'भारत विश्वगुरू होऊ शकतो, पण...' शंभर वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी वर्तवलेलं भविष्य जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 12:32 PM2024-01-12T12:32:23+5:302024-01-12T12:32:58+5:30

आज स्वामी विवेकानंद यांची जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिन, त्यानिमित्त त्यांनी भारताच्या विकासासाठी सांगितलेले ३ मुद्दे जाणून घ्या!

'Bharat can become world guru, but...' Know the future predicted by Swami Vivekananda a hundred years ago! | 'भारत विश्वगुरू होऊ शकतो, पण...' शंभर वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी वर्तवलेलं भविष्य जाणून घ्या!

'भारत विश्वगुरू होऊ शकतो, पण...' शंभर वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी वर्तवलेलं भविष्य जाणून घ्या!

>> रोहन विजय उपळेकर

अवघं ३९ वर्षाचं आयुष्य. पण त्यात केलेलं कार्य ? अक्षरशः आकाशाला गवसणी घालणारं ! त्या अद्भुत कार्याचे यश संपूर्ण  जग अनेक शतके गाईल, अनेक युगे ते कार्य टिकून राहील,  इतक्या भक्कम आधारावर निर्माण करण्यात आलेले आहे. कोण हा महामानव ? की मानवीरूपात अवतरलेला कोणी देवच ? आज ज्यांची १५५ वी जयंती सानंद साजरी होत आहे, तेच ते युगपुरुष, योद्धा संन्यासी, वादळी हिंदू ( Cyclonic Hindu ),  श्री रामकृष्ण परमहंसांचे लाडके शिष्य नरेंद्र अर्थात् स्वामी विवेकानंद !

कलकत्ता महानगरातील सिमुलीया भागात दत्त कुटुंब सुप्रसिद्ध होते. याच कुटुंबातील विश्वनाथ दत्त व त्यांच्या पत्नी भुवनेश्वरीदेवींच्या पोटी, १२ जानेवारी १८६३ रोजी सूर्योदयानंतर लगेचच एक तेजस्वी बालसूर्य जन्माला आला. भुवनेश्वरी शिवभक्त होत्या व त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवांची खूप उपासना केलेली होती. त्याचे फळ म्हणूनच जणू काही कैलासपती भगवान शिवच पुत्ररूपाने त्यांच्या पोटी आले. शिवप्रसादाने जन्मला म्हणून मुलाला आपल्या कुलदेवतेचे 'वीरेश्वर' असे नाव ठेवण्यात आले. पुढे त्यांना नरेंद्र असे नाव ठेवले व तेच रूढही झाले.

बाल नरेंद्र अत्यंत खोडकर होते. कोणाच्याही कुठल्याही धाक-धपटशाचा त्याच्यावर उपयोग होत नसे. भीती हा शब्दच त्याच्या कोशात नव्हता. भुवनेश्वरीदेवी त्राग्याने म्हणत असत, " पुष्कळ उपासना करून शिवाकडे एक मुलगा मागितला होता. परंतु त्याने पाठवले आहे एक भूत ! " त्या बिचाऱ्या मातेला काय माहीत की पुढे जाऊन हेच भूत अवघ्या जगाला झपाटून सोडेल !

नरेंद्र जात्याच नेतृत्वगुण घेऊन आलेला होता. तो जन्मजात पुढारीच होता. सगळ्या मित्रमंडळींच्या खेळात पण तो कायम राजाच होत असे. आणि आश्चर्य म्हणजे त्याचे सगळे वागणे-बोलणे राजासारखेच होते. मुक्या प्राण्यांवर त्याचे खूप प्रेम होते. शरीर बलदंड, कुस्ती खेळण्यात तरबेज. तलवार चालवणे, शारीरिक कसरती तसेच विविध खेळांमध्येही त्याने प्राविण्य मिळवलेले होते. अतुलनीय धाडस हा तर त्याचा स्वाभाविक गुण होता. भीती त्याला नव्हती कशाची, कधीही ! लहान मुले बागुलबुवा किंवा भुताला घाबरतात. नरेंद्राला जर भुताची भीती घातली तर तो कधीच घाबरत नसे, उलट ते भूत समोर यावे म्हणून मुद्दाम तिथे जाई. पण हेच धाडस, साहस त्याला खिशात एक दमडीही नसताना जगभराचा प्रवास करण्यासाठी उपयोगी पडले. विविध ज्ञानशाखांमधील त्याची हुशारी तर आश्चर्यकारक होती. बी.ए. होईपर्यंत त्याने भारतवर्षाचा सगळा इतिहास आवडीने वाचला होता. न्यायशास्त्र, इंग्लंड व युरोपचा वर्तमान व प्राचीन इतिहास तसेच पाश्चात्य दर्शनशास्त्र देखील त्याने आत्मसात केलेले होते. अलौकिक स्मरणशक्तीची देणगी असणारा हा असामान्य विद्यार्थी आपल्या प्रतिभेने व चारित्र्यसंपन्न वागणुकीने सर्वांचा लाडका झालेला होता. तेजस्विता हा त्याच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. त्याने आपला बाणेदारपणा कधीच सोडला नाही. त्याची वाचनाची क्षमता इतकी प्रगत होती की तो काही क्षणातच पान वाचत असे.

