औरंगाबाद विद्यापीठाच्या प्रकुलगुरूचा निर्णय जाहीर होईना, दिड महिना उलटला तरीही नावाची घोषणा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 05:22 PM2017-10-27T17:22:24+5:302017-10-27T17:26:37+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदासाठी राजभवनात मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या मुलाखतींना दिड महिना उलटला, तरीही प्रकुलगुरूंच्या नावाची घोषणा झालेली नाही.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदासाठी राजभवनात मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या मुलाखतींना दिड महिना उलटला, तरीही प्रकुलगुरूंच्या नावाची घोषणा झालेली नाही. याचा परिणाम विद्यापीठाच्या प्रशासकीय यंत्रणा, संशोधनावर होत आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा-२०१६ मंजूर केला आहे. या कायद्यानुसार बीसीयूडी संचालक हे पद रद्द करून त्याचे सर्व अधिकार प्रकुलगुरूकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. नविन विद्यापीठ कायदा १ मार्च २०१७ रोजी अस्तित्वात आला. तेव्हापासून आतापर्यंत राज्यातील बहुतांश अकृषी विद्यापीठांना प्रकुलगुरू मिळाले आहेत. यातच बीसीयूडी संचालक हे पद अस्तित्वात नसल्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी विशेष कार्य अधिका-यांची नेमणूक केली आहे. विद्यापीठात मागील आठ महिन्यांपासून ओएसडीच काम पाहत आहेत. नविन कायद्यानुसार परीक्षा विभाग, शैक्षणिक विभाग, संशोधन, महाविद्यालयांबाबत निर्णयाचे अधिकार प्रकुलगुरूंना प्रदान केलेले आहेत. प्रकुलगुरू नसल्यामुळे या विभागातील गोंधळाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आडचणी येत आहेत. पीएचडी प्रवेशासाठी पेट-४ परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला तीन महिने उलटल्यानंतर बुधवारपासून गुणपत्रिकांचे वाटप सुरू आहे. तर शैक्षणिक कॅलेंडर तब्बल दोन वेळा बदलल्यामुळे परीक्षा महिनाभर उशिराने सुरू होणार आहेत. याचा परिणाम पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेवर होण्याची शक्यता आहे.
या सर्व यंत्रणेचा प्रमुख या नात्याने प्रकुलगुरूंची नेमणूक आवश्यक आहे. कुलगुरू डॉ. चोपडे यांनी पाठविलेल्या पैकी तीघांच्या मुलाखती राजभवनात कुलपती सी. विद्यासागर राव यांनी १६ सप्टेंबर २०१७ रोजी घेतल्या. कुलपतींनी मुलाखती घेतल्यानंतर जास्तीत जास्त दोन दिवसात निवड जाहीर करण्याची परंपरा आहे. मात्र या मुलाखतींना दिड महिला उलटत असताना अद्यापही निवड जाहीर केलेली नाही. मुलाखती देणारांमध्ये लातुरच्या दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोंगिदरसिंग बिसेन,औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगर्भतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर आणि विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.सी.जे. हिवरे यांचा समावेश आहे.
विद्यापीठात सर्वत्र अनागोंदी परिस्थिती
विद्यापीठातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमाडलेली आहे. संवैधानिक अधिकारी महिना उलटत नाही तोच राजीनामा देतात. संशोधन दोन वर्षांपासून ठप्प आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिक संदर्भांची माहिती आणि प्रशासन हाताळण्याचे कौशल्य असणाºया प्रकुलगुरूंची नितांत गरज आहे. मात्र प्रकुलगुरूंची नेमणूक कोणत्या कारणांमुळे रखडली, याचे उत्तर कोणाकडेच शोधुन सापडत नाही. हे विशेष.