नितीश : राजकीय अस्थिरतेचे नवे निर्माते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:54 AM2017-07-29T02:54:39+5:302017-07-29T02:55:52+5:30

बिहारच्या नितीशकुमारांनी महागठबंधन सोडून भाजपशी जो अनैसर्गिक घरठाव परवा केला त्याचे परिणाम त्या गठबंधनाएवढेच प्रत्यक्ष नितीशकुमार यांनाही यापुढच्या काळात अनुभवावे लागणार आहेत.

naitaisa-raajakaiya-asathairataecae-navae-nairamaatae | नितीश : राजकीय अस्थिरतेचे नवे निर्माते

नितीश : राजकीय अस्थिरतेचे नवे निर्माते

Next

बिहारच्या नितीशकुमारांनी महागठबंधन सोडून भाजपशी जो अनैसर्गिक घरठाव परवा केला त्याचे परिणाम त्या गठबंधनाएवढेच प्रत्यक्ष नितीशकुमार यांनाही यापुढच्या काळात अनुभवावे लागणार आहेत. लालूप्रसाद यादवांच्या चिरंजीवांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे आणि तरीही ते मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यायला तयार नसल्याचे कारण पुढे करून नितीशकुमारांनी राजीनामा देणे हा प्रकार त्यांची नैतिकता सिद्ध करणारा आहे असे अनेकजण म्हणतील. मात्र त्याचे खरे कारण नितीशकुमारांजवळ असलेल्या आमदारांहून लालूप्रसादांजवळच्या आमदारांची संख्या मोठी असणे आणि ते दूर होताच आपण अल्पमतात येऊ याची त्यांना जाणीव असणे हे आहे. राजीनामा देण्याआधी त्यांची भाजप व मोदी यांच्याशी अनेकवार बोलणी झाली आणि त्यांच्या मदतीने आपण बहुमतापर्यंत पोहचू शकतो याची खात्री त्यांना पटली. त्यानंतरच त्यांनी त्यांचे ‘नैतिक’ पाऊल उचलले आहे. त्यांच्या नव्या सरकारला भाजपच्या मदतीशिवाय यापुढे एकही पाऊल टाकता येणार नाही हे यापुढचे वास्तव आहे. लालूप्रसाद व महागठबंधन यांच्यासोबत बनविलेल्या सरकारात ते जेवढे स्वतंत्र होते तेवढे ते यापुढे राहू शकणार नाहीत. काश्मिरात मेहबुबा मुफ्तींचे सरकार भाजपच्या मदतीने सत्तेवर आहे. मेहबुबांचे आमदार अधिक आहेत पण त्या स्वतंत्र मात्र नाहीत. त्यांना दरपावली भाजपचीच नव्हे तर संघाचीही आगाऊ संमती घ्यावी लागते. नितीशकुमारांचे नवे सरकारही तसेच भाजपच्या किल्लीने चालू होणारे व थांबणारे राहील. त्यातून नितीशकुमारांनी संघ परिवाराचा रोष स्वत:वर फार पूर्वी ओढवून घेतला आहे. मोदींनी भारत ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची घोषणा केली तेव्हा भारत ‘संघमुक्त’ करण्याची गर्जना करून नितीशकुमारांनी त्यांना उत्तर दिले होते. संघ ही अशा गोष्टी विसरणारी संघटना नाही. केंद्र सरकारातली अनेक महत्त्वाची पदे अनुभवलेले नितीशकुमार आता बिहारचे सहाव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या ‘स्वतंत्र’ बुद्धीचा इतिहास मोठा आहे. ते वाजपेयींच्या मंत्रिमंडळात होते आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारातही होते. ते लालूंच्या विरोधात होते आणि त्यांच्या बरोबरही होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मत दिले तर उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवाराला