जीवरक्षक किना-यावरचे जीवनदायी, 3 हजार लोकांचे वाचवले जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 06:27 PM2017-10-05T18:27:18+5:302017-10-05T19:13:55+5:30

गोवा म्हणजे समुद्र किनारा. या किना-यावरील निसर्गाचे सौंदर्य लुटण्यासाठी येणा-या प्रत्येक व्यक्तीला पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही.

The life saving survivors of survivors, survived the lives of 3,000 people | जीवरक्षक किना-यावरचे जीवनदायी, 3 हजार लोकांचे वाचवले जीव

जीवरक्षक किना-यावरचे जीवनदायी, 3 हजार लोकांचे वाचवले जीव

googlenewsNext

म्हापसा : गोवा म्हणजे समुद्र किनारा. या किना-यावरील निसर्गाचे सौंदर्य लुटण्यासाठी येणा-या प्रत्येक व्यक्तीला पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही. या मोहापायी पाण्यात उतरलेल्या अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. मग ती पोहता न आल्याने असो पाण्याच्या गतीमान प्रवाहामुळे असो किंवा नशेत असो. हा मोह आवरता यावा. लोकांचे बहुमूल्य जीव वाचवावे त्यांना सुरक्षा मिळावी म्हणून सरकारने किना-यावर जीव रक्षकांची नेमणूक केली आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता प्रसंगी जीव धोक्यात घालून किना-यावर येणा-या लोकांना बहुमूल्य असे मार्गदर्शन करणा-या या जीव रक्षकांकडे किना-यावरील जीवनदायिनी म्हणून बघितले जाते. आता नवीन पर्यटन हंगाम सुरू झाल्याने पुन्हा त्याच आव्हानांना सामोरे जाण्यास ते सज्ज झाले आहेत. यांच्या नेमणुकीमुळे बुडून मरण्याच्या प्रकार ९९ टक्क्यांनी कमी झाले आहेत.
विविध समुद्र किना-यांवर दृष्टीच्या वतीने सुमारे ६०० जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. काही किना-यांवर सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तर काही किना-यांवर रात्रीच्या वेळीही हे जीवरक्षक सेवा पुरवत असतात. पर्यटनाच्या बिगर हंगामी दिवसात सुद्धा किना-यावर सेवा बजावणा-या या जीव रक्षकांची खरी कसोटी हंगाम सुरू झाल्यानंतर लागते. डोळ्यात तेल घालून त्यांना लोकांच्या जीवाचे रक्षण करावे लागते. स्वत:चे जीव धोक्यात घालून हे जीवरक्षक लोकांचे जीव वाचवतात. राज्यातील महत्त्वाच्या समुद्र किना-यावर दृष्टीच्या जीवरक्षकांची सरकारने नेमणूक केली आहे.
आॅक्टोबर २००८ पासून सुरू केलेल्या सेवेत अजूनपर्यंत ३ हजार लोकांचे जीव वाचवण्यात आले आहेत. यात २०१४ साली ४२५, २०१५ साली ३३०, २०१६ साली ४०८ तर या वर्षी अजूनपर्यंत १९५ लोकांचे प्राण जीवरक्षकांनी वाचवले आहेत. सरासरीवर प्रती किनारे १४ रक्षकांची नेमणूक केली जाते. कळंगुट तसेच कोलवा सारख्या किना-यावर २२ जणांची नेमणूक केली आहे. एकूण ३८ किना-यावर तसेच दूधसागर धबधब्यावर व मये येथील तलावावर त्याची नेमणूक केली आहे. यात उत्तरेतील १६ तर दक्षिणेतील २२ किना-यांचा समावेश आहे.
ही सेवा उत्तरेतील केरी, हरमलपासून ते दक्षिणेतील पाळोळे पर्यंत महत्त्वाच्या किना-यांवर सुरू आहे. यात कळंगुट, मिरामार, बोगमाळो, वार्का तसेच इतर किना-यांचा समावेश आहे. मानवाच्या जीवाचे संरक्षण करताना समुद्र किना-यावर अंडी घालण्यासाठी येणा-या कासवांचे संवर्धन करणे, लोकांना मार्गदर्शन करणे तसेच इतर महत्त्वाची कामे हे जीवरक्षक जीवाची तमा न बाळगता अत्यंत कुशलतेने करतात. या जीवरक्षकांना अत्यंत चांगल्या तसेच उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या सेवेत काम करणा-या जीवरक्षकांना प्रशिक्षणा बरोबर प्रथोमचार पुरवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यामुळे बुडलेल्या लोकांना अनेकवेळा तिथल्या तिथे उपचार देऊन त्यांना वाचवण्यात आले आहे. लोकांनी पोहण्याची सुरक्षित जागाही त्यांच्या वतीने किनारी भागात लाल झेंडे लावून निर्देशित केली आहे. या जीवरक्षकांना सेवा देण्यासाठी वॉच टॉवर, जीव वाचवण्याच्या वापरात येणारी उपकरणे, सुचना फलक, विश्रांतीसाठी सुविधा तसेच इतर अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
जीव वाचवण्यासाठी लागणारी सर्व उपकरणांनी ते युक्त आहेत. किना-यांवर पायी सुरक्षा पुरवताना वाहना वरुनही त्यांची सततची गस्त सुरूच असते. पुरूष रक्षका बरोबर महिला जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या रक्षकांनी ब-याच समुद्र किना-यांवर सुरक्षित पोहण्याची जागा, महिलांसाठी पोहण्याची जागा, असुरक्षित पोहण्याची जागा निश्चित केली आहे. त्यामुळे त्याचा फायदा समुद्रात जाणा-या असंख्य लोकांना होत असतो. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून हे जीवरक्षक सेवा पुरवत असतात.
या जीवरक्षकांच्या अनेक समस्या असून आपली जबाबदारी पार पाडताना अनेक वेळा त्यांना मारही खावा लागतो. दारू पिऊन किनारी भागात दंगा करणा-यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. नशेत असलेले लोक अनेकदा जीवरक्षकांनी दिलेला सल्ला न मानता समुद्रात उतरतात. त्यांचा विरोध न जुमानता ते त्यांना प्रवृत्त करीत असतात. प्रसंगी पोलिसांची सुद्धा मदत घेत असतात. किना-यावर येणा-या लोकांचे जीव वाचवण्यास दृष्टीचे जीवरक्षक सततपणे मेहनत घेत असल्याची माहिती दृष्टीचे सरव्यवस्थापक पी. एन. पांडे यांनी दिली.
 

Web Title: The life saving survivors of survivors, survived the lives of 3,000 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.