बाळ जन्माला घाला अन् भरघोस बक्षीस मिळवा !
By admin | Published: May 26, 2015 01:38 AM2015-05-26T01:38:25+5:302015-05-26T01:38:25+5:30
फिनलँडमधील लोकसंख्या झपाट्याने कमी होत असून, लोकसंख्या वाढविण्यासाठी सरकारने विविध उपाय योजणे सुरू केले आहे.
लेस्टीजार्वी : फिनलँडमधील लोकसंख्या झपाट्याने कमी होत असून, लोकसंख्या वाढविण्यासाठी सरकारने विविध उपाय योजणे सुरू केले आहे. या देशातील छोट्या गावात मूल जन्माला घालणाऱ्या मातापित्यांना बोनस दिला जात आहे, तर काही नगरपरिषदा नव्या पालकांना १ युरोला (१.७० डॉलर) जमिनीचा छोटा तुकडा देत आहेत.
लोकसंख्या कमी होण्याचे अनेक परिणाम फिनलंडमध्ये जाणवू लागले आहेत. फिनलंडमधील लोक इतर देशात स्थलांतरित होत असल्यानेही लोकसंख्येला गळती लागली आहे. दोन तृतीयांश छोट्या नगर परिषदा अगदी कमी किमतीला भूखंड देत आहेत.
काही न. प. नव्या पालकांना रोख रक्कम देण्याचा प्रस्ताव देत आहेत. रोख रक्कम वा बोनसची रक्कम वेगवेगळ्या गावात वेगवेगळी आहे. पश्चिम फिनलंडमधील एका छोट्या गावाने तर गावात बाळ जन्माला घालणाऱ्या पालकांना १० हजार युरो (११ हजार ४०० डॉलर) देण्याची घोषणा केली आहे. ८१५ लोकसंख्या असणारे लेस्टीजार्वी या गावाची प्रसिद्धी देशातील सर्वात छोटी नगर परिषद अशी आहे.
या नगर परिषदेने बाहेरचे लोक गावात येऊन बक्षीसाचा फायदा घेऊ नयेत म्हणून १० हजार युरोपैकी एकावेळी १ हजार युरो देण्याचे जाहीर केले आहे.
फिनलंड सरकार आधीच १७ वर्षाखालील मुलांना प्रत्येक मुलासाठी वेगळा भत्ता देते.
हा बोनस वा भूखंड यांच्या लोभाने लोकसंख्या वाढली आहे काय? उताजर्वी या २९०१ लोकसंख्या असणाऱ्या गावात नगर परिषद गेली १० वर्षे एक युरोला भूखंड देण्याची योजना राबवत आहे, पण आतापर्यंत काही डझन भूखंड विकले गेले आहेत.
४मलेशियातही जन्मदर घसरू लागला असून, तो सुधारण्यासाठी लोकांनी अधिक मुले जन्माला घालावीत, असे आवाहन सरकार करत आहे. येत्या ५ वर्षांत मलेशियाची गणना विकसित राष्ट्र म्हणून होणार असून, तसे झाल्यानंतर देशाची लोकसंख्या घसरू लागेल. त्याला आळा घालण्यासाठी नागरिकांनी जास्त मुले जन्माला घालावीत असे आवाहन करण्यात येत आहे.
४महिला व बालकल्याणमंत्री रोहानी अब्दुल करीर यांच्या म्हणण्यानुसार २०२० पर्यंत मलेशियाचा जन्मदर १.९ पर्यंत घसरेल असा संयुक्त राष्ट्राचा अंदाज आहे. २०१२ साली मलेशियाचा जन्मदर २.१ होता.
४जीवनाचा दर्जा वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे; पण त्याचबरोबर देशाच्या दीर्घकालीन फायद्यासाठी अधिक मुले जन्माला घालावीत, असे आवाहन केले.