विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास : ढासळले भगव्या किल्ल्याचे बुरुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:17 AM2017-09-16T00:17:24+5:302017-09-16T00:18:28+5:30

विशाल बहुमतासह मोदी सरकार २०१४ साली केंद्रीय सत्तेत विराजमान झाले. या देदीप्यमान विजयाचे खरे शिल्पकार होते देशातले तरुण मतदार. आयुष्यातला निराशेचा काळ संपेल, उज्ज्वल भवितव्याला साद घालता येईल, शिक्षण, रोजगार यासह विविध क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील, नरेंद्र मोदी त्यासाठी नक्कीच काही तरी करतील, या आशेने देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठातल्या तरुण विद्यार्थ्यांनी भाजपला भरभरून मतदान करीत केंद्रीय सत्तेत परिवर्तन घडवले.

Students' disillusionment: Debrised Saffron Fort bastion | विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास : ढासळले भगव्या किल्ल्याचे बुरुज

विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास : ढासळले भगव्या किल्ल्याचे बुरुज

Next

- सुरेश भटेवरा
(राजकीय संपादक, लोकमत)
विशाल बहुमतासह मोदी सरकार २०१४ साली केंद्रीय सत्तेत विराजमान झाले. या देदीप्यमान विजयाचे खरे शिल्पकार होते देशातले तरुण मतदार. आयुष्यातला निराशेचा काळ संपेल, उज्ज्वल भवितव्याला साद घालता येईल, शिक्षण, रोजगार यासह विविध क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील, नरेंद्र मोदी त्यासाठी नक्कीच काही तरी करतील, या आशेने देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठातल्या तरुण विद्यार्थ्यांनी भाजपला भरभरून मतदान करीत केंद्रीय सत्तेत परिवर्तन घडवले. तथापि मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कालखंडात विद्यार्थ्यांचा भ्रमनिरासच झाला.
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात रोहित वेमुलाच्या दुर्दैवी आत्महत्येने सा-या देशाचे लक्ष वेधले. तेव्हापासून विद्यार्थ्यांमधे भाजप व संघपरिवाराच्या विरोधात संताप उफाळतो आहे. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांनी दीर्घकाळ संप केला मात्र संघाच्या दबावामुळे अखेरपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही. जेएनयूमध्ये भगव्या सत्तेने विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमारला कसे टार्गेट बनवले, त्याची कहाणी सा-या देशाने पाहिली व ऐकली आहे. जेएनयूमध्ये केवळ अभाविपचा प्रभाव वाढावा यासाठी डाव्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाºयांना देशद्रोही ठरवण्यात आले. जेएनयूच्या कुलगुरुपदी जगदीश कुमारांसारख्या वादग्रस्त व्यक्तीला बसवण्यात आले. सरकारच्या हस्तक्षेपाचे पडसाद जामिया मिलिया, अलिगड मुस्लीम विद्यापीठातही उमटतच होते. विद्यार्थी वर्गाचा मनस्ताप वाढवणाºया अशा अनेक घटना देशभर विविध भागात सलग तीन वर्षे घडत होत्या. त्यातून उसळणाºया संतापाचा उद्रेक कुठेतरी व्यक्त होणे अपेक्षितच होते. राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्ये व ईशान्य भारतात विद्यापीठांचा कानोसा घेतला तर भगव्या किल्ल्याच्या मजबूत भिंतींना आता जागोजागी भगदाडे पडू लागली आहेत. सत्तेची सारी शक्ती पणाला लावूनही किल्ल्याचे बुरुज ढासळायला सुरुवात झाली आहे. सत्तेचा मध्यंतर उलटून गेला आहे. मोदींची कथित लोकप्रियता आणि भाजपचा उतरत्या दिशेने काऊंटडाऊन सुरू झाले आहे.
पंतप्रधान मोदींनी नुकतेच एक सक्तीचे प्रवचन देशभरातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऐकवले. निमित्त होते स्वामी विवेकानंदाच्या ऐतिहासिक भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याचे. मोदींचे भाषण विद्यार्थ्यांनी ऐकलेच पाहिजे असा फतवा यूजीसी व विद्यापीठांनी म्हणे काढला होता. योगायोगाने त्याच दिवशी दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू)च्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अभाविपच्या चारही उमेदवारांना डाव्या पक्षांच्या विद्यार्थी नेत्यांनी पराभवाचे पाणी पाजले. पाठोपाठ दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या लक्षवेधी निवडणुकीत काँग्रेसप्रणीत एनएसयूआयच्या उमेदवारांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकली व तब्बल चार वर्षानंतर यशस्वी पुनरागमन केले. पंजाब, राजस्थान, उत्तराखंड आणि आसाम विद्यापीठांच्या विद्यार्थी संघाच्या ताज्या निवडणुकांमध्येही अभाविपच्या पदरी जागोजागी निराशाच आली. जयपूरच्या राजस्थान विद्यापीठात व बहुतांश संलग्न महाविद्यालयातही अभाविप उमेदवारांचा आजवरच्या इतिहासात सर्वात मोठा पराभव झाला. जोधपूर, अजमेर विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनीही अभाविपला नाकारले. उत्तराखंडातल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत भाजपच्या पक्षांतर्गत लाथाळ्या चव्हाट्यावर आल्या. गढवाल व कांगडी विद्यापीठात दारुण पराभवानंतर, अभाविप कार्यक र्त्यांनी भाजपच्या आमदार स्वामी यतिश्वरानंदांच्या घरावर हल्ला चढवला. त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. पंजाब विद्यापीठात एनएसयूआयने अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव अशा तिन्ही महत्त्वाच्या जागा जिंकून निवडणुकीत बाजी मारली. अभाविपचे पंजाबमधे खातेही उघडले नाही. आसामच्या गुवाहाटी विद्यापीठात आॅल आसाम स्टुडंटस युनियन (आसू)चे यशस्वी पुनरागमन झाले. विद्यार्थी संघाचा अध्यक्ष व सचिवपदासह ‘आसू’ने आठ जागा जिंकल्या. एनएसयूआय, कृषक मुक्ती संग्रामच्या विद्यार्थी शाखेला प्रत्येकी दोन व अपक्षाला एक जागा मिळाली. राज्यात भाजप सत्तेवर असूनही अभाविपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.
भारतासारख्या लोकशाही देशात वैचारिक मतभेद हा तरुणाईचा आत्मा आहे. वैचारिक मंथनातूनच नवी पिढी घडत असते. विरोधी विचार ऐकूनच घेणार नाही. केवळ मोदी सरकारचे गुणगान गाणारे देशभक्त आणि विरोधाचे सूर व्यक्त करणारे देशद्रोही अशी अहंकारी दहशत विद्यार्थी वर्गावर लादली तर ते का सहन करतील? ‘जेएनयूच्या कॅम्पसमधे पॅटन रणगाडे तैनात करायला हवेत’, असे अकलेचे तारे कुलगुरू जगदीश कुमार यांनी मध्यंतरी तोडले. जेएनयूच्या माजी विद्यार्थिनी निर्मला सीतारामन आता संरक्षण मंत्री झाल्या आहेत. कुलगुरूंची मागणी बहुदा त्या मान्यही करतील. कर्नाटकसह देशाच्या विविध भागात नैतिकतेच्या नावाखाली संघपरिवाराचे विद्यार्थ्यांवर मॉरल पुलिसिंग सुरू आहे.पंतप्रधान मोदी एकीकडे देशाला बुलेट ट्रेनची स्वप्ने विकतात तर दुसरीकडे प्राचीन संस्कृतीचे दाखले देत देशातल्या तरुणाईवर अश्मयुगातले संस्कार लादण्याचा खटाटोप चालतो. सत्तेची यंत्रणा आणि मुबलक पैसा त्यासाठी खर्च केला जातो. विद्यार्थी वर्गापासून ही बाब कितीकाळ लपून राहील? कधी ना कधी त्याचा उद्रेक होणारच. उत्तर आणि ईशान्य भारतातली विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थी संघाच्या ताज्या निवडणुकांचे निकाल त्या दृष्टीने केवळ महत्त्वाचे नाहीत तर पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. डावे पक्ष व एनएसयूआय सारख्या विद्यार्थी संघटनांनी या निवडणुकीत यश मिळवले मात्र एकाही पक्षाचा उमेदवार मान्य नाही अशा (नोटा)चा मोठ्या प्रमाणावर वापर अनेक विद्यार्थ्यांनी या निवडणुकीत केला ही बाब सर्वच राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांना विचार करायला लावणारी आहे.
केजरीवालांच्या ‘आप’ने दिल्लीच्या बवाना विधानसभा मतदारसंघात अलीकडेच भाजप उमेदवाराचा दुपटीहून अधिक मतांनी पराभव केला. ‘आप’च्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेला उसना उमेदवार भाजपने इथे उभा केला होता. सत्तेसाठी भाजपमधे ऐनवेळी भरती झालेल्यांना लोक कठोरपणे नाकारतात, हे सत्य देखील या निमित्ताने अधोरखित झाले. जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठात अभाविपला यश मिळाले नाही. अन्य राज्यातही पराभवाचे तोंड पहावे लागले. तरुण मतदारांनी संघाची विद्यार्थी शाखा अभाविपला का नाकारले? विविध राज्यातल्या विद्यापीठांमधे लक्षावधी विद्यार्थी मतदारांनी दिलेला हा ताजा कौल दुर्लक्ष करण्यासारखा नाही. भाजपने खरे तर पाच पैकी चार राज्यात सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दिल्लीत तिन्ही महापालिकांची निवडणूकही याचवर्षी जिंकली. इतक्या मोठ्या यशानंतर अवघ्या काही महिन्यात भाजपच्या यशाला अशी उतरती कळा का लागावी? भगव्या किल्ल्याचे बुरुज जागोजागी का ढासळत आहेत? याचे सखोल चिंतन आजन्म सत्तेत राहण्याची आकांक्षा असलेल्या मोदींना व भाजपला करावेच लागेल.
 

Web Title: Students' disillusionment: Debrised Saffron Fort bastion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.