ते मत देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. असा स्वतंत्र बुद्धीचा व शहाणा माणूस क्रमाने साºयांचाच विश्वास गमावत असतो. संघ ही अशा माणसाचा भरवसा धरणारी संघटना नाही. ती शंभर टक्क्यांएवढी शरणागतता मागणारी यंत्रणा आहे. त्यामुळे नितीशकुमारांचे उंडारणे यापुढे थांबेल. तसे ते थांबविणे तूर्त त्यांच्या फायद्याचेही आहे. ते भाजपसोबत जाण्यामुळे भाजप अधिक शक्तिशाली होईल. कदाचित २०१९ ची निवडणूकही त्यामुळे त्याला आपल्या पदरात पाडून घेता येईल. मात्र या घटनेमुळे नितीशकुमार हे यापुढे देशातील कोणाला विश्वसनीय वाटणारे पुढारी राहणार नाहीत. समाजवादी विचारसरणी व जयप्रकाश आणि लोहिया यांची नावे घेत आयुष्यभर राजकारण करीत आलेले आणि त्याचसाठी देशातील धर्मांध शक्तींना विरोध करीत धर्मनिरपेक्ष राजकारणाची सोबत करणारे नितीशकुमार एकाएकी भगव्या रंगाने रंगलेले पाहणे हे त्यांच्या विरोधकांएवढेच चाहत्यांना आणि सामान्य माणसांनाही अवघड ठरणार आहे. राजकारणात मित्र बदलतात आणि शत्रूही बदलतात. त्यांचे तसे बदलणे समाजाला समजतेही. मात्र समाजाला न समजणारी बाब त्यातील माणसांच्या मूल्यांतराची आहे. नेते आयुष्यभर जपलेली मूल्ये सोडतात आणि नवी मूल्ये धारण करतात तेव्हा तो साºयांनाच धक्का देणारा प्रकार होतो. प्रश्न लालूप्रसादांचा नाही. ते अनेक आरोपांचे शिकार बनलेले पुढारी आहेत. कदाचित पुढल्या काळात त्यांच्यावर आणखी काही गुन्हे दाखल होतील. त्यातले काही खरे असले तरी तो अनेकांना त्यांच्या घेतल्या जाणाºया राजकीय सूडाचा प्रकार वाटेल. मेहबुबा मुफ्तींविषयी जो अविश्वास आज काश्मिरात आहे त्याचा अनुभव नितीशकुमारांनाही येईल. एक गोष्ट मात्र नितीशकुमारांनी देशाला चांगली सांगितली आहे. या देशातला कोणताही प्रादेशिक वा राष्ट्रीय स्तरावर एकट्याने राजकारण करू पाहणारा नेता खरा नाही आणि तो विश्वसनीयही नाही. मेहबुबा मुफ्ती किंवा शंकरसिंग वाघेला ही याची जशी उदाहरणे आहेत तशी ती महाराष्ट्रासकट देशात अन्यत्रही सापडणारी आहेत. अशा राजकारणी माणसांमुळे सरकार व देश स्थिर होत नाही आणि त्याच्या स्थैर्याचा लोकांनाही विश्वास वाटत नाही. नितीशकुमार यांची आजवरची लोकमानसातील प्रतिमा एका मूल्यनिष्ठ पुढाºयाची आहे. त्यांनी आजवर धर्मांधतेला केलेला कडवा विरोध साºयांच्या स्मरणात आहे. त्याचवेळी त्यांनी आयुष्यभर जपलेली धर्मनिरपेक्षतेची कासही लोकांच्या आदराचा विषय बनली आहे. लालूप्रसाद यादव यांच्याशी युती केल्यानंतरही नितीशकुमारांविषयीची ही लोकभावना बदललेली दिसली नाही. आता मात्र त्यांनी ३६० अंशाचीच राजकीय कोलांटउडी घेतली आहे. स्वतंत्र नेतृत्व करणाºया या नेत्याची यापुढची प्रतिमा मोदींचा अनुयायी आणि संघाचा आज्ञाधारक शिपाई अशी राहणार आहे आणि ती कुणालाही फारशी आवडणारी असणार नाही.

Web Title: naitaisa-raajakaiya-asathairataecae-navae-nairamaatae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.