आधी वंदू तूज मोरया - बाप्पा , तुझा आम्हास भरोसा हाय् !

By दा. कृ. सोमण | Published: August 31, 2017 07:00 AM2017-08-31T07:00:00+5:302017-08-31T07:00:00+5:30

या सध्याच्या गर्दी धावपळीच्या , स्पर्धेच्या आणि अर्थप्राध्यान्य असलेल्या जगात कुणाचा कुणाला ' भरोसा ' देतां येत नाही हे अगदी खरे आहे. तरी आपण बाप्पावर भरोसा ठेऊन यशस्वी जीवन नक्कीच जगू शकतो

Bappa we have faith on you | आधी वंदू तूज मोरया - बाप्पा , तुझा आम्हास भरोसा हाय् !

आधी वंदू तूज मोरया - बाप्पा , तुझा आम्हास भरोसा हाय् !

Next
ठळक मुद्देआपण कोणतेही काम नीट ' लक्ष ' देऊन केले तर ' लक्ष्य ' गाठणे सुलभ जातेआपला आपल्यावर पूर्ण विश्वास असणे आवश्यक असते. आत्मविश्वासाचा आपणास जीवनात उपयोग होतोक्रोधामुळे रक्तदाब वाढतो, रक्तातील साखरही वाढते. आपल्याच मनाचे , बुद्धीचे आणि शरीराचे आरोग्य बिघडते

              या सध्याच्या गर्दी धावपळीच्या , स्पर्धेच्या आणि अर्थप्राध्यान्य असलेल्या जगात कुणाचा कुणाला ' भरोसा ' देतां येत नाही हे अगदी खरे आहे. तरी आपण बाप्पावर भरोसा ठेऊन यशस्वी जीवन नक्कीच जगू शकतो. मात्र त्यासाठी श्रीगणेशाला एकवीस दूर्वा अर्पण करून आपणास पुढील एकवीस मंत्र अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपण हे एकवीस मंत्र जेव्हढ्या कसोशीने अंमलात आणू तेव्हढा ' बाप्पाचा भरोसा ' आपणास वाटू लागेल. मग आपण म्हणू शकू -" बाप्पा , तुझा आम्हास भरोसा हाय् !  भरोसा हाय् !" 
            आज आपण बाप्पाला मनापासून एकवीस दूर्वा वाहूया  आणि पुढील एकवीस मंत्र ध्यानात घेऊन ते जास्तीत जास्त कसोशीने अंमलात आणण्याचा प्रयत्न करूया. 
             (१) प्रत्येक काम नीट लक्ष देऊन करणे --- आपण कोणतेही काम नीट ' लक्ष ' देऊन केले तर ' लक्ष्य ' गाठणे सुलभ जाते. प्रत्येकाला त्याच्या आवडीचे काम मिळतेच असे नाही. पण मिळालेल्या प्रत्येक कामात आवड निर्माण करणे आपल्याच हाती असते, तसे जर केले तर जास्त काम करूनही आपणास थकवा वाटत नाही. आणि प्रत्येक कामात मनाची एकाग्रता साधणे आपणास शक्य होत असते. 
             (२) आत्मविश्वास वाढविणे --- आपला आपल्यावर पूर्ण विश्वास असणे आवश्यक असते. आत्मविश्वासाचा आपणास जीवनात उपयोग होतो. बर्याच माणसांचा स्वत:वरच विश्वास नसतो. बाहेर जाताना त्यांनी दरवाजाला कुलूप लावले तरी अशी माणसे ते लावलेले कुलूप पाच सहा वेळा खेचून पहातात. काही माणसे तर दहा पावले पुढे जाऊन पुन्हा मागे येतात आणि लावलेले कुलूप खेचून पहातात. एखादी वस्तू पिशवीत ठेवली तरी पुन्हा पुन्हा ती पिशवीत ठेवली की नाही ते तपासतात.
            (३) क्रोध टाळणे हिताचे ! -- " क्रोधात् भवति संमोह: । संमोहात् स्मृतिविभ्रम: ।  स्मतिभ्रंशात् बुद्धिनाशो । बुद्धिनाशात् प्रणश्यति ।।  क्रोध केल्याने आपला काहीच फायदा होत नसतो. त्यामुळे आपलेच मन:स्वास्थ्य बिघडत असते आणि आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. तसेच क्रोधामुळे रक्तदाब वाढतो, रक्तातील साखरही वाढते. आपल्याच मनाचे , बुद्धीचे आणि शरीराचे आरोग्य बिघडते. 
            (४) निर्भयता हवीच -- काही माणसे विनाकारण आणि सतत भीत असतात. त्याचाही वाईट परिणाम अनेक गोष्टींवर होत असते. जग हे नेहमी भित्र्यांना भिवविते आणि भिवविणार्याला भीत असते. बर्याच वेळा अज्ञानामुळेच भीती वाटत असते. म्हणून माणसाने जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करून घेणे जरूरीचे असते. त्यामुळे निर्भयता प्राप्त होत असते. भीतीमुळे अनेक लोकांचे कर्तृत्त्च प्रकटच होत नसते. 
           (५) चिंता नसावी-- " चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता ही जिवंत माणसाला जाळीत असते " असे म्हटले जाते ते अगदी खरे आहे.  रिकामे मन चिंतेला जागा देत असते, मन सतत चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवा. भविष्यकाळासंबंधी जास्त व सतत विचार करीत राहिलो तर चिंता अधिक वाटू लागते. म्हणून मन नेहमी वर्तमान काळातच ठेवावयास हवे. 
           (६) वेळेचा सदुपयोग करा.-- या जगात सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल तर ती म्हणजे 'वेळ - टाइम ' !
गेलेली वेळ पुन्हा येत नसते. वेळ साठवत येत नाही. वेळेचे कर्ज काढतां येत नाही. मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करण्याचा सतत प्रयत्न करा. 
