दुष्काळावर मात करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ कार्यशाळा
By Admin | Published: January 9, 2015 12:19 AM2015-01-09T00:19:15+5:302015-01-09T00:52:08+5:30
बीड : राज्यात वारंवार दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला मार्च महिन्यापासून सुरवात होत आहे.
बीड : राज्यात वारंवार दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला मार्च महिन्यापासून सुरवात होत आहे. योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी गाव समितीपासून जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांना जलसंधारणचे सचिव प्रभाकर देशमुख व इतर आयुक्तांनी कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन केले.
येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरूवारी ‘जलयुक्त शिवार’ अभियानाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सचिव प्रभाकर देशमुख, औरंगाबाद विभागाचे आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित,आ. भीमराव धोंडे, आ. संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते.
योजना प्रभावीपणे राबविल्यास राज्य पाणीटंचाईतून मुक्त होईल असा विश्वास ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी व्यक्त केला. प्रत्येक गावाला केंद्रबिंदू मानून कर्मचाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. जिल्ह्याची पाणीटंचाईतून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानाची रुपरेषा यावेळी मांडण्यात आली. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही योजना राज्यात कार्यन्वित होणार आहे. योजनेअंतर्गत २०१९ पर्यंत राज्य पाणीटंचाईतून मुक्त करण्याचा निर्धार असून ही योजना स्थानिक पातळीवर कशी राबवायची याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
राज्यात २० हजार सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. योजनेत नरेगा, पाणलोट प्रकल्प हे एकत्र राबविणार असल्याचे सचिव प्रभाकर देशमुख म्हणाले. जलपातळी वाढविण्यासाठी सिमेंट बंधारे, नरगेच्या योजनेतील कामे तर कृषि विभागातील योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
सध्या राज्यातील २३ हजार गावात पाणीटंचाई जाणवत आहे. योजनेत जुने ८ हजार सिमेंट बंधारे दुरूस्त होणार आहेत. विभागाप्रमाणे ६ हजार बंधाऱ्याचे वाटप होणार आहे. शिवाराचा आराखडा पाहून नव्याने कामे दिली जातील, असेही सचिव प्रभाकर देशमुख म्हणाले. योजनेअंतर्गत राज्यातील ५ हजार गावांची पाणीटंचाई दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे.