शेतक-यांना मताधिकार, प्राधिकरणाने मागविल्या याद्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 03:39 PM2017-12-05T15:39:17+5:302017-12-05T15:40:42+5:30

अमरावती : शासनाच्या नव्या नियमानुसार किमान १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतक-याला सहकारात मताधिकार प्राप्त झाला.

Franchise to farmers, authority ordered list | शेतक-यांना मताधिकार, प्राधिकरणाने मागविल्या याद्या

शेतक-यांना मताधिकार, प्राधिकरणाने मागविल्या याद्या

googlenewsNext

गजानन मोहोड
अमरावती : शासनाच्या नव्या नियमानुसार किमान १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतक-याला सहकारात मताधिकार प्राप्त झाला. मतदार निकष बदलामुळे निवडणुकांची नवीन नियमावली सहकार विभागाने ६ नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली. आता याच निकषान्वये राज्यातील ३०१ बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने २०१८ मध्ये निवडणूक असलेल्या बाजार समित्यांच्या याद्या तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे.

पुणे बाजार समितीची निवडणूक यामध्ये विशेष चर्चिली जात आहे. या बाजार समितीचा कार्यकाळ १३ फेब्रुवारी २०१६ रोजी संपुष्टात आला; मात्र मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे येथील निवडणूक प्रक्रिया रखडली होती. ८ आॅगस्ट २०१७ला निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे मत न्यायालयाने नोंदविल्याने आता राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणद्वारा निवडणूक घेण्यापूर्वी मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. निवडणुकीस पात्र असलेल्या अन्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येदेखील नव्याने मतदार याद्या करण्याची तयारी सुरू झालेली आहे.

ज्या बाजार समित्यांचा कार्यकाल पुढच्या वर्षी संपणार आहे, त्याचा अहवाल बाजार समित्यांच्या सचिवाला ३१ डिसेंबरपूर्वी राज्य सहकारी प्राधिकरणाकडे सादर करावा लागणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर प्राधिकरणद्वारा १५ दिवसांत निवडणुकीस पात्र असलेल्या बाजार समित्यांची यादी प्रसिद्ध करणार आहेत व त्याच तारखेला शेतकरी मतदारसंघासाठी प्रत्येक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विद्यमान यादीमध्ये १५ समान गण विभाजन करण्यात येणार आहेत व प्रत्येक गणातून एक जागा निवडण्यात येणार आहे. शेतकरी मतदारसंघातील राखीव जागा लॉटरी पद्धतीने घोषित करण्यात येणार आहे. मतदार यादीतील नावे शेतक-यांच्या वर्णक्रमानुसार राहणार आहे.

यादीची जबाबदारी जिल्हाधिका-यांकडे
जी व्यक्ती १० आर शेतजमीन धारण करीत आहे व बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील आहे, अशा शेतकरी मतदारसंघाची गावनिहाय यादी संबंधित बाजार समितीच्या सचिवाला व जिल्हा निवडणूक अधिका-याला बाजार समितीचा कार्यकाळ संपण्याच्या किमान १८० दिवस अगोदर प्राथमिक यादी देण्याची जबाबदारी जिल्हाधिका-यांची आहे. यानंतरच्या ३० दिवसांत सचिव प्रारूप मतदार यादी तयार करतील व ज्या शेतक-यांनी मागील पाच वर्षांमध्ये शेतमाल किमान तीन वेळा विक्री केला आहे, त्यांची नावे समाविष्ट करतील.

उमेदवारीसाठी २१ वर्षांचा निकष
जो शेतकरी संबंधित बाजार समितीच्या क्षेत्रात राहतो, त्याचे वय निवडणूक जाहीर झाल्याच्या दिवशी २१ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि त्याला जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांनी अधिनियमाद्वारे अपात्र केलेले नसावे व त्याचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट असावे, तीच व्यक्ती शेतकरी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास पात्र राहणार आहे.

Web Title: Franchise to farmers, authority ordered list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.