शोभायात्रेने शिवदीक्षा सोहळ्याला प्रारंभ
By admin | Published: August 29, 2015 12:27 AM2015-08-29T00:27:48+5:302015-08-29T00:27:48+5:30
वीरशैव धर्मीय आपले धर्माचरण विसरत चालले आहेत. आजूबाजूंनी विषम परिस्थिती मानवाचे आचारण, जीवन पध्दतीवर सांस्कृतिक संक्रमण करीत आहे.
सिध्दलिंग शिवाचार्य : वीरशैवांनो, वैचारिक मरगळ झटकून टाका!
अमरावती : वीरशैव धर्मीय आपले धर्माचरण विसरत चालले आहेत. आजूबाजूंनी विषम परिस्थिती मानवाचे आचारण, जीवन पध्दतीवर सांस्कृतिक संक्रमण करीत आहे. प्रत्येक वीरशैवाने वैचारिक मरगळ झटकून आपल्या जन्माचा हेतू जाणून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वीरशैव धर्मगुरू ष.ब्र. १०८ सिध्दलिंग शिवाचार्य स्वामी यांनी केले. ते गुरुवारी श्रावणमासानिमित्त आयोजित सत्संग व शिवदीक्षा सोहळ्याच्या प्रथम दिवशी बोलत होते.
महाराज आपल्या प्रबोधनात म्हणाले की, आपल्याला दैवाने जन्माला घातले. परंतु आज मात्र आपण त्यालाच विसरत आहो. आपण जीवनाचे यात्रेकरू आहोत. जन्मात येण्यापूर्वी आपण कुठे होतो, हे कुणीच सांगू शकत नाही. मात्र जन्माला आल्यानंतर आपलं अस्तित्व निर्माण होते. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. या जन्माचे महत्त्व आपणच ओळखले पाहिजे. त्याकरिता प्रत्येक वीरशैवाने आपल्या धर्माचे आचरण अंगिकारले पाहिजे, असे बहुमोल विचार त्यांनी मांडले.
श्री सिध्दलिंग शिवाचार्य स्वामी महाराजांचे गुुरुवारी सकाळी ११ वाजता अमरावतीत आगमन झाले. श्री मृगेंद्र मठ संस्थान अमरावती येथे ४ दिवसीय सत्संग व शिवदीक्षा सोहळ्याचे आयोजन वीरशैव लिंगायत समाज मित्र मंडळ व आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले. तत्पूर्वी सायंकाळी ४ वाजता श्री महाराजांची शोभायात्रा परकोटाच्या आत काढण्यात आली. अत्यंत आकर्षक अशा रथावर सिध्दलिंग शिवाचार्य स्वामी स्थानापन्न झाले होते. श्री मृगेंद्र मठ, दहिसाथ, बसवेश्वर चौक, साबनपुरा या मार्गाने ही शोभायात्रा निघाली. ठिकठिकाणी वीरशैव कुटुंबीयांनी महाराजांचे पायपूजा व हारार्पण करून स्वागत केले. ठिकठिकाणी रोषणाई फटाक्यांची आतषबाजी व वारकऱ्यांच्या दिंडीने महाराजांचे स्वागत करण्यात आले. मृगेंद्र मठात सायंकाळी ७ वाजता श्री महाराजांचे आशीर्वचन सुरू होण्यापूर्वी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवीकांत कोल्हे तर आभार शिवराज पारटकर यांनी केले.
कार्यक्रमात बहुसंख्ये महिला, पुरुष व बालमंडळी सहभागी झाली होती. त्यामध्ये अनंतराव गुढे, सुधाकर आप्पा गाडवे, भारत मेंडसे, फिस्के, महाजन, मोरेश्वर आजने, गजानन आजने, सुरेंद्र गडवे, रामदासआप्पा शेटे, मनोहरआप्पा कापसे, दिलीप मानेकर, विजय ओडे, शैलेश ओडे, राजा हेरे, रवी गडवे, बाबासाहेब मिसे, नागेश मिसे, उदय चाकोते, शिवराज पारटकर, अरुण कापसे, रमेश मेंडसे, प्रकाश संगेकर, संजय कुऱ्हे, श्रीकांत बालटे, दीपक गव्हाणे, बाबुभाई मानेकर, विनय कोनलाडे, कैलास गिलोरकर, किशोर कापसे, पंकज क्षीरसागर, विशाखा सपाटे, कमल संगेकरसह असंख्य वीरशैव बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)