चार कलमी कार्यक्रमातून गावाची दारूबंदी साध्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:27 AM2019-05-11T00:27:38+5:302019-05-11T00:28:02+5:30

२०१६ पासून जिल्ह्यातील १५०० गावे दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ हा पथदर्शी कार्यक्रम सर्च आणि राज्यशासनाच्या सहकार्यातून सुरू करण्यात आला आहे. यांतर्गत व्यापक जनजागृती, गाव पातळीवर सक्रीय संघटन, कायद्याची अंमलबजावणी करून बेकायदेशीर दारू व तंबाखूला बंदी व व्यसनी रुग्णांवर उपचार या चार कलमी कार्यक्रमांतून दारू आणि तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

The villager's achievement through four-point program | चार कलमी कार्यक्रमातून गावाची दारूबंदी साध्य

चार कलमी कार्यक्रमातून गावाची दारूबंदी साध्य

googlenewsNext
ठळक मुद्देअभय बंग यांचे प्रतिपादन : व्यसनमुक्ती संमेलनात विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : २०१६ पासून जिल्ह्यातील १५०० गावे दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ हा पथदर्शी कार्यक्रम सर्च आणि राज्यशासनाच्या सहकार्यातून सुरू करण्यात आला आहे. यांतर्गत व्यापक जनजागृती, गाव पातळीवर सक्रीय संघटन, कायद्याची अंमलबजावणी करून बेकायदेशीर दारू व तंबाखूला बंदी व व्यसनी रुग्णांवर उपचार या चार कलमी कार्यक्रमांतून दारू आणि तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यात अनेक अडचणी आणि संकटे येत असली तरी यावर मात करून संघटनेची ताकद विक्रेत्यांना दाखवून देत गावाची दारूबंदी तुम्हीच साध्य करू शकता, असा आशावाद डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केला.
देसाईगंज येथील मुक्तिपथ तालुका कार्यालयाद्वारे व्यसनमुक्ती संमेलनात ते गुरूवारी बोलत होते. चार कलमी कार्यक्रमांचाच आधार घेत तालुक्यातील गावे दारूबंदीसाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक गावांनी दारूबंदी साध्य केली आहे तर काही या मार्गावर आहेत. या सर्व गाव संघटनांना येणाऱ्या अडचणी, आव्हाने व मिळालेले यश इतर गावांना कळावे तसेच चर्चात्मक पद्धतीने दारूबंदीसाठी मार्ग काढता यावा यासाठी सदर संमेलन घेण्यात आले. संमेलनाला ३० गावातील संघटनेचे सदस्य उपस्थित होते. सर्वप्रथम वडसा तालुक्यातील दारूमुक्ती आंदोलनाचा आढावा घेताना डॉ. बंग म्हणाले, वडसा हा सुरुवातीपासूनच जागरूक तालुका राहिला आहे. लढाऊ कार्यकर्ते ही या तालुक्याची ओळख आहे. १९८७ पासून जिल्ह्यात सुरु झालेल्या दारूमुक्ती आंदोलनात सर्वात सक्रीय देसाईगंज तालुका होता. बेकायदेशीर दारूविक्री तालुक्यात तेव्हाही होती. आजही आहे. पण गावाची दारूबंदी या आंदोलनात सहभागी होत अनेक गावांनी दारूबंदी साध्य केली होती. आजही यातील बहुतेक गावांनी ती टिकवून ठेवली आहे. आज गावांच्या साथीला मुक्तिपथ भक्कमपणे उभे आहे. गाव पातळीवर संघटना दारूविक्रेत्यांना ‘सळो की पळो’ करून सोडत आहे. असंख्य अडचणीतून मार्ग काढत आहेत. याच प्रयत्नांतून दारूमुक्ती नक्कीच साध्य होईल असेही ते यावेळी म्हणाले.
उपस्थित गाव संघटनेच्या सदस्यांनी गावातील दारू बंद करताना आलेले अनुभव विषद केले. काही गावांना अद्यापही पूर्ण दारूबंदी साध्य झालेली नाही. महिला प्रयत्नशील आहेत. पण विक्रेते ऐकत नसल्याने अपयश येत असल्याचेही अनेक महिलांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. यावर आवश्यक उपायही डॉ. बंग यांनी सुचविले. दारूबंदी हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही. पीक येण्यासाठी शेती आपल्याला दरवर्षी कसावी लागते. जेवणही आपण रोज करतो. तसेच दारूबंदीचे आहे. ती सातत्याने करावी लागणार आहे आणि त्यासाठी तयारही राहावे लागणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
मुक्तिपथचे संचालक मयूर गुप्ता यांनी दारूबंदीसाठी आवश्यक उपाययोजना करताना गावांनी संघटीत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. दारूविकेते मुजोर झाले आहे. पण चार कलमी कार्यक्रमाचा योग्य वापर केल्यास त्यांच्या मुजोरीला आवर घालून गावाला दारूमुक्त करणे शक्य असल्याचे गुप्ता म्हणाले.
संमेलनाला २० गावांतील संघटनाचे सदस्य उपस्थित होते. गाव संघटनांच्या बळकटीकरणासाठी तालुका संघटना गठीत करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, तालुका संघटक भारती उपाध्ये, उपसंघटक राकेश खेवले यांच्यासह इतरही कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न आवश्यक
गाव संघटनेचे सदस्य दारू पकडतात. पोलिसांच्या स्वाधीन करतात. पण सदोष पंचनामा, साक्षीदार आणि पंचांनी समन्स कडे लेलेले दुर्लक्ष यासह इतरही बाबींमुळे केसेस दुबळ्या होत जातात. त्यातच कायदेशीर कारवाई वेळखाऊ असल्याने अनेकदा निराशा येते. पण या सर्व बाबी समजून घेत दारूविक्रेत्यांविरोधातील कायदेशीर तक्रारी बळकट करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर डॉ. अभिता वासनिक यांनी गाव संघटनांना मार्गदर्शन केले. कुणाच्याही दबावाला बळी न पडता थेट साक्ष देण्याची गरजही त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितली. दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महिलांसोबतच गावातील नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे वासनिक यांनी सांगितले.
 

Web Title: The villager's achievement through four-point program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.