राम मंदिर की रामराज्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 06:22 AM2018-11-27T06:22:55+5:302018-11-27T06:23:17+5:30

रामाने लंका जिंकल्यानंतर ती बिभीषणाच्या हाती सोपविली. त्याला सत्तेची हाव नव्हती. आता विरोधक संपुष्टात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दमन नीती अवलंबली जाते. विरोधक नको असतात.

Ram Rajya Ram temple? | राम मंदिर की रामराज्य?

राम मंदिर की रामराज्य?

Next

संकटसमयी राम आठवला तर त्यात नवल काय? आता तर निवडणुकाच तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच रामाची आठवण होणे साहजिकच आहे. नाही तरी भुताखेतांची भीती वाटताच रामरक्षा आठवते तसाच हा प्रकार. म्हणून देशाच्या राजकारणाचे सारे ध्रुवीकरण राम आणि राम मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहे. शिवसेनेने थेट अयोध्येवर ‘स्वारी’ केली आणि भाजपाला चिमटीत पकडले. हे वरवरचे आहे की खरोखरच मंदिराचा कळवळा हे लवकरच स्पष्ट होईल; पण थोरल्या पातीने अयोध्येची वाट धुंडाळली त्या वेळी धाकट्या पातीने रामराज्याचे व्यंगचित्र काढून या ‘स्वारी’तील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

या व्यंगचित्रातून ‘रामराज्य’ मागितले होते ‘राम मंदिर’ नव्हे, असे सांगण्यात आले. थोडक्यात, रामराज्य म्हणजे रामाचे राज्य नव्हे तर राम जीवनभर जी मूल्ये घेऊन जगला त्याचा आविष्कार. रामराज्यात राजा आणि प्रजा सारे समान होते. जात, कर्म या आधारावर कोणाचे शोषण होत नव्हते. रामाने शबरीची उष्टी बोरे चाखली ही कृती समानतेची होती. आजच्या गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकीय नेत्याचे वर्तन असेच आहे का? रामराज्यात राजाची प्रजेला भीती, दहशत वाटत नाही. राजा हा लोकसेवक असतो, लोक त्याच्यावर उघड टीका करू शकतात. आज राजकीय नेत्याच्या विरोधात उभे राहणाऱ्या सामान्य माणसाची काय अवस्था होते? सरकारच्या विरोधात भूमिका घेणाºया पत्रकारांची कशी ‘व्यवस्था’ लावली जाते, हे आम्ही पाहिलेच आहे. राजाची खप्पा मर्जी होईल म्हणून अनेक मंत्रीसुद्धा गप्प बसणे पसंत करतात. होयबा संस्कृतीचा सर्वत्र बोलबाला दिसतो. स्त्रीदाक्षिण्य हे रामराज्याचे वैशिष्ट्य. असहाय्य अहिल्येला रामाने मदत केली तर मर्यादा ओलांडणाºया शूर्पणखेला शिक्षा दिली. वर्तमानकाळात देशात महिला सुरक्षित आहेत का? त्यांना निर्भयपणे जगता येत आहे का? जागतिक अहवालाने वास्तव उघड केलेच आहे. रामराज्यात शांतता महत्त्वाची असल्याने युद्ध, अत्याचाराच्या विरोधात राजा असतो. देशात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. एका अर्थाने हे राजकीय युद्धच म्हणता येईल.

रामराज्याच्या कल्पनेप्रमाणे निवडणुकीपूर्वी आणि नंतरही देशात शांतता राखणे हे राजाचे कर्तव्य; पण निवडणुकीपूर्वीच अशांतता निर्माण होते, समाजात दुही माजविण्याचे प्रयत्न होतात. धर्म, जातीच्या आधारावर मतांचे विभाजन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतात. रामराज्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि कला या विषयांना विशेष प्राधान्य दिले जाते. जनतेला चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. पण आजचे चित्र एकदम विपरीत आहे. शिक्षण, आरोग्य या दोन्ही गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दोघांचाही दर्जा घसरला. उपचाराअभावी मृत्यूच्या घटना घडतात. या दोन गोष्टी समाजातील प्रभावी व श्रीमंतांसाठीच आहेत असे दिसते. रामाला वनवासात जाण्याची आज्ञा झाली त्या वेळी सीतेने राज्यकारभार करावा असे रामाने सुचविले. यातून रामाने रामराज्यातील स्त्रियांचे स्थान स्पष्ट केले होते. आजचा ताजा संदर्भ म्हणजे गेल्या वीस वर्षांपासून भाजपाच्या नेत्या म्हणून वावरणाºया सुषमा स्वराज यांनी लोकसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला.

गेली साडेचार वर्षे त्या नामधारी परराष्ट्रमंत्री आहेत हे दिसतेच. ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ म्हणजे चुकीच्या कामासाठी आश्वासनांची साखरपेरणी नको, हे रामराज्याचे ब्रीदवाक्य. चार वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने ही केवळ सत्ता संपादनासाठी साखरपेरणी होती हे सिद्ध झाले. रामाने वनवासाचा बहुतांश काळ पंचवटीत व्यतीत केला त्या एकमेव सत्ता असलेल्या नाशकातही रामराज्य आणता आले नाही. इथे सत्ता कोणाची, तर मनसेची. सेनेला सल्ला देणाºया व्यंगचित्रकारांना स्वत:च्या नाशकातही ते जमले नाही. इथे भाजपाने तर काय केले? जनतेच्या हितासाठी झटणाºया तुकाराम मुंढेंना बदलीची शिक्षा दिली. आजही राजकारणाच्या केंद्रस्थानी सामान्य माणूसच आहे. सगळ्या योजना सरकार त्यांच्यासाठीच राबवताना दिसते; पण लाभ त्याला मिळत नाही. त्याच्या योजनांच्या कुरणात चरणारे वळू वेगळेच असतात आणि रामराज्यात त्यांना स्थान नसते.

 

Web Title: Ram Rajya Ram temple?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.