तरुणपणी केशवचंद्र सेनांच्या प्रभावाने नरेंद्र ब्राह्मसमाजाचा पुरस्कर्ता झालेला होता. त्यामुळे मूर्तिपूजेला विरोध, हिंदू धर्माची निंदा करणे, जातिभेद न मानणे अशा तत्कालीन बाबींमध्ये तो सहभागी होई. पण त्यानेही त्याची मानसिक भूक भागली नाही. ईश्वराचा शोध काही त्याला लागला नाही. तो भेटलेल्या सर्वांना आवर्जून विचारीत असे की " तुम्ही ईश्वर पाहिला आहे का ? " त्याच्या या रोखठोक प्रश्नाचे, " हो, जसा तुला पाहतो तसाच मी ईश्वरालाही पाहतो ! " असे अद्भुत उत्तर देणारा महात्मा त्याला वयाच्या अठराव्या वर्षी, १८८१ साली पहिल्यांदाच भेटला. ते होते परमहंस श्री रामकृष्णदेव ! श्री रामकृष्णांनीच या असामान्य मुलातला खरा स्फुल्लिंग ओळखला व त्याला हळूहळू मार्गदर्शन करीत उच्च पदावर पोहोचवले.

बालवयापासूनच गंभीर ध्यानात मग्न होणे, अगदी बाह्य जाणीवही लोपून त्याच स्थितीत बराच काळ राहणे नरेंद्रला आपोआप जमत असे. रात्री झोपले की त्यांच्या डोळ्यांसमोर विविध रंगांचे तेजस्वी बिंदू येत आणि त्यातून साकारत असे प्रकाशाचा अनोखा खेळ. श्री रामकृष्णांनी त्यांचा हा अनुभव ऐकून त्यांच्याविषयी प्रसंशोद्गार काढले होते की, " हे ध्यानसिद्धाचे लक्षण आहे ! "

नरेंद्र लहानपणापासून अतिशय तार्किक होते. विलक्षण प्रज्ञा असल्यामुळे अनेक विषयांमध्ये प्रचंड गती होती. कोणताही मुद्दा योग्य तर्काच्या आधाराने पटल्याशिवाय ते मानतच नसत. हीच सवय त्यांना वेदान्तादी शास्त्रांच्या सखोल अभ्यासासाठी खूप उपयोगी पडली. त्यांचा गळा अतिशय गोड होता व शास्त्रीय संगीताचेही त्यांना सखोल ज्ञान होते. त्यांनी तरुणपणीच भारतीय संगीतावर एक अभ्यासपूर्ण ग्रंथ रचलेला होता. आपल्याकडील संगीतक्षेत्रातील एक दिग्गज पं.रामकृष्णबुवा वझे हे काही काळ त्यांच्याकडे संगीत शिक्षणासाठी जाऊन राहिलेले होते.

श्री रामकृष्णांकडून अनुग्रह प्राप्त झाल्यावरही नरेंद्र त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करी. त्यांचे प्रसंगी वादही होत. पण श्री रामकृष्णदेव त्याचे यथायोग्य समाधान करीत असत. रामकृष्णांनी नरेंद्र नावाच्या जातिवंत हिऱ्याला देखणे पैलू पाडून त्याला जगद्वंद्य केले यात शंका नाही !

१८८६ साली श्रीरामकृष्णांनी देहत्याग केला. त्यानंतर लगेचच नरेंद्रांच्याच नेतृत्वाखाली काही भक्तांनी संन्यासदीक्षा घेतली. या सर्वांना रामकृष्णांनीच भगवी वस्त्री पूर्वी देऊन ठेवलेली होती. नरेन्द्राचे नाव झाले विवेकानंद ! आज याच नावाने अवघे जग ढवळून काढलेले आहे.