           (७) मन:स्वास्थ्यास जपा. --बर्याच वेळा आपण शरीराच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत असतो आणि मनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतो.  मन निरोगी आणि स्वस्थ असेल तरच हातून  कामे चांगली होत असतात. मन प्रसन्न राहण्यासाठी कान, नाक, डोळे, जीभ आणि स्पर्श या पंचज्ञानेंद्रियांचा चांगला उपयोग करून घ्या. कारण त्यांचा संबंध थेट मनाशी असतो. छान चालीची गीते कानावाटे मनाला आनंदित करीत असतात. सोनचाफा, बकुळीची फुले नाकाद्वारे मनाला आनंदित करीत असतात. निसर्गातील सुंदर दृश्ये डोळ्यांवाटे मनाला उत्साहित करतात. कडू, तिखट, तुरट पदार्थ तोंडावाटे मन तृप्त करीत असतात. मुले , नातवंडे यांच्या पाठीवरून हात फिरवतांना आपल्या मनाला सौख्य प्राप्त होत असते, शिवाय मुले, नातवंडे यांनाही आनंद मिळत असतो. आपल्या मनाच्या आरोग्याकडे आपण नेहमी जास्त लक्ष दिले पाहिजे. 
        (८) आळस टाळणे हिताचे-- आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. आळसावर सोपा उपाय म्हणजे आळस वाटल्यास उपवास करावा. हलका आहार घ्या.  आळस नाहिसा होतो. 
       (९) लोभ नसावा-- प्राचीन काळी पत्र लिहीताना शेवटी एक वाक्य असे. " कळावे , लोभ असावा ही विनंती " असे वाक्य 
असायचे. आता मात्र " लोभ नसावा " असेच लिहावे लागेल. कारण लोभापोटी माणसे कुठल्या थराला जातात हे आपण नेहमी पाहतो. काही माणसे भ्रष्टाचार करून लोभापायी इतका पैसा मिळवतात की त्यांना आयुष्याची महत्वाची वर्षे तुरुंगात काढावेत लागतात. तर काही माणसे लोभापोटी आपल्या सख्ख्या भावाला ठार मारायलाही तयार होतात. आळसाप्रमाणेच लोभ हा 
 माणसाचा मोठा शत्रू आहे. 
       (१०) मत्सर करू नये. -- षड्ररिपूंमध्ये ' मत्सर ' हा मोठा शत्रू आहे. मत्सर केल्याने आपलेच मन:स्वास्थ्य बिघडत असते. मन सतत जळत राहिले तर आपल्याच आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत असतो. 
       (११) निष्काम कर्मयोगी रहा.-- फलाची आसक्ती न धरता कर्म करावे. कारण आसक्ती हेच सर्व दु:खांचे मूळ असते. मी मागेच तेव्हढेच फळ मला मिळायला पाहिजे असे वाटणे , मी मागेन त्याचवेळी मला फळ मिळाले पाहिजे असे वाटणे आणि फळ फक्त मलाच मिळाले पाहिजे असे वाटणे म्हणजे आसक्ती होय. नेहमी  आसक्ती विरहीत कर्म करायला हवे.
      (१२) बुद्धीचेच नियंत्रण हवे-- कोणताही निर्णय घेताना आणि कृती करताना भावनेच्या आहारी जाऊ नका. नेहमी भावनेवर बुद्धीचे नियंत्रण ठेवावे.
       (१३) "योग: कर्मसु कौशलम् " -- प्रत्येक काम उत्कृष्टपणे ( योगबुद्धीने ) करण्याचे कौशल्य प्राप्त करून घ्या. 
       (१४) माणसांची पारख-- प्रत्येक माणूस हा माणूस असतो. त्याची कृती चांगली किंवा वाईट असते. माणसाच्या वाईट कृतीला दोष द्या. माणसाला  दोष देऊ नका. इतरांनी तुम्हाला दोष दिला तर तो तुमच्या कृतीला असतो. तो दोष तुम्हाला नसतो.
       (१५) सुख / दु:ख --  सुख दु:ख येणे न येणे आपल्या हाती नसते. हे अगदी खरे आहे. परंतु सुख आले तरी सुखी व्हायचे की नाही आणि  दु:ख आले तरी दु:खी व्हायचे की नाही हे आपल्याच हाती असते. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे आपल्या हाती आहे त्याचाच विचार करावा.
     (१६) सतत यशस्वी व्हा ! -- यशस्वी होणारी माणसे नेहमी अडचणीतही संधी शोधतात. आणि अयशस्वी होणारी माणसे संधी आली असता अडचणी सांगत बसणारी असतात.सतत संधींचा शोध घ्या.
    (१७) तुलना -- स्वत:ची तुलना इतरांशी करू नका. स्वत:ची तुलना गतकाळातील स्वत:शीच करा.
   (१८) व्यवहारी रहा- नेहमी व्यवहारी रहा. सहनशीलता,सावधानता आणि संयमाने वागा, चांगल्यावर श्रद्धा ठेवा. सबुरी ठेवा. 
   (१९) सकारात्मक विचार- कधीही नकारात्मक विचार करू नका. नेहमी सकारात्मक विचार करण्याचीच संवय ठेवा.
   (२०) पूजा/ आदर्श-- सतत चांगल्या विचारांची व चांगल्या कृतीची पूजा करा. आणि त्यांचाच आदर्श ठेवा.
   (२१) आपले जीवन-- लक्षात ठेवा . आपले जीवन आपणच घडवीत असतो. किंवा बिघडवीत असतो. दुसरे कोणीही त्याला कारणीभूत नसतात. यश- अपयशाला इतर कोणीही जबाबदार नसतात. त्यांना दोष देत बसू नका. 
(दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल आयडी dakrusoman@gmail.com)

Web Title: Bappa we have faith on you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.