जैवविविधता जास्त तेथील लोक आनंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 05:08 AM2019-03-14T05:08:15+5:302019-03-14T05:10:43+5:30

आपल्यामुळेच जर आपले भविष्य वाचवायचे असेल, तर तिचे संकट आपले मानले पाहिजे व त्यासाठी उपाययोजना करून त्या कृतीमधून प्रत्येकाने अंमलात आणायला हव्यात.

people are more happy where biodiversity is more | जैवविविधता जास्त तेथील लोक आनंदी

जैवविविधता जास्त तेथील लोक आनंदी

Next

- डॉ. महेश गायकवाड
(पर्यावरण तज्ज्ञ, निसर्ग जागर प्रतिष्ठान)

जिथे जैवविविधता जास्त तेथील लोक जगात सर्वात जास्त आनंदी व समाधानी, आपला श्वास, आपली तहान, आपली भूक भागविणारी. निसर्गातील व्यवस्था म्हणजे आपली जैवविविधता, अशी सरळ व्याख्या केली, तरच आपल्याला समजेल आणि आज तीच जैवविविधता संकटात आहे. आपल्यामुळेच जर आपले भविष्य वाचवायचे असेल, तर तिचे संकट आपले मानले पाहिजे व त्यासाठी उपाययोजना करून त्या कृतीमधून प्रत्येकाने अंमलात आणायला हव्यात.

पृथ्वीवरील जिवांची विविधता म्हणजे जैव विविधता़ ज्यामध्ये निर्मिती आणि जटिलता असते. पृथीवर विविधता जास्त आहे़ त्यामुळे ती जिवंत आहे. पृथ्वीवरील सर्वात जास्त जटिल असलेली जैवविविधता ठळकपणे आपले भविष्य आहे़ मानवता टिकवायची असल्यास, आपल्याला जैवविविधता टिकविली पाहिजे, असे मत आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रो.डेविड मकडोनाल्ड यांनी मांडले. १९८५ पासून त्यांची टीम सातत्याने जैविक विविधता विषयक संशोधन करीत आहे़ यात जगातील जैवविविधता अतिशय वेगाने नष्ट होत असल्याचा निष्कर्ष आहे़ दुसरीकडे समांतर संकटे आपल्यासमोर येत आहेत़ त्यातील एक म्हणजे वातावरणातील बदल. अगदी सहजपणे सांगायचे, तर गुणसूत्रे, प्रजाती, अन्नसाखळी, अनेक परिसंस्था आणि त्यातील अजैविक पर्यावरण यांचाशी असलेले नाते़ अश्या विविध सहजीवनामुळे पृथ्वीवरील अधिवास अनेक लाखो जिवांना राहण्यासाठी लाखो वर्षे अस्तित्वात आहे.

अलीकडच्या काळात अनेक संशोधक तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत की, ‘आपल्या जीवनातील पुस्तकालय नष्ट होत आहे.’ आपल्यापैकी अनेक जण शहरात, गावात राहत आहेत आणि वन्यजीवन हे टीव्हीवर पाहत असतात़, पण आपले अन्न, पाणी आणि श्वास हा फक्त जैवविविधतेवर अवलंबून आहे. आपण पहिले तर वनस्पतीशिवाय आॅक्सिजन नाही आणि मधमाश्यांशिवाय परागीकरण नाही व पुढे फळे आणि बिया नाहीत.