एकांताची अत्यंत आवड असणारा हा पूर्ण वैराग्यवान संन्यासी मनाने खासच करुणामय होता. संन्यासी म्हणजे कर्तव्यकठोर, रुक्ष अंतःकरणाचाच असावा, या प्रचलित समीकरणात ते बसतच नसत. दीन दुबळ्यांच्या दुःखाने हेलावून जाऊन अश्रू गाळणारा हा महामानव फार फार कोमल अंतःकरण घेऊनच जगभर संचारला. याच जोरावर पहिल्याच वाक्यात त्याने जागतिक धर्मपरिषदही सहज आपलीशी केली. वक्तृत्वाचा ओजस्वीपणा तर अनुपमेय होता त्यांचा ! भारतीय तत्त्वपरंपरेचा, आपल्या प्राचीन ज्ञानवैभवाचा आत्यंतिक आदर व अभिमान बाळगणारा हा आधुनिक ऋषी अमेरिका, इंग्लंड, युरोपादी देशांमधील सुबुद्ध तत्त्ववेत्यांना आपल्या व्याख्यानांनी सहज खिळवून ठेवीत असे. या तरुण, तडफदार आणि तेजस्वी संन्याशाला पाहून, त्याची अभ्यासपूर्ण व्याख्याने ऐकून अनेकांनी भारताविषयीचे आपले मतच समूळ बदलून टाकले. त्यांच्या दृष्टीने खेडवळ, गावंढळ, मागास असा भारत आता ज्ञानाचा एकमात्र आधार ठरलेला होता. म्हणूनच स्वामी विवेकानंदांच्या या अद्भुत कार्याविषयी त्याकाळचे अनेक विद्वज्जन प्रशंसोद्गार काढीत असत.

स्वामी विवेकानंदांनी आपल्या अत्यल्प आयुष्यात अक्षरशः तोंडात बोटे घालावे इतके अलौकिक कार्य केलेले आहे. प्रचंड दगदग, योग्य अन्नाची कायमची ददात, शरीराच्या मनाने प्रचंड प्रवास व फिरस्ती यामुळे त्यांच्या आरोग्याची पूर्ण हेळसांड झालेली होती. त्यातच त्यांना डायबिटीस, बहुमूत्रता, दमा, निद्रानाश, क्षय इत्यादी अनेक रोगांनी पछाडलेले होते. इतक्या सगळ्या नकारात्मक परिस्थितींमध्येही या महामानवाची जिद्द इतकी विलक्षण होती, की तिच्या जोरावरच त्याने संपूर्ण जग हलवून सोडले. सर्वसामान्य माणूस त्यांच्याइतके कार्य तर सोडा, तेवढ्या कार्याची कल्पनाही करू शकणार नाही. त्यांची दूरदृष्टी, त्यांचे कल्पनाविश्व, त्यांचा परिस्थितीचा सखोल अभ्यास आणि या सर्वांच्या मुळाशी असणारा खरा कळवळा, करुणा..... अक्षरशः अगाध होते सर्व काही. म्हणूनच त्यांना अवतारी महात्मा म्हटले जाते व ते सार्थही आहे !

स्वामी विवेकानंदांचे विचार फार मूलगामी परिणाम करणारे आहेत. त्यांच्या चिंतनामध्ये मातृभूमी भारताच्या तत्कालीन स्थितीचा खूप मोठा भाग होता. त्यांना भारताला गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे, अशी दुर्दम्य आकांक्षा होती व त्यादृष्टीने त्यांनी प्रचंड चिंतन केलेले आजही पाहायला मिळते. तेच विचार आपण जर आज अमलात आणले तर भारत हीच पुन्हा जागतिक महासत्ता होईल, यात तिळमात्र शंका नाही.

स्वामीजींच्या मनात तरुण मुलांबद्दल फार आपुलकी होती. भारताच्या विकासाचे खरे शिल्पकार तरुणच आहेत असे त्यांचे स्पष्ट मत असल्याने त्यांनी कायमच तरुणांना खूप मार्गदर्शन केले. ते म्हणत की, 'एका ध्येयाने, एका दिलाने प्रेरित झालेल्या मोजक्याच पण शारीरिक मानसिकरित्या सशक्त तरुणांच्या आधारे ते संपूर्ण भारताचा कायापालट करू शकतील ! ' म्हणून १२ जानेवारी ही त्यांची जयंतीच  ' राष्ट्रीय युवक दिवस ' म्हणून साजरा होतो. याच ध्येयाने भारून जाऊन स्वामीजींनी काही मोजक्या ध्येयवेड्या तरुणांना सोबत घेऊन, १ मे १८९७ रोजी 'श्रीरामकृष्ण मिशन'ची स्थापना केली. आज या  संस्थेचा महान वटवृक्ष झालेला आपण पाहतोच आहोत.

भारताच्या अवनतीला दोन महत्त्वाची कारणे आहेत असे त्यांचे मत होते. एक म्हणजे शिक्षणाचा अभाव आणि दुसरे म्हणजे आत्मविस्मृती, आपल्या संपन्न वारशाचा, राष्ट्राचा, तत्त्वज्ञानाचा अभिमान नसणे. त्यांनी शिक्षणाविषयी मांडलेली मते खूप चिंतनीय आहेत. आजच्या शिक्षणाच्या दिवाळखोरी व शिक्षण सम्राटांच्या मनमानीच्या भयंकर परिस्थितीत तर विवेकानंदांचे हे विचार दीपस्तंभासारखे आहेत. आम्ही आमची अस्मिताच हरवून बसलेलो आहोत. आजमितीस शिक्षणाच्या नावावर जो बाजार भरवलाय आणि आम्हीच खतपाणी घालून तो वाढवतोय, ते पाहून हा योद्धा संन्याशी अक्षरशः ढसाढसा रडला असता. त्याच्या भावनेत्रांनी जाणीवपूर्वक पाहिलेले स्वर्गीय हिंदुस्थानचे सुस्वप्न आज आम्ही धुळीला मिळवतो आहोत, हे पाहून त्याचे कोमल अंतःकरण शतशः विदीर्ण झाले असते.

" Manifestation of Perfection already present in man. " अशी शिक्षणाची वेगळीच व्याख्या स्वामीजी करतात. पुस्तकी शिक्षणाला ते कुचकामी मानतात. दुर्दैवाने आज आम्ही त्याच पुस्तकी व मार्कांच्या शिक्षणाला सर्वश्रेष्ठ मानून बसलेलो आहोत.

त्यांच्या काळात तर भारताचा फार मोठा भाग शिक्षणापासून वंचित होता. म्हणून ते म्हणतात, " If the poor cannot come for education, education should reach the poor. " शिक्षणाच्या अभावामुळेच आपण आपली अस्मिता हरवून बसतो आणि मग त्यामुळेच आपल्याला कोणा ना कोणाची गुलामगिरी पत्करावी लागते !

स्वामीजींना 'चतुर्विध विकास' अभिप्रेत होता. 'निर्बलतेने गुलामगिरी वाढते.' म्हणून 'शारीरिक विकास' हवा ! बलवान शरीरच खरे कार्यक्षम असते. 'बळी तो कान पिळी' म्हणतात ते खोटे नाही. शरीरात ताकद असेल तरच आपल्या म्हणण्याला किंमत. ताकदीने हिंमत वाढते. यशस्वी होता येते. स्वामी विवेकानंद सुरवातीला काशीमध्ये असताना एकदा त्यांच्यामागे माकडांचा कळप लागला. ते पळू लागले. त्यावर शेजारच्या एका संन्याशाने त्यांना सांगितले की, 'पळू नकोस. त्यांना तोंड दे !' ते ऐकून स्वामीजी हिमतीने मागे वळून खंबीरपणे उभे राहिले. त्याबरोबर माकडांनी पळ काढला. या प्रसंगातूनच सबलता, हिंमत आणि संकटांना न घाबरता तोंड देण्याची क्षमता यांचे महत्त्व त्यांना समजले. हाच शारीरिक विकास त्यांना पहिल्या स्तरावर अभिप्रेत आहे.

दुसरा ' मानसिक विकास '. मनाने खंबीरता बाळगली पाहिजे. विजिगिषू वृत्ती नसेल तर साध्या साध्या ध्येयांचीही प्राप्ती कठीण होऊन बसेल. एकाग्रतेने मानसिक शक्ती वाढते, असे ते आवर्जून सांगत. एकाच ध्येयावर सर्वांगाने मन केंद्रित करण्याची सवय लावली पाहिजे.

तिसरा  ' सामाजिक विकास '. आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना दृढमूल हवी. सामाजिक विकासासाठी मातृभूमीवर अपार प्रेम व आदर हवा. समाजाप्रति आपली नैतिक बांधिलकीच आपण विसरलो आहोत. जोवर ही बांधिलकी पक्की होत नाही तोवर एकजूट होणारच नाही आणि सामाजिक एकजूट नसेल तर कोणतेच राष्ट्र प्रगती करू शकणार नाही.

स्वामीजींना भारताविषयी फार प्रेम होते. अमेरिकेत एका स्त्रीने त्यांना विचारले, "मी तुमच्या कार्यात कशाप्रकारे मदत करू शकते ?" त्यावर स्वामीजींनी दिलेले उत्तर त्यांच्या हृदयातले मातृभूमीचे अपार प्रेम सांगणारे आहे. ते म्हणाले, " Love India! " म्हणूनच हा सामाजिक विकासही फार महत्त्वाचा आहे.
आणि सर्वात महत्वाचा 'आत्मिक विकास '. आत्मिक विकास म्हणजे आध्यात्मिक जीवनशैली अंगीकारणे. स्वामीजी म्हणतात, " आपल्या मातृभूमीच्या राष्ट्रीय जीवनाचा पाया आहे धर्म ! तोच आपला मेरुदंड आहे. दुसऱ्यांकडून शिकायला जाऊन त्यांचे संपूर्ण अनुकरण करून आपले स्वातंत्र्य हरवू नका ! " किती सूक्ष्म दूरदृष्टी आहे पाहा त्यांची. आज आम्ही आमचे स्वत्त्व सोडून Americanize होण्यात धन्यता मानतो आहोत. हेच करू नका, म्हणून स्वामीजी शंभर वर्षांपूर्वी आपल्याला जागे करीत होते.

" जो धर्म गरिबांचे दुःख दूर करू शकत नाही. त्यांना पोटभर जेवायला घालू शकत नाही. मानवाला देवता बनवत नाही तो खरा धर्मच नव्हे ! " असे त्यांचे स्पष्ट मत होते. म्हणूनच ' शिवभावाने जीवसेवा ' या महान सिद्धांताचा त्यांनी आपल्या मिशनद्वारे भक्कम पाया रोवला. 'दरिद्रीनारायणाची सेवा' करणे हे आद्य कर्तव्य आहे, असे ते मुद्दाम म्हणत व तसेच कार्य आजही त्यांच्या संस्थेद्वारे जगभर चालू आहे.

आत्मिक विकासासाठी, ध्यानाचा अवलंब करणे, भक्तिभावाने प्रेरित होऊन भगवंताला आळवणे आणि सदाचारी, चारित्र्यसंपन्न, आयुष्य असणे खूप गरजेचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या ज्ञाननेत्रांनी ' प्रबुद्ध भारत '  पाहिलेला होता. त्यांना ते स्वप्न साकारायचेच होते, पण दुर्दैवाने नियतीने त्यांना तेवढा काळच हातात दिला नव्हता ! परंतु त्यांच्या सद्विचारांची ज्योत आजही तितकीच तेजस्वी आहे,  आपल्याला सुयोग्य मार्ग दाखविण्यासाठी समर्थ आहे. त्या चिरंतन ज्योतीच्या स्निग्ध प्रकाशात आपले सर्वांचे आयुष्य, पर्यायाने संपूर्ण भारतच पुन्हा एकदा ऊर्जस्वल होईल, तेजस्वी, ओजस्वी होईल आणि अवघ्या जगासाठी आदर्श ठरेल, यात शंका नाही !

आज स्वामीजींच्या जयंतीच्या महन्मंगल पर्वावर, त्यांच्या तेजस्वी स्वप्नांसारखे कार्य करण्यासाठी तुम्हा आम्हा तरुणांनी कटिबद्ध होऊन Work is Workship मानून अखंड सावधानतेने प्रयत्न करायला हवेत. ही आजच्या काळाची नितांत गरज आहे, आणि त्या दृष्टीने सर्वबाजूंनी अग्रेसर होणे हीच या अलौकिक महामानवाला वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल ! स्वामीजींनी आयुष्यभर कळकळीने व उच्च रवाने दिलेला उपनिषदांचा संदेशच आपले खरे प्रेरणास्थान व्हायला हवा. उत्तिष्ठत ! जाग्रत ! प्राप्यवरान्निबोधत !!!!

संपर्क  - 8888904481

Web Title: 'Bharat can become world guru, but...' Know the future predicted by Swami Vivekananda a hundred years ago!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.