स्वच्छ भारत मिशनचे ‘वरातीमागून घोडे’

By admin | Published: February 1, 2017 12:04 AM2017-02-01T00:04:05+5:302017-02-01T00:04:05+5:30

स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत शहरांची स्वच्छतेविषयक तपासणी करण्यास येणाऱ्या पथकाची संबंधित महापालिकांनी कुठलिही बडदास्त ठेऊ नये,...

Swachh Bharat Mission's 'Varanimagoon Horses' | स्वच्छ भारत मिशनचे ‘वरातीमागून घोडे’

स्वच्छ भारत मिशनचे ‘वरातीमागून घोडे’

Next

महापालिकेला खर्चाचा फटका : पथकाचा खर्च न करण्याचे निर्देश
प्रदीप भाकरे अमरावती
स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत शहरांची स्वच्छतेविषयक तपासणी करण्यास येणाऱ्या पथकाची संबंधित महापालिकांनी कुठलिही बडदास्त ठेऊ नये, त्यांच्यावर कुठलाही खर्च करु नये, असे निेर्देश स्वच्छ भारत मिशनचे संचालक प्रवीण प्रकाश यांनी देशातील ५०० शहरांच्या महापालिका आयुक्तांना दिले आहेत. आतापर्यंत अर्ध्यापेक्षा अधिक शहरांची तपासणी क्यूसीआय पथकाकडून करण्यात आली आहे. ४ जानेवारीपासून सुरु झालेले २ हजार गुणांचे स्वच्छ सर्वेक्षण २०१७ आता अंतिम टप्प्यात असताना मिशन संचालकांनी असे आदेश काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उल्लेखनीय म्हणजे अमरावती शहराचे स्वच्छ सर्वेक्षण १७ ते १९ जानेवारीदरम्यान पार पडले. शहराचे स्वच्छताविषयक मूल्यांकन करणाऱ्या त्रिसदस्यीय पथकाची महापालिकेने उत्तम बडदास्त राखली होती. त्यामुळे आता त्यापथकाच्या प्रवास, भोजन आणि निवास व्यवस्थेचा खर्च कुठल्या लेखाशिर्षात दाखवायचा आणि पथक निघून गेल्यानंतर आलेल्या आदेशाचे आता करायचे तरी काय, असा प्रश्न महापालिका यंत्रणेला पडला आहे. मात्र ज्याशहरांचे सर्वेक्षण व्हायचे आहे, त्यामहापालिकांना हे आदेश लाभदायक ठरणार आहेत. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव तथा मिशनचे संचालक प्रवीण प्रकाश यांच्या स्वाक्षरीचे हे पत्र २३ जानेवारीला काढण्यात आले आहे.

संबंधित महापालिका वेठीस
अमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत औरंगाबाद शहरातील स्वच्छतेविषयक पाहणी करण्यासाठी आलेल्या व तिघांचा समावेश असलेले केंद्रीय पथक लाचखोर निघाल्याच्या पार्श्वभूमिवर हे पत्रवजा निर्देश काढण्यात आले आहे.
औरंगाबाद येथे २१ जानेवारीला रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्यूसीआय पथकातील शैलेश बंजानिया याला १ लाख ७० हजार रूपयांची लाच स्वीकारताना अटक केली होती.
बंजानिया यांनी निगेटिव्ह मार्किंगचा धाक दाखवून औरंगाबाद महापालिकेतील जयश्री कुळकर्णी यांचेकडे अडीच लाखांची मागणी केली होती़ या तिघांमध्ये अमरावती शहराची तपासणी करून गेलेल्या विजय जोशी आणि गोविंद घिमिरे यांचा समावेश होता.
लाचखोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमिवर स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षणासाठी व मूल्यमापनासाठी येणाऱ्या चमूबद्दल केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनने पाचशे शहरांच्या महापालिका आयुक्तांना २३ जानेवारीला एक परिपत्रक पाठविले आहे. त्यात तीन मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत.
केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षणाची जबाबदारी क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाकडे दिली आहे. त्याअनुषंगाने देशातील ५०० शहरांचे सर्वेक्षण व मूल्यमापन करण्याचे कंत्राट सूरत येथील एका खासगी कंपनीला देण्यात आले. त्यांनी नेमलेल्या व्यक्तींकडून स्वच्छ सर्वेक्षण केले जात आहे. मात्र, यातील एक पथक औरंगाबादला लाच घेताना पकडले गेल्याने या अभियानाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला.
‘निगेटिव्ह मार्किंग’चा धाक दाखवून विविध शहरात पथकातील काहींनी संबंधित महापालिकांना वेठीस धरल्याच्या तक्रारी मिशनला प्राप्त झाल्यानंतर यापथकावर कोणताही खर्च करू नये, असे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र, २३ जानेवारीला हा आदेश काढण्यात आल्याने आम्ही तर खर्च करून चुकलो, अशी गत सर्वेक्षण होऊन गेलेल्या शहराच्या आयुक्तांची झाली आहे.
स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक येत असल्याने आधीच महापालिका यंत्रणा गपगार झाली होती. त्यात ते स्वच्छतेचे मूल्यांकन करीत असल्याने ते दुखावू नयेत, अशी भावना ठेवत महापलिकेने यापथकाची उत्तम सरबराई केली होती. मात्र, आता नव्याने आदेश धडकल्याने पथकावर खर्च केलेली ती रक्कम कुठल्या लेखाशिर्षावर दाखवायची ,असा पेच महापालिकेसमोर निर्माण झाला आहे.

असे आहेत मिशनचे निर्देश
सर्वेक्षण व मूल्यमापनासाठी आलेल्या टीमचा प्रवास, निवास आणि भोजनाचा खर्च मिशनतर्फे केला जाणार असून महापालिकांनी त्यावर कोणताही खर्च करु नये, या चमूला फक्त संबंधित शहराने स्वच्छतेबाबत केलेल्या कामाची खातरजमा करण्याचा व त्यासंबंधी कागदपत्रे जमा करण्याचाच अधिकार आहे. गुण देण्याचा किंवा शहराचे रॅकिंग ठरविण्याचा, त्यादृष्टीने शिफारस करण्याचा अधिकार नाही. सर्वेक्षण व मूल्यमापनासंदर्भातील शंकांबाबत प्रवीण प्रकाश यांचेशी संपर्क साधावा,असे स्वच्छ भारत मिशनने देशातील ५०० महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील असेसर्सना आधीच तो संपूर्ण खर्च केंद्रीय मंत्रालयाने वितरित केला आहे.

पहिल्याच दिवशी मारले ‘इम्प्रेशन’
१७ जानेवारीला क्यूसीआयचे चिफ असेसर चारुदत्त पाठक यांच्यासह विजय जोशी आणि गोविंद घिमिरे अमरावती महापालिकेत दाखल झाले होते. आपण यापूर्वी चार ते पाच जणांना निलंबित केले आहे, अशी फुशारकी त्यातील दोघांनी मारली. आपण किती कडक आहोत, हे सांगण्याचा तो प्रकार होता. त्यापार्श्वभूमीवर या पथकाच्या निवासाची व्यवस्था शहरातील बड्या हॉटेलमध्ये करण्यात आली. इतकेच नव्हे तर पथकाला महापालिकेच्या वाहनाने औरंगाबादला पोहोचवून देण्यात आले.

Web Title: Swachh Bharat Mission's 'Varanimagoon Horses'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.