भात पिकांची नर्सरी नष्ट होण्याच्या मार्गावर
By Admin | Published: July 24, 2015 12:42 AM2015-07-24T00:42:30+5:302015-07-24T00:42:30+5:30
पवनी तालुक्यात चार नक्षत्राचा अपुरा पाऊस पडल्यामुळे रोवणीसाठी टाकण्यात आलेले भात पिकाची रोपे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत.
पावसाची दडी : शेतकरी चिंतातूर, धरण नावपुरतेच
आसगाव/चौ. : पवनी तालुक्यात चार नक्षत्राचा अपुरा पाऊस पडल्यामुळे रोवणीसाठी टाकण्यात आलेले भात पिकाची रोपे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत.
पावसाचा अंदाज घेवून यावर्षी शेतकऱ्यानी शेतात हलक्या प्रजातीची धान रोपे रोवणीसाठी शेतात घातली होती. यावर्षी शेतात साठवण्याजोकता एकाही नक्षत्राचा पाऊस पडला नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही तर अनेक शेतकऱ्याची कोरडवाहू शेतीतील रोवणी होणार नाही. हलक्या प्रजातीच्या बियान्याची भात पिकाची मुदत १२० ते १४० दिवसाची असते. या पिकांची रोवण्याची मदत ३० ते ४० दिवस असते. परंतु ६० दिवसाचा कालावधी होवूनही शेतात पाणी साचला नसल्यामुळे शेतकऱ्यांना या रोपाची लागवड करता आली नाही. परिणामी ही भात रोपे पिवळी पडली असून नष्ट झाल्यासारखी दिसत आहेत. जरी पाऊस मोठा झाला व रोवणी झाली तरी यांचा उत्पन्नावर मात्र मोठा फरक पडत असतो. त्यामुळे उशिरा रोवणी झाली तर उत्पन्न मात्र अर्ध्यावर येते अशावेळी शेतकरी शेतात, रोवणी करण्याची हिंमत करीत नाही. कारण खर्च रूपया आमदानी आठ आणे अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे. यावर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे फक्त ज्याचे कृषी पंप सुरू झाले आहेत. त्याचीच २५ टक्के पर्यंत रोवणी झाली आहे. त्यांनाही विजेच्या भारनियमनामुळे रोवणी पाणी पूर्ण वेळ देता यत नाही, अशी परिस्थिती आहे.
इंदिरा सागर धरण ठरले पांढरा हत्ती
पवनी तालुक्यात इंदिरा सागर धरण बांधून झाले याला २५ वर्षांचा इतिहास आहे. परंतु उजवा कालवा व डावा कालवा यांचे काम संपूर्ण असल्यामुळे व कालव्याचे पाणी शेतात सोडण्यासाठी छोटे कालवे पूर्ण न केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवठा करता येत नाही.
परिणामी धरणात पाणीसाठा असूनही सिंचन होवू शकत नाही. काही प्रमाणात उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. परंतु जिथे ज्याला मिळेल तोच या पाण्याचा उपयोग करीत आहे. त्यामुळे छोटे कालवे बनविणे गरजेचे आहे.
(वार्ताहर)