शुभेच्छा देत होतो. प्रत्येक जणाच्या आनंदाला उधाण आले होते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता. तत्पूर्वी १४ आॅगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री १२ वाजून एक मिनिटांनी रेडिओवर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाने तरुणांमध्ये रोमांच जागले होते. त्या वेळी रेडिओदेखील जास्त नसल्याने आम्ही हे भाषण ऐकण्यासाठी तीन कंदील (आजचा सुभाषचंद्र बोस चौक) भागात गेलो होते. त्या ठिकाणी घेलाभाई नांगी यांच्या मिठाईच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या एका पानटपरीवर रेडिओ होता. त्यामुळे मी, मोहन लोढा (रा. पहूर), धनराज बरडिया (बोदवड), इंदरचंद जैन (अमळनेर) व इतर मित्र आम्ही मध्यरात्री तेथे पोहचलो. त्या क्षणी चाचा नेहरुंनी केलेले भाषण रोमांच उभे करणारे होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी स्वातंत्र्याचा आनंद आम्ही सर्वांनी देवकीनंदन नारायण (काँग्रेसचे माजी खासदार) यांच्या सान्निध्यात साजरा केला. आज ८६ वर्षे वय झाले असले तरी स्वातंत्र्याचा तो पहिला दिवस आजही आठवला की, पुन्हा तोच उत्साह संचारतो.
- दलुभाऊ जैन, संघपती, सकल जैन संघ.

स्फूर्ती देणाºया प्रभात फेरी, सभांद्वारे स्वातंत्र्याचे गुणगाण
जळगावात शिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी वेगवेगळ््या खेड्या-पाड्यातील असले तरी प्रत्येकाला प्रतीक्षा होती ती स्वातंत्र्याची. प्रत्येकाच्या ह्रदयात होती ती भारतमाता, आपली मायभूमी. ही मायभूमी ज्या दिवशी इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाली त्या १५ आॅगस्ट १९४७च्या पहाटेच सर्व जण वसतिगृहाबाहेर पडले व प्रभात फेरी काढली. विशेष म्हणजे शहरभर गुळ वाटप करून प्रत्येकाने हा गोड क्षण आणखी गोड केला. आमच्या वसतिगृहाचे पर्यवेक्षक असलेले कन्हैयालाल दग यांना देशाबद्दल प्रचंड अभिमान होता. देश स्वतंत्र होताच त्यांनी प्रभात फेरी काढण्यासह सभा घेतल्या. रात्री नाटिकादेखील सादर करण्याचे नियोजन केले व त्यानुसार सुभाष चौकात सांस्कृतिक कार्यक्रमातून इंग्रजांच्या कटू आठवणी व स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या बलिदानाचे दर्शन विद्यार्थ्यांमार्फत घडविले. विशेष म्हणजे या वेळी महिलांची उपस्थितीदेखील लक्षणीय होती. आताच्या काँग्रेसभवनच्या जागी त्या वेळी असलेल्या इमारतीवर झालेल्या पहिल्या ध्वजारोहणाचे आम्ही साक्षीदार राहिलो, ते क्षण वयाच्या ८८व्या वर्षीदेखील स्फूर्ती देणारे आहे.
- इंदरचंद कोठारी, माजी संचालक, भुसावळ तालुका शेतकरी सहकारी संघ

जुने गाव सजले...
रामपेठ परिसरात राहत असताना त्या ठिकाणी असलेल्या व्यायामशाळेत मोरारजी देसाई, केशव नारायण, भाऊसाहेब हिरे ही मंडळी येऊन स्वातंत्र्याप्राप्तीसाठी तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत होते. त्या वेळी प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळाले आहे. या सर्व मंडळींच्या प्रेरणेने ज्या वेळी १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र मिळाले त्या वेळी जुन्या गावातील अबाल-वृद्धांनी सकाळीच सर्वत्र पताका लावण्यासह फुलांनी परिसर सजविला होता. आज वयाचे ८४ वर्षे झाले असले तरी १५ आॅगस्ट १९४७ रोजी जुन्या गावात प्रत्येकाने साजरा केलेला आनंदाचा क्षण आजही स्मरणात आहे. स्वातंत्र्याचा हा पहिला दिवस सण, उत्सव घेऊन आल्याने प्रत्येकाला त्या दिवसाचे अप्रूप कायम आहे. स्वातंत्र्यानंतर जळगावात आलेले पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांचे भाषणे आजही आठवणी ताज्या करतात.
- जगन्नाथ खडके, निवृत्त प्राचार्य, कला, वाणिज्य महाविद्यालय, जामनेर.

Web Title: At the dawn of Independence floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.