हेल्मेटचे भूत आताच का ऐरणीवर? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 05:32 PM2019-01-04T17:32:06+5:302019-01-04T17:36:59+5:30

हेल्मेटसक्तीबाबतचा हा विषय आजचा नाही तर तब्बल १६ वर्षे जुना आहे़.

why Helmet's compulsary now ? | हेल्मेटचे भूत आताच का ऐरणीवर? 

हेल्मेटचे भूत आताच का ऐरणीवर? 

Next

- विवेक भुसे- 
नव वर्षापासून पुण्यासह अनेक शहरात दुचाकीस्वारांवर हेल्मेटसक्ती करण्यात आली असून हेल्मेट न वापरणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करुन त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये वसुल करण्यात येत आहे़. सर्वाधिक दुचाकी असलेल्या पुणे शहरात हेलमेटसक्ती विरोधातील आवाज मोठा आहे़. हेल्मेटविरोधी कृती समितीने त्याला विरोध करण्यासाठी सविनय कायदेभंग करत मोर्चा काढला़. या समितीने हेल्मेटसक्ती करण्याबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले आहे़. त्यातील काही मुद्दांकडे दुर्लक्षित करुन चालणार नाही़.  
हेल्मेटसक्तीबाबतचा हा विषय आजचा नाही तर तब्बल १६ वर्षे जुना आहे़. सिंबायोसिस विधी महाविद्यालयातील भारद्वाज व त्याच्या सहकाऱ्यांनी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष अनुभव म्हणून उच्च न्यायालयात वाढते अपघात रोखण्यासाठी हेल्मेट सक्ती करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका २००३ मध्ये दाखल केली होती़. त्यावर उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारत सुरक्षेसाठी सर्व रस्त्यांवर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले़. या अगोदर मोटार वाहन कायद्यानुसार महापालिका क्षेत्रात हेल्मेट सक्ती नव्हती़ उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने आदेश काढून मोटार वाहन कायद्यात बदल केला व महापालिका क्षेत्रातही हेल्मेटसक्ती लागू केली़. त्यानंतर दर काही वर्षांनी हेल्मेटचे भूत ऐरणीवर येते़. 
यंदा हे हेल्मेटचे भूत पुन्हा ऐरणीवर येण्याचे कारणही उच्च न्यायालय आहे़. रस्ता सुरक्षा अपघात कमी व्हावेत, यासाठी शासनाने काय उपाय योजना केल्या आहेत, अशी उच्च न्यायालयाने विचारणा केली असून त्याबाबतचा अहवाल देण्याचा आदेश दिला आहे़. शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार १५ जानेवारीला परिवहन विभागाला हा अहवाल न्यायालयात सादर करायचा आहे़. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये परिवहन विभाग खडबडून जागा झाला़. 
महाराष्ट्रात सर्वाधिक रस्ते अपघात होतात़. पहिल्या तीन क्रमांकामध्ये महाराष्ट्र असतो़. वारंवार अपघात होणाºया ठिकाणामध्ये कशामुळे अपघात होतात, याचा शोध घेऊन उपाय योजना करण्याचा आदेश न्यायालयाने शासनाला दिला होता़ त्याला अनेक महिने झाले पण परिवहन विभागाने अहवाल तयार करण्याव्यतिरिक्त काहीही केले नाही़ आता अहवाल देण्याची वेळ आली़. तेव्हा डिसेंबरच्या मध्याला परिवहन विभागाचे सचिवांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस आयुक्तालयातील वाहतूक उपायुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली व त्यांनी राज्यभरात एकाच ठिकाणी अनेक अपघात झालेल्या ठिकाणी काय उपाय योजना केल्या याची माहिती घेतली़ तेव्हा बहुतांश ठिकाणी केवळ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले होते़. त्यावर काहीही काम झाले नव्हते़ त्यामुळे त्यावर तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश देण्यात आले़.
      पुणे शहरात गेल्या ३ वर्षात पाचपेक्षा अधिक अपघात झाले असे २२ ब्लॅक स्पॉट असून पुणे जिल्ह्यात त्यांची संख्या ५१ आहे़. या ठिकाणी काहीही काम झालेले नाही़. त्यामुळे १५ जानेवारीच्या आत या ठिकाणी नेमक्या काय उपाय योजना करायच्या हे निश्चित करुन त्याप्रमाणे काम सुरु करण्याचे आदेश सचिवांनी दिले़. त्याचवेळी अपघात रोखण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करताना दुचाकीस्वारांचे अपघातात सर्वाधिक मृत्यु होतात़. हेल्मेट वापरले तर अपघातातील मृत्युचे प्रमाण कमी होईल, असे सुचविण्यात आले़ त्यानुसार हेल्मेटसक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते़. 
त्यातूनच पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमधील वाहतूक विभागाच्या अधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी ही सक्ती लागू केली आहे़.  
हेल्मेटसक्ती आताच लागू करण्यामागे शासनाच्या तिजोरीत खडखडाट असून मिळेल तेथून पैसे गोळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे़. त्यातून दारुवरील करात नववर्षाच्या अगोदर वाढ करण्यात आली होती़. हेल्मेटसक्ती करण्यामागेही हेच कारण असल्याचा आरोप हेल्मेटविरोधी कृती समितीने केला आहे़. त्यांच्या आरोपाला आधारही आहे़ एकट्या पुण्याचा विचार केला तर ६ डिसेंबर ते ३ जानेवारी या काळात वाहतूक पोलिसांनी तब्बल ३ कोटी ७० हजार रुपयांचा दंडात्मक कारवाई केली आहे़. ही एकट्या पुणे शहरातील आहे़ अहमदनगर, सोलापूरसह अगदी बुलढाणापर्यंतच्या छोट्या मोठ्या शहरात मोठ्या धडाक्यात हेल्मेट नसलेल्यांवर कारवाई केली जात आहे़. संपूर्ण राज्याचा विचार केल्यास ही एका महिन्यात शासनाच्या तिजोरीत कोटयावधीची रक्कम जमा झाली असेल़. 
 शहरात २०१८ मध्ये २४० प्राणघातक अपघात झाले होते़. त्यात २५३ जणांचा मृत्यु झाला होता़. त्या २५३ पैकी १८४ जण दुचाकीस्वार होते़. त्यांनी हेल्मेट घातले असते तर त्यांचा प्राण वाचू शकला असता असा दावा पोलिसांकडून केला जातो़. यंदा या प्राणघातक अपघातात ५० टक्के कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी जाहीर केले आहे़. 
पोलीस आयुक्तांनी केलेला निर्धार चांगला आहे़. पण तो केवळ हेल्मेटसक्तीनेच साध्य होऊ शकतो. हे अर्धसत्य वाटते़ प्रत्यक्ष वास्तवातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे़. दुचाकीस्वारांचे हे अपघात होतात, त्यातील बहुतांश अपघात हे रस्त्यावरील वाहतूक कमी झालेली असताना रात्री ८ नंतर व पहाटेच्या वेळेस झालेले आहेत़. तेही ज्या रस्त्यावर दुचाकी वाहने वेगाने जातात. त्याठिकाणी हे अपघात झाले आहेत़. दिवसभर हेल्मेटसक्ती राबविल्यानंतर तरुणाई रात्री रस्त्यावर पोलीस नसताना हेल्मेट घालेलच असे नाही़. त्यामुळे वेगाने जाताना दुभाजकाला धडकून, गाडी स्लिप होऊन झालेल्या अपघातातील काही जणांचे प्राण वाचू शकतील, हे नक्की़ अपघात कधी होईल हे सांगता येत नाही़. त्यामुळे स्वत:च्या सरंक्षणासाठी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे़. हेही खरे आहे़. पण त्यासाठी जबरदस्ती केल्याने आणखी नवे प्रश्न निर्माण होतील. त्याचा या सक्तीत विचार केला गेलेला नाही़.हेल्मेटग्रस्त रुग्ण हा नवा प्रकार पुढे येऊ शकतो.
शहरात सध्या सिमेंटचे रस्ते करण्याची टुम निघाली आहे़. या रस्त्यावर अपघात झाल्यास डोक्याला लागल्यास मृत्यु येणे अटळ म्हणावे लागेल़. मात्र, शहरातील हे रस्ते हेल्मेट घालून बाईक चालविण्याइतके सुरक्षित निश्चितच नाही़. सिमेंटचा रस्ता असल्याने वाहनचालका बऱ्यापैकी वेगात असतात़. या रस्त्यांवर सर्व्हिस लाईनसाठी काही अंतरावर सिमेंट ब्लॉक लावलेले असतात़. हे काही दिवसातच खाली वर होतात़. त्यातून वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला हलकासा झटका बसतो़. हेल्मेट डोक्यावर असेल तर हा हलकासा झटका नकळत मानेला बसत असतो़. 
शहराच्या उपनगरामध्ये अजूनही रस्ते म्हणजे दिव्य अशी परिस्थिती आहे़. काही ठिकाणी तर स्प्रिडब्रेकर म्हणून डांबराचा मोठा ढिग उभा केलेला असतो आणि हेही थोड्या थोड्या अंतरावर असे अशास्त्रीय अनेक स्पिडब्रेकर टाकलेले दिसून येतात़. त्याबरोबर रस्त्यावर आडवे खोदकाम केल्याने जागोजागी रस्त्यांवर लांबलचक खड्डे पडलेले असतात़. या रस्त्यांवरील स्पिडब्रेकर ओलांडून जाताना ते स्पिडब्रेकर नाही तर व्हाईकिल ब्रेकर असल्याचे वाटते़. यावरुन जाताना हेल्मेटचा भार सहाजिकच मानेवर येतो़. कात्रज -कोंढवा - उरुळी या बायपास रोडचे एक उदाहरण घेतले तर आपल्या लक्षात येईल. हा रस्ता नक्की कोठे आहे व खड्डा कोठे आहे हे शोधावे लागते़ अशा रस्त्यावरुन दिवसातून दोनदा जाणाऱ्या व डोक्यावर हेल्मेट बाळगत जाणाऱ्या दुचाकीस्वारांना काही महिन्यात नक्कीच मानेचा व पाठीच्या मणक्याचा त्रास होऊ शकेल अशी एकंदर रस्त्याची परिस्थिती आहे़. त्यामुळे एकीकडे हेल्मेटसक्तीमुळे काही प्राणघातक अपघात कमी होतीलही पण त्याचवेळी वर्षभरात काही हजार लोकांना कायमचे मानेचे व पाठीचे दुखणे मागे लागेल, या वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही़. हेल्मेटसक्तीचा विचार करताना याबाबींकडेही दुर्लक्ष करुन जाणार नाही.
................
पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम यांनी आयुक्तपदी आल्यानंतर वाहतूक समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. त्यानंतर आता अचानक हेल्मेटचा विषय प्राधान्यक्रम बनविण्यात आला. त्यामुळे वाहतूक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.

Web Title: why Helmet's compulsary now ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.