ग्रामीण भागात अशुद्ध पाणीपुरवठा!
By admin | Published: March 28, 2017 01:42 AM2017-03-28T01:42:41+5:302017-03-28T01:42:41+5:30
पाणी शुद्धीकरणाची व्यवस्थाच नाही; ४५ गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!
नागेश मोहिते
धाड, दि. २७- ग्रामीण भागात पाणीपुरवठा करीत असताना शुद्धीकरण करण्याची कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे.
बुलडाणा तालुक्यातील करडी, धाड, बोरखेड, सावळी, कुंबेफळ, सातगाव, कुलमखेड, डोमरूळ, टाकळी, ढालसांवगी, मासरूळ, शेकापूर, बोदेगाव यासह तेरा गावांमध्ये करडी सिंचन तलाव परिक्षेत्रातील विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो; मात्र पिण्याचे पाणी पुरविणार्या या विहिरींवर जलशुद्धीकरणाची यंत्रणा उभारण्यात आली नाही, त्यामुळे तेरा गावातील जनतेला अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. याबाबत माहिती असतानाही प्रशासनाने याबाबत तोडगा काढला नाही.
जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा होत असतो. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाकडून नजीकच पाच वर्षात प्रशासनाने जलस्वराज, महाजलसारख्या योजना गावोगावी दिल्या. लाखो रुपयाचे अनुदान यासाठी मंजूर केले; मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळाला नाही. प्रशासनाकडून मूलभूत व आवश्यक असणार्या पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असताना, याकडे स्थानिक प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले.
बुलडाणा तालुक्यात किमान ४५ गावापेक्षा अधिक गावांची अशीच स्थिती आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई निवारण्याकरिता धरण क्षेत्रात विहिरी खोदण्यात आल्या आहेत. या विहिरीमधून गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. सदर पाणी शुद्ध करण्याकरिता केवळ पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात येते. या विहिरी उघड्या असून, त्यामध्ये कचरा पडला आहे, तसेच विहिरींमध्ये मोठय़ा प्रमाणात शेवाळ झाली आहे. या विहिरीतील पाणीपुरवठा करणारी पाइपलाइनही जुनी असून, गंजली आहे. त्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.