धान्यसाठा शालेय पोषण, अंगणवाडी की रेशनचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 09:30 PM2018-12-07T21:30:53+5:302018-12-07T21:31:07+5:30

धान्यतस्करीचा अड्डा ठरलेल्या परतवाडा शहरातून शेकडो क्विंटल धान्याची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. पोलीस आणि महसूल विभागाच्या कारवाईनंतर ठोस पुराव्याअभावी तस्करांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने कोट्यवधीची धान्य तस्करी बिनबोभाट सुरू आहे. पोलिसांनी गुरुवारी पकडलेला धान्याच्या ट्रकमधील माल अंगणवाडी, शालेय पोषण आहार की रेशनचा, यावर शिक्कामोर्तब न झाल्याने त्याची खोलवर तपासणी होणे गरजेचे ठरले आहे.

Grain stock school nutrition, anganwadi ki ration? | धान्यसाठा शालेय पोषण, अंगणवाडी की रेशनचा?

धान्यसाठा शालेय पोषण, अंगणवाडी की रेशनचा?

Next
ठळक मुद्देतस्करांपुढे कायदा थिटा : धान्य आणले कुठून; चौकशी होणे महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : धान्यतस्करीचा अड्डा ठरलेल्या परतवाडा शहरातून शेकडो क्विंटल धान्याची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. पोलीस आणि महसूल विभागाच्या कारवाईनंतर ठोस पुराव्याअभावी तस्करांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने कोट्यवधीची धान्य तस्करी बिनबोभाट सुरू आहे. पोलिसांनी गुरुवारी पकडलेला धान्याच्या ट्रकमधील माल अंगणवाडी, शालेय पोषण आहार की रेशनचा, यावर शिक्कामोर्तब न झाल्याने त्याची खोलवर तपासणी होणे गरजेचे ठरले आहे.
जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी परतवाडा तेथील धान्यतस्कर रशीद अशरफ उर्फ टोपली याचा सोळा चाकी ट्रक पकडला. त्यामध्ये तांदूळ आणि गहू होते. हा धान्यसाठा त्याने कोठून आणला, हे अद्याप अनुत्तरित आहे. पोलिसांनी पुरवठा विभागाला पत्र देऊन विचारणा केली आहे.
सर्व धान्य सारखेच दिसत असल्याने कार्यवाहीअंती न्यायालयात हा शासकीय माल असल्याचा ठोस पुरावा यंत्रणेजवळ मिळत नाही. परिणामी पुराव्याअभावी तस्कराला धान्य परत देण्याचा आदेश न्यायालयाला द्यावा लागल्याचा प्रकार बंडू अग्रवालच्या प्रकरणात घडला. त्यामुळे तस्करांचे मनोबल प्रचंड उंचावले.
परतवाडा व परिसरात कुठेच धान पीक घेतले जात नाही. तरीसुद्धा परतवाडा शहरातून शेकडो क्विंटल तांदळाची तस्करी परप्रांतात केल्या जात असल्याचे आतापर्यंतच्या धाडीत उघडकीस आले आहे.
पुराव्यानिशी कारवाईची गरज
परतवाडा शहरातील धान्यतस्कर तांदूळ व गहू कोणाकडून विकत घेतात किंवा कोठून आणतात, याची शोधमोहीम आता महसूल व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या राबविणे गरजेचे आहे. तस्कराला पोलीस खाक्या दाखविणे गरजेचे असून, त्यानंतरच इतरांची नावे पुढे येतील. पोलिसांनी अचलपूर तहसील कार्यालयाला सदर धान्यासंदर्भात पत्र दिले असले तरी महसूल विभागात जवळ धान्य सरकारी की खाजगी अशी ओळख करणारी कुठलीही यंत्रणा नाही, शिवाय साठा किती करावा, यालाही बंधन नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पकडण्यात आलेला हा धान्यसाठा सुटण्याची भीती वर्तविली जात आहे.
धान्यसाठा आला कुठून?
रशीद टोपली याच्या गोदामासह मिनी ट्रक व ट्रकमधून महसूल व पोलीस विभागाने वेगवेगळ्या कारवायांमध्ये तांदूळ व इतर धान्यासाठा पकडण्यात आला होता. त्याने पूर्वी वेगवेगळ्या धान्य दुकानदारांच्या पावत्यासुद्धा महसूल विभागाला दाखविल्या. त्याची चौकशी करण्यात आली. मात्र, हे धान्य नजीकच्या चिखलदरा, अंजनगाव, दर्यापूर, चांदूरबाजार या तालुक्यांतील अंगणवाडी, शालेय पोषण आहार व रेशनच्या दुकानांतील असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे अंगणवाडी व शालेय पोषण आहाराच्या तांदळाचीसुद्धा चौकशी होणे गरजेचे ठरले आहे.

चिखलदऱ्यातील गोदामाची तपासणी करा
अचलपूर तालुक्यातील १६६ पैकी १३० रेशन दुकाने बायोमेट्रिक करण्यात आली आहेत. उर्वरित रेशन दुकानांना आधारसक्ती असल्याने आवश्यक तेवढा साठा दिला जात आहे. परतवाडा शहराला लागून चिखलदरा तालुका आहे. तेथील चुरणी, राहू, सेमाडोह, गौरखेडा बाजार व शहापूर या पाचही धान्य गोदामांची तपासणी होणे गरजेचे ठरले आहे. तालुक्यातील शाळांना मोठ्या प्रमाणात खिचडीसाठी पोषण आहाराचा तांदूळ दिला जातो. अंगणवाडी केंद्रातही तांदूळ असल्याने मेळघाटातूनच परतवाडा शहरात धान्य तस्करीची चर्चा बरीच बोलकी आहे.

परतवाडा पोलिसांनी पकडलेले धान्य कुणाचे, यासंदर्भात पत्र दिले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. अचलपूर तालुक्यातील ८७ टक्के रेशन दुकाने बायोमेट्रिक करण्यात आली आहेत. तरीसुद्धा तपासणी व सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
- शैलेश देशमुख,
पुरवठा अधिकारी, अचलपूर तहसील

Web Title: Grain stock school nutrition, anganwadi ki ration?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.