रेल्वेस्थानक,क्वॉर्टरवर पाणीटंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:16 PM2019-05-18T22:16:04+5:302019-05-18T22:16:40+5:30
शहरातील मुख्य रेल्वे स्थानक व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरला गोंदियापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या बिरसोला येथील बाघ नदीच्या पात्रात उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र बाघ नदीच्या पात्रात केवळ ४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने रेल्वे स्थानकावरील प्रवासी आणि क्वॉर्टरमधील कर्मचाऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील मुख्य रेल्वे स्थानक व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरला गोंदियापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या बिरसोला येथील बाघ नदीच्या पात्रात उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र बाघ नदीच्या पात्रात केवळ ४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने रेल्वे स्थानकावरील प्रवासी आणि क्वॉर्टरमधील कर्मचाऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्याचे प्रशासनाचे नियोजन फसल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र आता यातून गोंदिया रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहत सुध्दा सुटली नाही. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून दररोज या रेल्वे स्थानकावरुन दीडशेहून अधिक रेल्वे गाड्या धावतात तर ४० हजार प्रवाशी ये-जा करतात. रेल्वे स्थानकावर रेल्वे विभागातर्फे प्रवाशांसाठी पाण्यासह इतर विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाºयांच्या वसाहतीला गोंदियापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या बिरसोला येथे बाघ नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा बाघ नदीचे पात्र लवकरच कोरडे पडले. परिणामी पाणी पुरवठा योजनेची विहिरी कोरडी पडली आहे. त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाºयांच्या वसाहतीच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकाला पाणी पुरवठा करण्यासह विविध रेल्वे गाड्यांच्या कोचमध्ये सुध्दा पाणी पुरवठा केला जातो.
मात्र आता बाघ नदीच्या पात्रात केवळ ४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चार दिवसानंतरही रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही तर रेल्वे प्रवाशांना सुध्दा पाणी मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
पहिल्यांदाच पाणीटंचाई
गोंदिया रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत पाणी टंचाईची स्थिती ही प्रथमच निर्माण झाल्याचे बोलल्या जाते. सध्या निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना व सिंचन विभागाला पत्र लिहून बाघ नदीत पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र अद्यापही यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.
बाघ नदीचे पात्र पडले कोरडे
गोंदिया रेल्वे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता के.मल्लिकार्जुन राव यांनी सांगितले की बिरसोला येथील बाघ नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा बाघ नदीचे पात्र लवकरच कोरडे पडले आहे. सध्या केवळ ४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुजारीटोला धरणाचे पाणी सोडल्यास यावर मात करणे शक्य आहे.