जालना जिल्ह्यात मोसंबी, डाळिंब, पेरुला विम्याचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:14 AM2018-05-14T01:14:24+5:302018-05-14T01:14:24+5:30
वामानातील बदलांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरु पिकाला विमा संरक्षण देण्यात आले आहे.
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हवामानातील बदलांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरु पिकाला विमा संरक्षण देण्यात आले आहे. प्रधानमंत्री फळपीक योजनेअंतर्गत या पिकांचा विमा काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामानातील बदलांमुळे अनेकदा फळपिकांवर विपरित परिणाम होऊन उत्पादनामध्ये घट येते. अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे शेतक-यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. नैसर्गिक कारणांमुळे फळबागेचे नुकसान झाल्यास शेतक-यांना भरपाई मिळावी राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक योजना राबविण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात सध्या मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरू या फळपिकांसाठी ही योजना लागू आहे. त्यानुसार मोसंबी पिकांसाठी १४ जूनपर्यंत, डाळिंबासाठी १४ जुलै तर पेरुसाठी चार जुलैपर्यंत विमा काढता येणार आहे. पेरुसाठी तीर्थपुरी, मंठा, तळणी, पिंपळगाव रेणुकाई या चार महसूल मंडळांचा समावेश आहे.
मृग बहरातील मोसंबीसाठी जालना तालुक्यातील जालना शहर, ग्रामीण, रामनगर, नेर, विरेगाव, पाचनवडगाव, वाघ्रूळ, सेवली, भोकरदन तालुक्यातील भोकरदन, सिपोरा, राजूर, केदारखेडा, जाफराबादमधील जाफराबाद, माहोरा, कुंभारझरी, टेंभूर्णी, वरुड बु., अंबडमधील अंबड, धनगरपिंप्री, जामखेड, रोहिलागड, वडीगोद्री सुखापुरी, गोंदी, घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव, कुंभारपिंपळगाव, तीर्थपुरी, आंतरवाली टेंभी, जांबसमर्थ रांजणी, परतूरमधील परतूर, वाटूर, सातोना, श्रीष्टी, आष्टी, मंठा, पांगरी गोसावी, तळणी, ढोकसाळ या महसूल मंडळातील शेतक-यांनी विमा काढता येणार आहे.