यंदाही गणरायाचे आगमन खड्ड्यातूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:01 AM2018-09-02T00:01:19+5:302018-09-02T00:02:48+5:30

गणेशोत्सव अवघ्या बारा दिवसांवर आला असताना अद्यापही शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून आता डबके तयार झाले आहे.

Ganapati arrived this year only from the pit | यंदाही गणरायाचे आगमन खड्ड्यातूनच

यंदाही गणरायाचे आगमन खड्ड्यातूनच

Next
ठळक मुद्देनगर परिषदेचे दुर्लक्ष : गणेशभक्तात नाराजी, केव्हा पालटणार रस्त्यांचे रूप? मलमपट्टी किती दिवस चालणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गणेशोत्सव अवघ्या बारा दिवसांवर आला असताना अद्यापही शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून आता डबके तयार झाले आहे. मात्र खड्डे बुजविण्याची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेचे याकडे दुुर्लक्ष झाल्याने गणरायाचे आगमन यंदा शहरात खड्ड्यांमधूनच होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे.
पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडूजी करण्याची जबाबदारी स्थानिक नगर परिषदेची आहे. मात्र यंदा नगर परिषदेला पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्याचा विसर पडला. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात नगर परिषदेने मलमा टाकून शहरातील खड्ड्यांना मलमपट्टी करण्याचे काम सुरू केले. मात्र १५ आॅगस्टनंतर शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांची डागडूजी करण्यासाठी टाकलेला मलमा वाहून गेला. त्यामुळे रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे झाली आहे. शहरातील सिव्हील लाईन, गोरेलाल चौक, मामा चौक, शास्त्रीवार्ड, छोटा गोंदिया, एन.एम.डी.कॉलेज रोड, पाल चौक व रेल्वे स्थानकाच्या मागील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. विशेष म्हणजे या भागात दरवर्षी सर्वाधिक सार्वजनिक गणेशाची स्थापना केली जाते. तर गणेश मंडळे सिव्हिल लाईन बोडी परिसतील मुर्तीकारांकडून वाजत गाजत गणेशमूर्त्या स्थापन करण्यासाठी नेतात. मात्र या मार्गावर खड्डेच खड्डे पडले असून या खड्डयांमधून गणेशभक्तांना मुर्त्या स्थापन करण्यासाठी घेवून जाव्या लागणार आहेत. त्यामुळे यंदाही गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच होणार असल्याचे चित्र आहे. गणेश चतुर्थीला केवळ बारा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे नगर परिषदेला गणेशभक्तांची आणि शहरवासीयांची किती काळजी आहे, हे दिसून येते.
रस्त्यांच्या कामाने अडचण
नगर परिषदेतर्फे शहरातील रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची सुरूवात गोरेलाल चौकातून करण्यात आली. सध्या या रस्त्यांची कामे अर्धवट झाली असून यामुळे या मार्गावरुन ये-जा करण्यास अडचण निर्माण होत आहे. रस्त्यांच्या कामाचा फटका गणेशभक्तांना सुद्धा बसणार असून त्यांना गणेशमूर्त्यांची स्थापना करण्यासाठी आणताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
खड्ड्यांना चुरी व मलम्याचा आधार
शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी नगर परिषदेने मलमा आणि चुरीचा वापर केला. मात्र पावसामुळे खड्ड्यांमधील चुरी व मलमा वाहून गेला आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. तर खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डबके तयार झाल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालक आणि नागरिकांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शहरासह ग्रामीण रस्त्यांची लागली वाट
खड्ड्यांंची समस्या केवळ शहरातच नसून जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कायम आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची डागडूजी कामेच करण्यात आली नसल्याने या रस्त्यांची अक्षरक्ष: चाळणी झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करताना गावकºयांच्या नाकीनऊ येत आहेत.

Web Title: Ganapati arrived this year only from the pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.