लोकांएवढेच सरकारही बुवाबाजीचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 03:36 AM2017-08-29T03:36:17+5:302017-08-29T03:36:45+5:30

साधुत्वाचे ढोंग लोक व सरकार यांना सत्याएवढाच न्यायाचा विसर कसा पाडू शकते याची जाणीव गुरूमीत राम रहीम या गुन्हेगार संताळ्याला सुनावण्यात आलेल्या वीस वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेने साºयांना करून दिली आहे

The same government is the victim of spoilage | लोकांएवढेच सरकारही बुवाबाजीचे बळी

लोकांएवढेच सरकारही बुवाबाजीचे बळी

Next

साधुत्वाचे ढोंग लोक व सरकार यांना सत्याएवढाच न्यायाचा विसर कसा पाडू शकते याची जाणीव गुरूमीत राम रहीम या गुन्हेगार संताळ्याला सुनावण्यात आलेल्या वीस वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेने साºयांना करून दिली आहे. एक बहुरुपी बुवा सा-या देशाला आणि त्यातील सरकारांना दोन दशकांहून अधिक काळ फसवितो, आपल्या सोंगांच्या बळावर हजारो कोटींची माया जमवितो, देशातील अनेक राज्यांत आपले ‘आश्रम’ उभे करतो, कोट्यवधींच्या संख्येने अनुयायांची फौज आपल्या मागे उभी करतो, साध्वी म्हणून आश्रयाला आलेल्या स्त्रियांचे लैंगिक शोषण करतो, टीका करणाºया पत्रकारांचे मुडदे पाडतो आणि एवढे करूनही त्याच्यावरचा आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा होते तेव्हा त्याच्या अनुयायांच्या फौजेसमोर देशाचे सरकार, सैन्यबळ, राखीव व अन्य पोलीस यंत्रणा हतबल होताना दिसतात तेव्हा ती असत्याने सत्याच्या केलेल्या पराभवाची लाजीरवाणी कथा होते. या गुरुमीतने आपला लैंगिक छळ केला अशी तक्रार त्याच्याच आश्रमात धर्मसेवेसाठी आलेली एक तरुण मुलगी २००२ मध्ये तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे करते आणि नंतरची १५ वर्षे त्या तक्रारीची नुसती चौकशी चालते, हा घटनाक्रम आपल्या तपास यंत्रणा केवढ्या कूर्मगतीने चालतात ते सांगणारा आहे. या काळात हा बुवा संपत्ती जमवितो, अंधानुयायांची फळी उभारतो, सरकारातील व विरोधी पक्षातील पुढाºयांना आशीर्वाद देतो, निवडणुकीत एखाद्या पक्षाच्या बाजूने प्रचार करतो (२०१४ च्या निवडणुकीत त्याने नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजप हा पक्ष यांचा प्रचार केला), त्याच्या ढोंगाची जाणीव झाल्यानंतरही सुशिक्षित स्त्रीपुरुषांचे वर्ग त्याच्या सच्चाईची ग्वाही देताना दिसतात, हा सारा प्रकार केवळ अंधश्रद्धेचा वा बुवाबाजीचा नाही. तो एका राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक अशा सामुदायिक गुन्हेगारीचा प्रकार होतो. त्याचे ढोंग न्यायासनासमोर उघड होत असताना सरकारच घाबरताना दिसते. त्याचा निकाल लागण्यापूर्वी संबंधित न्यायासन ज्या पंचकुला या गावात असते त्या गावाचे लष्करी छावणीत रूपांतर केले जाते. सैन्याची पथके तेथे तैनात केली जातात. पोलिसांच्या अनेक तुकड्या साºया गावात गस्त घालत असतात. हरियाणा हे सारे राज्य पोलीस यंत्रणेच्या कडक निगराणीखाली ठेवले जाते. अनेक शहरांत १४४ हे कलम लावले जाते आणि तरीही या गुरुमीतचे लक्षावधी अनुयायी पंचकुलात जमतात. त्यांच्याजवळ एके ४७ पासून पेट्रोल बॉम्बपर्यंतची सगळी हत्यारे असतात आणि हे सारे पोलिसांच्या डोळ्यादेखत होत असते. न्यायासनाने गुरुमीत गुन्हेगार असल्याचे घोषित करताच त्याच्या गुंड अनुयायांचा वर्ग हिंसेवर उतरतो. तो शंभरावर गाड्या जाळतो, लष्करावर आणि पोलिसांवर दगडफेक करतो. पोलिसांकडून लाठीमार, अश्रुधूर आणि अखेर गोळीबार केला जातो. त्यात ३२ माणसे मरतात. हरियाणाचे सरकार तेव्हा मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली परिस्थितीचा नुसताच विचार करीत हतबुद्ध झालेले दिसते. या प्रकारावर चिडून जाऊन भाष्य करताना एक न्यायमूर्ती म्हणतात, खट्टर हतबल असतील तर मोदी काय करतात? त्यांच्यावर हरियाणाची जबाबदारी आहे की नाही? तात्पर्य, गुरुमीत राम रहीमने हरियाणा सरकारएवढाच केंद्र सरकारचाही पराभव केला असतो. नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे जनतेला शांत राहण्याचा उपदेश करतात आणि आमचे सरकार जराही हिंसाचार खपवून घेणार नाही ही या आधी दोन डझन वेळा वापरलेली इशारेवजा भाषा पुन्हा वापरतात. देशातली सरकारे त्यातील गुन्हेगारीपासून जनतेच्या जीविताला व मालमत्तेला संरक्षण देऊ शकत नाही याचाच पुरावा या हिंसाचारातून देशाच्या हाती आला असतो. गुरुमीतला शिक्षा सुनावण्याआधी एका विशेष हेलिकॉप्टरमधून रोहतकच्या तुरुंगात नेले जाते. त्याचा निकाल द्यायला प्रत्यक्ष न्यायाधीश पुन्हा विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात जातात. त्या तुरुंगातच मग कोर्ट भरविले जाते. या कोर्टात गुरुमीतला वीस वर्षांची शिक्षा व ३० लाखांचा दंड सुनावला जातो. मात्र बाहेर सारे जीव मुठीत धरून असतात. लोक घाबरलेले आणि सरकारही बावरलेले दिसते. अशा वेळी सामान्य माणसांच्या मनात येणारा प्रश्न असा की, एका ढोंगी बाबाच्या बंदोबस्तात जे कमी पडतात ते देशाचे संरक्षण कसे करतील? देश साक्षर आहे, त्यातली मोठ्या संख्येएवढी माणसे पदवीधर व जाणकार आहेत. ती सरकारे निवडणारी आहेत आणि तरीही ती एका लफंग्या बुवाच्या मागे जाऊन सरकार, देश, जनता, न्याय आणि सुरक्षा वेठीलाही धरताना दिसत आहेत यातील विसंगती साºयांची मती गुंग करणारी आहे. अंधश्रद्धेविरुद्ध साध्या गंडेदोरे विकणाºया बैराग्यांशी लढण्यापेक्षा समाज व देश यांना वेठीला धरू शकणाºया या अब्जाधीश बुवा, बाबा व बापूंविरुद्धच चालविण्याची आता गरज आहे. योगायोग हा की, या निकालाच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूविरुद्ध दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात संबंधित मुलीचे बयान गुजरात सरकारने अजून का घेतले नाही, अशी फटकारेवजा विचारणा केली आहे. माणसेच बुवांच्या मागे लागतात असे नाही, सरकारेही बुवाबाजीला बळी पडतात याचा हा नमुना आहे.

Web Title: The same government is the victim of spoilage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार