‘मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचाये’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 09:13 PM2019-06-28T21:13:37+5:302019-06-28T21:43:51+5:30

आयपीएस कृष्णप्रकाश यांचा सल्ला; अमेरिकेतील १५०० किलोमीटरच्या सायकलिंगमध्ये पटकावला चौथा क्रमांक

 'Work hard with silent, hard work will make noise' | ‘मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचाये’

‘मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचाये’

Next
ठळक मुद्देही स्पर्धा यशस्वीरीत्या पार करणारे ते पहिले भारतीय पोलीस अधिकारी ठरले आहेत. स्पर्धेच्या प्रवासात फिट राहण्यासाठी कृष्णप्रकाश यांनी पाणी, फळांचा आधार घेतला होता.

मुंबई - आयपीएस अधिकारी ते ‘आयर्नमॅन’, अल्ट्रामॅनचा किताब पटकाविणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी अमेरिकेतील रेस अ‍ॅक्रॉस वेस्ट (रॉ) या स्पर्धेत १५०० किलोमीटरच्या सायकलिंगमध्ये चौथा क्रमांक पटकावून त्यांनी आतापर्यंत मिळवलेल्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ‘मेहनत इतनी खामोशीसे करो की सफलता शोर मचाये’, असे म्हणत पुढची तयारी सुरू केल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पन्नाशीच्या उंबरठ्यावर नानाविध आजारांचे दुखणे घेत रडत बसलेल्यांबरोबरच, वेळ नाही म्हणून स्वत:कडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्वांसमोर त्यांनी फिटनेसचा अनोखा आदर्श ठेवला आहे. अमेरिकेत ९ ते १३ जूनदरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत ९२ तासांचा खडतर प्रवास कृष्णप्रकाश यांनी अवघ्या ८८ तासांत पूर्ण केला आहे. यात १८ ते ४९ वयोगटातील स्पर्धकांचा समावेश होता. ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार करणारे ते पहिले भारतीय पोलीस अधिकारी ठरले आहेत.
या स्पर्धेच्या तयारीदरम्यान कामात कुठल्याही प्रकारे खंड पडू नये म्हणून, ते पहाटे ३ वाजल्यापासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत धावणे, सायकलिंग करत असत. त्यानंतर कामावर रुजू होत असत.
‘वेळ किती आहे? त्याचे नियोजन कसे करायचे हे आपल्या हातात असते. त्यात आपण करत असलेल्या कामाचा गाजावाजा न करता मेहनत करत राहा. तुम्ही काय करता हे तुमचे यशच सर्वांना सांगेन,’ असे यशाचे गमक उलगडवून सांगताना त्यांनी स्पष्ट केले.

थांबायचे नाही, मनाशी केला पक्का निर्धार
४८ ते ५० डिग्रीच्या तापमानात त्यांनी पहिल्या दिवशी ४९५ किमीचा प्रवास पार केला. त्यानंतर झोपेअभावी संतुलन ढासळले. दुसऱ्या दिवशी ३१५ किमीचा पल्ला पार पाडला. सततच्या सायकलिंंगमुळे अंतर्गत इजा झाली. तिसºया दिवशी पुढचा टप्पा पार पडणार की नाही, हा प्रश्न होता. पाठीशी असलेली टीमही त्यांचे प्रोत्साहन वाढवत होती. अखेर, जंगलात दोन तास झोप घेऊन, थांबायचे नाही, असा मनाशी पक्का निर्धार करत त्यांनी सायकलिंग सुरू केली. मध्येच चक्कर आल्याने ते कोसळले. मागचे पुढे गेले. शुद्धीवर येताच पुन्हा प्रवास पूर्ण करत ते चौथ्या क्रमांकाने विजयी झाले. स्पर्धेच्या प्रवासात फिट राहण्यासाठी कृष्णप्रकाश यांनी पाणी, फळांचा आधार घेतला होता.

कोण आहेत कृष्णप्रकाश?
कृष्णप्रकाश हे १९९८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. २०१२ मध्ये त्यांनी मुंबईत अतिरिक्त आयुक्त म्हणून दक्षिण विभागात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. मुंबईसह सर्व मॅरेथॉनमध्ये ते आवर्जून सहभाग घेतात.

कधी थांबू नका
वय कितीही असो. अंगी काहीतरी करण्याची आवड, जिद्द, चिकाटीच्या बळावर आपण काहीही करू शकतो. आपलं वय झालं... हे डोक्यातून काढून नियमित योगा, सरावाने मन तरुण ठेवा. आपल्याकडे वेळ खूप आहे. त्याचे योग्य नियोजन करून जगून पाहा.
- कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशासकीय

असे बनले ‘आयर्नमॅन’
वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत ३.८ किलोमीटर स्विमिंग, १८०.२ किलोमीटर सायकलिंग, ४२.२ किलोमीटर धावण्याचा समावेश होता. ‘आयर्नमॅन’ हा किताब जिंकण्यासाठी स्पर्धकांना ही ट्रायथलॉन १७ तासांमध्ये पूर्ण करणे गरजेचे असते. कृष्णप्रकाश यांनी नाशिकमधील मालेगावातही सेवा बजावली आहे. तेथेच मालेगावातील एका कार्यक्रमात ओळख झालेल्या डॉक्टरने आपल्या २३ वर्षीय मुलाने फ्रान्सच्या हाफ आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेतल्याचे सांगितले. तेथून त्यांनीदेखील स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांच्याकडे स्पर्धेच्या तयारीसाठी केवळ साडेतीन महिने होते. कृष्णप्रकाश रात्री दहाला झोपून पहाटे चार वाजता उठून प्रॅक्टिस सुरू करत असत. रविवारी तर दहा-बारा तास ते सराव करत. त्यांनी अवघ्या १५ तासांत ही स्पर्धा पूर्ण केली. अभिनेता मिलिंद सोमण यांच्यानंतर ‘आयर्नमॅन’ हा किताब पटकावणारे ते दुसरे भारतीय, तर भारतातले पहिले पोलीस अधिकारी ठरले आहेत.

Web Title:  'Work hard with silent, hard work will make noise'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.