मुंग्या आणि वाळवीची वारुळे म्हणजे एखादे गावच. या मुंग्या जगभरात भूभागावर प्रती हेक्टरी २ ते ३ लाख एवढ्या प्रमाणात आहेत, त्यामुळेच आपण शेती करू शकतो़ वारुळे नष्ट करण्यासाठी काही जण सरसावतात़ जिवंत झाडाला कधीही वाळवी लागत नाही, जर निसर्गात झाड आजारी पडले, तरच त्यावर वाळवी आणि मुंग्या ताव मारताना दिसतात. हे सत्य लोकांना माहिती नसल्यामुळे आपले महत्त्वाचे मित्रकीटक कायमचे नष्ट होत आहेत. वटवाघूळ रात्रभर झाडांच्या बिया खाऊन निसर्गात सर्वत्र विस्तारीकरण करण्याचे महत्त्वाचे काम करीत असतात, शिवाय त्यांच्याकडून झाडांच्या अतिशय शक्तिशाली बियाच निसर्गात टाकल्याने झाड निरोगी व दुष्काळाशी सहजपणे सामना करू शकतात, तसेच रात्रभर कीटकांना खाऊन शेतीचे होणारे नुकसान टाळले जाते, हेच बहुतांश लोकांना माहिती नाही.

अगदी एक चमचाभर मातीत १०,००० ते ५०,००० विविध जातीचे जीवाणू सापडतात, इतकी विविधता आपल्या मातीत आहे, याकडे कानाडोळा करून चालणार नाही, हे नष्ट होण्याअगोदर वेळीच सर्वांनी लक्ष्यात घेणे गरजेचे आहे़ प्रजाती नष्ट होणाचा वेग हा मानवाच्या पृथ्वीवरील अस्तित्वानंतर १,००० पट जास्त असल्याचे दिसून येत आहे.

आपण जर कीटकांचे जग नष्ट करणार असाल, तर प्रत्येक अन्नसाखळी नष्ट होणार हे नक्की, आज तरी आपल युद्ध परिसंस्था नष्ट करण्यासाठीच सुरू आहे़, हे वेळीच थांबले पाहिजे. आपल्याला वनाचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे़ यात शाश्वत पर्यटन आणि स्थानिक लोकांचे वन्यजिवाकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी पुरेशी भरपाई देणे अत्यावश्यक आहे. कारण आता वन्यजीव आणि शेतकरी संघर्ष शिगेला पोहोचला आहे़ यावर शाश्वत उपाययोजन करावीच लागेल, अन्यथा वन्यजिवाचे अतोनात नुकसान होईल.

आफ्रिका खंडात काही दीड शहाणे पैसे देऊन शिकार करायला जातात, अशा पर्यटनाला बंद करण्याची वेळ आलेली आहे, अन्यथा प्राण्यांना मारून आर्थिक मदत घेणे म्हणजे महासंकटच. चोरटी शिकार आणि तस्करीच्या माध्यमातून जवळपास ३०० सस्तन प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत़ यात चिम्पांजी, गेंडे व वटवाघळे आहेत. समुद्रातील प्रदूषणामुळे डॉल्फिनसारखे मासे, तर अतिवाढ असलेल्या प्रजातीमुळे जगातील अनेक अधिवास नष्ट होत आहेत.

१९७० पासून जगातील ८१ टक्के गोड्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले आहेत़ त्यामुळे जैवविविधता वाढविण्यासाठी जगभर प्रयत्न झालेच पाहिजेत. एक वेळ वातावरण बदलाचे परिणाम उशिरा होतील आणि दिसतील़ मात्र, जैवविविधता नष्ट होत राहिल्यास, त्याचे परिणाम आताच दिसायला लागलेत आणि त्यानुसार अनेक आजार, विकार, आपल्याला भोगावे लागत आहेत. आपल्या नद्या, समुद्र, अनेक पानथळ जागा यावर होणारे प्रदूषण वाढत राहिल्यास, आपल्याला पुढील ५ ते १० वर्षांत परिणाम भोगावे लागतील. यावर उपाययोजना म्हणजे निसर्ग वाचायला शिकविणे आणि वाचविणे़ ही चळवळ जनमाणसात रुजविली पाहिजे़ प्रत्येक जण पर्यावरण साक्षर झालाच पाहिजे आणि पर्यावरणीय बुद्ध्यांक विकसित केलाच पाहिजे.

Web Title: people are more happy where biodiversity is more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.