चिखलदऱ्यात दिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:38 AM2019-05-10T00:38:11+5:302019-05-10T00:38:36+5:30
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई पाहता पर्यटकांनी या एकमेव पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांमध्ये पाणीटंचाईविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई पाहता पर्यटकांनी या एकमेव पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांमध्ये पाणीटंचाईविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सिडकोनंतर कोट्यवधीच्या विकासकामाचा कांगावा केला जात असला तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य बारा वर्षांपासून पाचवीला पुजलेले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो आराखडे कागदावरच आखण्यात आले. चिखलदरा शहर विकास प्राधिकरण अंतर्गत तयार बागलिंगा प्रकल्पाची उभारणी भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी असताना प्रत्यक्षात बारा वर्षांपासून चिखलदरावासीयांची फरफट थांबलेली नाही. पाण्याअभावी पर्यटकांनीसुद्धा सुविधा मिळत नसल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीतला आखलेला बेत रद्द केला आहे.
टँकरने विकतचे पाणी
पर्यटनस्थळावरील हॉटेल व्यावसायिकांना प्रतिटँकर सहाशे रुपये दराने पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. सहा लाख लिटर दररोज हवे असताना दिवसाआड साडेचार लाख लिटर पाणी नळावाटे सोडले जात आहे.
आठशे ग्राहक अन् तलाव कोरडे
चिखलदरा शहराला जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. चिखलदºयात केवळ ८६९ ग्राहक आहेत. त्यांना दररोज सहा लक्ष लिटर पाणी आवश्यक आहे. शहरातील शक्कर तलाव आटला. कालापाणी तलावात मोजकाच जलसाठा उपलब्ध आहे. शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील आमझरी गावातून चिखलदरा शहराची तहान भागविली जात आहे. शक्कर तलाव इंग्रजकालीन असला तरी १२ वर्षांपूर्वी खोदकामासोबत भूसुरुंग (ब्लास्टिंग) केल्याने खोलपर्यंत भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यातच तलावातील पाणी वाहून जाते. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे स्वारस्य कुणीही दाखविले नाही.
पाण्याऐवजी घोषणांचा पाऊस
चिखलदरा शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. त्यालगत चंद्रभागा, सपन, शहानूर आदी प्रकल्पासह इतर लहान-मोठे तलाव आहेत. प्रत्यक्षात दरवर्षी उन्हाळा येताच पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. तरीसुद्धा स्थानिक प्रशासनासह कोणीच गंभीर नसल्याचे दुर्दैवी चित्र नागरिकांसह पर्यटकांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे.