अमरावती जिल्ह्यातील 134 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 01:15 PM2017-10-18T13:15:34+5:302017-10-23T14:08:38+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या यशानंतर काँग्रेसने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवरदेखील झेंडा फडकविला आहे. जिल्ह्यातील २५५ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

Congress flag on 134 gram panchayats in the state | अमरावती जिल्ह्यातील 134 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

अमरावती जिल्ह्यातील 134 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

Next

अमरावती :  जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या यशानंतर काँग्रेसने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवरदेखील झेंडा फडकविला आहे. जिल्ह्यातील २५५ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यापैकी १३४ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात गेल्या आहेत. भाजपा सरकारने गत तीन वर्षांपासून शेतकरी सर्वसामान्यांची केलेली दिशाभूल पुढे येत असून, ख-या अर्थाने ही पुढील विधानसभेची कलचाचणी असल्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

जिल्ह्यातील २५५ ग्रामपंचायतींकरिता १६ ऑक्टोबर रोजी निवडणुका पार पडल्या. मंगळवारी दुपारपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध करीत २४९ पैकी १३४ ग्रामपंचायतींवर कब्जा केला. या निवडणुकीतून गेल्या तीन वर्षांपासून जनतेची दिशाभूल करणाºया भाजपला त्यांची जागा मतदारांनी आता ख-या अर्थाने दाखवून दिलेली आहे. ग्रामस्तरावर अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणा-या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का देत काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आली आहे. १३४ सरपंच काँग्रेसचे निवडून आले असून, उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या संख्येने सदस्य निवडून आले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या यशानंतर काँग्रेसने ग्रामपंचायतींवरदेखील कब्जा करीत आपला झेंडा कायम ठेवला आहे. 

भाजपा शासनाने आतापर्यंत जनतेची फसवणूकच केली आहे. थेट सरपंचपदाची निवडणूक भाजपने ज्यासाठी लावली होती, तो डाव मतदारांनी धुळीस मिळविला. यापूर्वीच या शासनाचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. नांदेड महानगरपालिकेमध्ये मतदारांनी यावर शिक्कामोर्तब केले, तर आता अमरावती जिल्ह्याच्या मतदारांनी भाजपला धक्का देऊन त्यांचा परतीचा मार्ग प्रशस्त केला आहे. कर्जमाफी, महागाई, जीएसटी याचाच जाब जनतेने दिल्याचे मत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केले. 
ग्रामपंचायत निवडणूक ही विधानसभेची कलचाचणी असून, येणा-या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण जिल्हाच काँग्रेसमय होईल, असा दावा बबलू देशमुख यांनी यावेळी केला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या यशानंतर त्यांनी लोकांचे आभार मानले आहे.
चांदूर रेल्वे मतदारसंघात विजयाचे दावे-प्रतिदावे

थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या राजकीय वर्चस्वाचे दावे प्रतिदावे केले. दरम्यान, चांदूर रेल्वे मतदारसंघात सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत़ या मतदारसंघातील तीनही तालुक्यांमध्ये शेवटच्या टप्प्यात राजकीय रंग चढला़ काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी धामणगाव तालुक्यात ५, नांदगाव खंडेश्वर ९ व चांदूर रेल्वे तालुक्यात १० सरपंचपदाचे विजयी उमेदवार काँग्रेसचे असल्याची माहिती दिली. धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी नांदगाव खंडेश्वरमध्ये भाजपने ९, चांदूर रेल्वे ९, धामणगाव रेल्वे तालुक्यात ४ जागा काबीज केल्याचा दावा केला आहे. 
भाजपा सर्वत्र  पिछाडीवर 
धारणी तालुका वगळता भाजपने दणदणीत यश मिळविल्याचा दावा केला नाही. चांदूरबाजार, अचलपूर तालुक्यात प्रहारला यश मिळाले.  काँग्रेसचे अस्तित्व तेथेही आहेच. तिवसा, धामणगाव, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, भातकुली, वरुड व मोर्शी या तालुक्यांत काँग्रेसने निर्विवाद विजय मिळविला आहे.  
काँग्रेस आमदारांचा करिश्मा कायम
आमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा व आमदार वीरेंद्र जगताप यांच्या चांदूर रेल्वे मतदारसंघात काँग्रेसने सर्वाधिक  जागांवर विजय मिळविला आहे. मोदी लाटेतही काँग्रेसच्या या दोन नेत्यांनी आमदारकीत देखणा विजय मिळविला होता. पुढे ही परंपरा विविध निवडणुकांत कायम ठेवत आता थेट सरपंचपदाच्या निवडणुकांमध्येही त्यांनी स्वनेतृत्वाचा ठसा उमटविला आहे.

Web Title: Congress flag on 134 gram panchayats in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.