रग्गड भाडे भरू, पण विमानानेच उडू; छत्रपती संभाजीनगरकरांची विमान प्रवासास अधिक पसंती

By संतोष हिरेमठ | Published: March 18, 2023 05:22 PM2023-03-18T17:22:07+5:302023-03-18T17:22:28+5:30

दिल्ली, हैदराबादपेक्षा मुंबईकडे सर्वाधिक प्रवासी : रेल्वेच्या एसी फर्स्टच्या दुप्पट पैसे मोजताच ८ तासांचा प्रवास विमानाने एका तासात

Pay the rough fare, but fly the plane; Chhatrapati Sambhajinagarkar prefers air travel | रग्गड भाडे भरू, पण विमानानेच उडू; छत्रपती संभाजीनगरकरांची विमान प्रवासास अधिक पसंती

रग्गड भाडे भरू, पण विमानानेच उडू; छत्रपती संभाजीनगरकरांची विमान प्रवासास अधिक पसंती

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली, हैदराबादच्या तुलनेत शहरातून मुंबईला विमानाने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. आजघडीला दिवसभरात मुंबईसाठी तीन विमाने आहेत. रेल्वेच्या एसी फर्स्ट तिकिटाच्या जवळपास दुप्पट पैसे मोजताच मुंबईचा ८ तासांचा प्रवास अवघ्या एका तासात करता येतो. त्यामुळेच वर्षभरात जवळपास पावणेदोन लाख प्रवाशांनी मुंबई प्रवासासाठी विमानाला पसंती दिली.

चिकलठाणा विमानतळावरून आजघडीला एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. वर्षभरात सुमारे ४ लाख प्रवाशांनी विमानाने प्रवास केला. त्यात मुंबईपाठोपाठ दिल्लीच्या विमान प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. या तिन्ही शहरांसाठी रेल्वे आहेत. किफायतशीर दरासाठी रेल्वेला पसंती दिली जाते. मात्र, विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही आता वाढत आहे.

रेल्वेचे, विमानाचे तिकीट दर किती?
मुंबईच्या विमानाचा तिकीट दर १७ मार्च रोजी ३,४०० रुपये आणि ४,०३६ रुपये आहे. मुंबईला जाणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसच्या एसी फर्स्टचा तिकीट दर १,६०५ रुपये आहे. दिल्लीच्या विमानाचा तिकीट दर ५,४४९ आहे. सचखंड एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसीसाठी ४ हजार रुपये लागतात.

कोरोना आधीच्या विमानसंख्येची नोंद
एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे अक्षय चाबूकस्वार म्हणाले, २०२२ या वर्षात विमानतळावरून एकूण ४ लाख प्रवासी वाहतूक, तर ४ हजारच्या आसपास विमान वाहतूक नोंदविली गेली आहे. कोरोनाचा प्रभाव विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीवर २०२०-२१ या काळात पडला होता. २०२२ या वर्षात कोरोना आधीची विमानसंख्या व प्रवासी वाहतूक संख्या विमानतळावर नोंदविली गेली आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन इंडिगो २८ मार्चपासून आठवड्यातून तीन दिवस बंगळुरू विमानसेवा सुरू करीत आहे. कालांतराने अहमदाबाद आणि उदयपूर, जोधपूर विमानसेवादेखील सुरू होऊ शकते.

वर्षभरातील विमान प्रवाशांची संख्या
मुंबई - १,७१,१४९
दिल्ली - १,६९,८१४
हैदराबाद - ५६,४५०

शहरातून सुरू असलेली विमाने - ७
मुंबई - सकाळी - २, सायंकाळी - १
दिल्ली - सकाळी - १, सायंकाळी - १
हैदराबाद - सकाळी - १, सायंकाळी - १

प्रवासासाठी लागणारा वेळ
शहर - रेल्वेने - विमानाने
दिल्ली - २३ तास - २ तास
मुंबई - ८ तास - १ तास
हैदराबाद - १० तास - १.३० तास

Web Title: Pay the rough fare, but fly the plane; Chhatrapati Sambhajinagarkar prefers air travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.