प्रतिभावान, कार्यक्षम न्यायमूर्ती देणारे हे खंडपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:39 AM2017-11-20T00:39:23+5:302017-11-20T00:39:26+5:30
सर्वसामान्यांना न्याय मिळावा, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायसंस्थेच्या बळकटीकरणासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक कृती ही मानवतेला समोर ठेवून करायला हवी.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सर्वसामान्यांना न्याय मिळावा, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायसंस्थेच्या बळकटीकरणासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक कृती ही मानवतेला समोर ठेवून करायला हवी. अनेक प्रतिभावान, कार्यक्षम न्यायमूर्ती देणारे हे खंडपीठ आहे. आपल्या हातून चांगले काम व्हावे, यासाठी प्रयत्न करा. त्याचे फळही चांगलेच मिळेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लूर यांनी केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वकिलांच्या कक्षाच्या इमारतीच्या बांधकामाचे उद््घाटन रविवारी (दि.१९) मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लूर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर न्यायमूर्ती नरेश पाटील, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रवींद्र एम. देशमुख, सचिव अॅड. आनंदसिंह बायस, उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र सानप, अॅड. संघमित्रा वडमारे यांची उपस्थिती होती.
यावेळी न्या. चेल्लूर यांनी खंडपीठ इमारतीच्या परिसरात वकिलांसाठी कक्ष उभारण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा आढावा घेऊन त्यास आता मूर्त स्वरूप येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.