प्रथांमध्ये वाढती औपचारिकता !

By किरण अग्रवाल | Published: October 4, 2018 08:40 AM2018-10-04T08:40:43+5:302018-10-04T08:42:20+5:30

मनुष्यवस्तीच्या वाढत्या कोलाहलात काकराजाचा शोध घेताना पितरांचे स्मरण होत असले तरी, संबंधितांच्या जीवितावस्थेत आपण कोणती कर्तव्यपूर्ती केली याचे आत्मपरीक्षण घडून येते का, हा प्रश्नच ठरावा.

Increasing formalities in Customs | प्रथांमध्ये वाढती औपचारिकता !

प्रथांमध्ये वाढती औपचारिकता !

googlenewsNext

भारतीय समाजमनाची परंपरा किंवा रूढीप्रियता अशी काही प्रगाढ आहे की, त्याबाबतीत विवेक अगर विज्ञाननिष्ठेच्या मोजपट्ट्याच थिट्या ठराव्यात. चांद्रयान मोहीम राबवून व मंगळावरही स्वारी करून झालेली असताना आपल्याकडे काकस्पर्शात पितरांची शुधाशांती व तृप्ती अपेक्षिली जाते, ती त्यामुळेच. परंतु मनुष्यवस्तीच्या वाढत्या कोलाहलात काकराजाचा शोध घेताना पितरांचे स्मरण होत असले तरी, संबंधितांच्या जीवितावस्थेत आपण कोणती कर्तव्यपूर्ती केली याचे आत्मपरीक्षण घडून येते का, हा प्रश्नच ठरावा. परंपरांमधील औपचारिकताच आता उरल्याचे यातून स्पष्ट होणारे आहे.

पितरांचे म्हणजे पूर्वजांचे स्मरण हे खरे तर नित्यच व्हायला हवे, कारण त्यांच्यामुळे आपण हे जग पाहू शकलो. परंतु कारण परंपरेचे किंवा उत्सवप्रियतेचे भोक्ते असल्याने आपल्याला प्रत्येक बाबीसाठी कारण लागत असते, त्यामुळे पितरांच्या स्मरणासाठीही पितृपक्ष आकारास आला. वर्षातून एकदा या काळात पितरांचे स्मरण करून नैवेद्याला काकस्पर्श घडविला की आजची पिढी पुढच्या कामकाजाला लागते. यासाठी ग्रामीण भागात नाही, पण शहरी क्षेत्रात काक शोधमोहिमेत अनेकांना वेळ खर्ची घालावा लागतो, कारण सिमेंटच्या वाढत्या जंगलातून अन्य पक्षांसोबतच कावळेही परागंदा झाले आहेत. मग जिथे ते आढळतात तिथे नैवेद्य दाखविणाऱ्यांची गर्दी उसळताना दिसते. काकस्पर्शासाठी प्रत्येकाची दिसणारी अधिरता व तो घडून येण्यास होणाºया विलंब काळातील घालमेल प्रत्येकानेच अनुभवून बघावी अशीच असते. अमुक एक आवडीचा पदार्थ राहिला असेल का, तमुक कारणाने नाराजी असेल का, अशी शंका-कुशंकांची पुटे स्मृतीतून उलगडली जाताना दिसून येतात. या काकस्पर्शाला वैज्ञानिक आधार नसला तरी त्यामागे गहि-या श्रद्धा आहेत हे खरे; परंतु व्यक्तीच्या जिवंतपणीच इतक्या वा अशा श्रद्धेने त्याकडे बघितले जाते का किंवा त्यांच्या इच्छा-आकांक्षापूर्तीची काळजी घेतली जाते का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित व्हावा. हल्लीच्या एकांतवासप्रिय पिढीला घरातल्या वृद्धांची, ज्येष्ठांची अडचण वाटू लागली आहे, त्यातूनच वृद्धाश्रमांतील खाटा भरलेल्या दिसू लागल्या आहेत. अपवादात्मक असले तरी एकीकडे असे चित्र असताना अशाच कुटुंबातील व्यक्ती जेव्हा काकस्पर्शासाठी धावपळ करताना दिसून येतात, तेव्हा श्रद्धा व भावनांची औपचारिकता नजरेत भरून गेल्याशिवाय राहात नाही.

दुसरे म्हणजे, पितृ पंधरवड्याला अशुभ मानून या काळात नवीन वस्रे परिधान करायची नाहीत; नवीन महागड्या वस्तूंची खरेदी टाळायची, शुभ-मंगल कार्येही नकोत, अशी मानसिकता अनेकांकडून बाळगली जाते. परंतु हा काळ पितरांच्या स्मरणाचा असेल तर ते करताना म्हणजे त्यांचा आनंद, समाधान व तृप्ती गृहीत धरताना अन्य बाबतीत अशुभतेच्या संकल्पना कवटाळल्या जाणे हे पुरोगामित्वाचे तसेच विवेकवादाचे बोट सोडून देण्याचेच लक्षण मानायला हवे. भारतीय संस्कृतीकोशात पितर म्हणजे एक देवसदृश योनी असल्याचा उल्लेख आहे. पितरांनी आकाशाला नक्षत्रांनी सुशोभित केले असून, स्वर्गाकडे जाणारा मार्ग यज्ञद्वारा त्यांनीच आखून दिल्याचेही म्हटले आहे. ते खरे मानले तर या पितरांचा काळ अशुभ कसा ठरावा? या काळानंतर शक्तिदात्या नवदुर्गेचा उत्सव येतो. त्या चैतन्य काळाच्या पूर्वतयारीचा हा काळ असतो. या पितृपक्षात आपली पितरे पृथ्वीवर येतात अशीही श्रद्धा बाळगली जात असल्याने नवीन खरेदीला उलट त्यांचे आशीर्वादच लाभतात, असे पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी म्हटले आहे. त्यामुळे या काळाला अशुभ मानणेच गैर ठरणारे आहे. पण चंद्रावर पोहचविणाऱ्या विज्ञानाचा जयजयकार करीत असताना अंधश्रद्धीय व अवैज्ञानिक जळमटांच्या कोशातून समाजमन बाहेर पडत नाही. तेव्हा श्रद्धा जपत असताना त्याला काल सुसंगततेची, विवेकवादाची व प्रामाणिक भाव-भावनेची जोड लाभणे गरजेचे आहे. अन्यथा, ‘कभी प्यासे को पानी पिलाया नही, बाद अमृत पिलाने से क्या फायदा...’ या भजनातील वास्तविकतेची प्रचिती आल्याखेरीज राहणार नाही, इतकेच यानिमित्ताने.

Web Title: Increasing formalities in Customs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.