सायबर हल्ले बदलतील पारंपरिक युद्धाचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:21 AM2019-03-05T04:21:12+5:302019-03-05T04:21:22+5:30

युद्ध म्हटले की शत्रूशी प्रत्यक्ष दोन हात करणारे भूदल-नौदल-हवाई दल यांमधील वीर जवान आणि त्यांना आदेश देणारी लष्करी कार्यालये उर्फ ‘हायकमांड’ अशी दोनच टोके सर्वसामान्य व्यक्तींच्या डोळ्यासमोर तरळतात.

The nature of the traditional war will change in cyber attacks | सायबर हल्ले बदलतील पारंपरिक युद्धाचे स्वरूप

सायबर हल्ले बदलतील पारंपरिक युद्धाचे स्वरूप

Next

- डॉ. दीपक शिकारपूर
युद्ध म्हटले की शत्रूशी प्रत्यक्ष दोन हात करणारे भूदल-नौदल-हवाई दल यांमधील वीर जवान आणि त्यांना आदेश देणारी लष्करी कार्यालये उर्फ ‘हायकमांड’ अशी दोनच टोके सर्वसामान्य व्यक्तींच्या डोळ्यासमोर तरळतात. हे स्वरूप आता वेगाने बदलत आहे. सर्व गोष्टी स्मार्ट व हायटेक होत आहेत. सायबर तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे तसेच युद्धही. संगणक आणि स्मार्टफोनचा वापर सर्वसामान्य नागरिकही मुबलक प्रमाणात करू लागण्याच्या दिवसांत अतिरेकी आणि नक्षलवादी त्यापासून दूर राहतील, अशी अपेक्षाच करणे चुकीचे आहे.
विविध समूहांदरम्यान संवाद साधणे, समन्वय राखणे, हाती असलेल्या सामग्रीचा आढावा घेणे, आपल्या हेतूंचा प्रचार करणे (त्याचबरोबर विरुद्ध पक्षाची मते खोडून काढणे), गुप्त माहिती मिळवणे, दडवणे, पसरवणे यांबरोबरच चक्क नोकरभरतीसाठीही नेट आणि तत्सम सुविधांचा वापर जगभरातील अतिरेकी संघटना करीत आहेत. सोशल नेटवर्क्सप्रमाणेच यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करण्याची पद्धतही त्यांच्यात वेगाने रुजते आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अतिरेकी संघटना आणि टोळ्यांना संगणकीय प्रणालींचा चांगलाच फायदा होतो. वेळ वाचतो, मनुष्यबळ वाचते, एखादी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताना उद्भवणारे संभाव्य धोके टळतात. सध्या अस्तित्वात असलेली ई-मेल खाती, वेबसाइट्स, ब्लॉग्ज यांचाही वापर ते खुबीने करून घेतात. लोकप्रिय साइट्सवरील जाहिरातींमधूनदेखील हे हुशार लोक चक्क गुप्त माहितीची देवाणघेवाण करीत असतात.
अशा उद्योगांसाठी गुप्तपणे आर्थिक साहाय्य देऊ करणाऱ्या अनेक व्यक्ती व संस्था अस्तित्वात आहेत. त्यामुळे आयटीमध्ये मिळणाºया वेतनाइतके किंबहुना बरेचदा त्यापेक्षा अधिक वेतन वा सवलती देऊन अतिरेकी संघटना सॉफ्टवेअर आणि प्रोग्रॅमिंग तज्ज्ञांची फौजच आपल्या पदरी बाळगून असतात. हॅकिंगची अशी कामे करणाºया काही तरुणांना तर आपण नक्की कोणासाठी काय स्वरूपाचे काम करीत आहोत आणि त्याचे परिणाम जगावर कशाप्रकारे होऊ शकतात याची कल्पनाही नसते. अशा परिस्थितीत, हल्ला यशस्वी होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेणे आणि प्रयत्न हे काम सर्वसामान्य नागरिकांपासून सरकारपर्यंत प्रत्येक जण करू शकतो.
या धोरणाचे दोन ठळक भाग पडतात. पहिला म्हणजे संगणकीय आणि माहिती तंत्रज्ञानासंबंधीच्या यंत्रणा आणि प्रणाली सुरक्षित बनवणे, अनधिकृत प्रवेश झालाच तर तो प्राथमिक पातळीवर असतानाच त्याचा मागोवा ठेवता येईल अशी व्यवस्था करणे, प्रणालीतील माहिती आणि इतर बाबींचा शक्य तितका बॅकअप घेऊन म्हणजे त्याची इलेक्ट्रॉनिक प्रत करून तो वेगळे संकेतन आणि ओळख पडताळणी असलेल्या दुसºया सिस्टीमवर ठेवणे. यासाठी शास्त्रज्ञ आणि संबंधित विषयांच्या तज्ज्ञांना अधिक संशोधनासाठी प्रोत्साहित करणे तसेच संशोधन आणि विकासासाठी (रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) भक्कम निधी मिळवून देणे आवश्यक आहे. हे संशोधन म्हणजे भावी सायबर सुरक्षिततेसाठी केलेली गुंतवणूक मानली जावी. हेरगिरीचे आणि युद्धाचे पारंपरिक स्वरूप झपाट्याने बदलले आहे हे खरे. विविध देश कोल्ड वॉरकडून कोड वॉरकडे जात असताना प्रत्यक्ष आघाडीवर, बंदुका-विमाने-रणगाडे इ. वापरून लढल्या जाणाºया चकमकींचे प्रमाण कमी होईल, तेवढेच राहील की सायबर युद्ध - संशयाच्या धुक्याआडून अधिकच वाढेल?
( संगणक साक्षरता प्रसारक)

Web Title: The nature of the traditional war will change in cyber attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.