व-हाडात अप्रमाणित सोयाबीन, बीटी कापसाचे बियाणे आले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 10:08 AM2018-04-11T10:08:13+5:302018-04-11T10:08:13+5:30

नकली बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता

Untreated Soyabean | व-हाडात अप्रमाणित सोयाबीन, बीटी कापसाचे बियाणे आले!

व-हाडात अप्रमाणित सोयाबीन, बीटी कापसाचे बियाणे आले!

Next

राजरत्न सिरसाट/अकोला: विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात बोगस बीटी कापूस बियाण्यांचे प्रस्थ वाढले आहे. खरीप हंगाम दीड महिना पुढे असताना, त्याआधीच बोगस ‘एचटी’ तंंत्रज्ञानयुक्त बीटी कापसाचे बियाणे तेलंगणा राज्याच्या सीमेवर पकडण्यात आल्याने हे अधोरेखित झाले आहे. कापूस हे विदर्भासह राज्यात प्रमुख व्यापारी पीक झाले आहे. त्यामुळे यावर्षी या पिकाचे नकली बियाणे बाजारात येण्याची शक्यता असून, शेतक-यांची फसवणूक होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. विदर्भात प्रामुख्याने कापसाचे हे बोगस बियाणे विकले जात आहे. मागील वर्षी बोगस बियाणे आढळले होते. यावर्षीही कापसाचे नकली बियाणे हे राउंड अप बीटी, तणावरची बीटी, विडगार्ड बीटी, तणनाशक बीटी या नावाने बोगस बेकायदेशीरपणे विकल्या जाण्याची शक्यता आहे, तसेच हे बियाणे काही अनोळखी व्यक्तींकडून कमी किंवा जास्त किमतीत विकल्या जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या बियाण्याला अजूनपर्यंत शासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी मिळालेली नाही. बोगस बियाणे कमी किंवा जास्त किमतीमध्ये व कोणत्याही प्रकारची पावती न देता अधिकृत वा अनधिकृत व्यापा-यांमार्फत विकल्या जाऊ शकते.

पश्चिम विदर्भात मागील चार-पाच वर्षात मोठ्या प्रमाणात बोगस, अप्रमाणित बियाणे व रासायनिक खताचा साठा आढळून आला. गतवर्षी अप्रमाणित कीटक, तणनाशकांचा साठा अकोल्यासह अमरावती, यवतमाळ व इतर जिल्ह्यात आढळला. त्याअगोदर मूर्तिजापूर येथे बोगस खताचा साठा सापडला होता. अकोटात सोयाबीनचे बोगस बियाणे तयार करणारा चक्क कारखानाच निदर्शनास आला होेता. या कारखान्यावर गुणवत्ता नियंत्रण विभागाने कारवाई केली होती. तरीही जिल्ह्यात बोगस बीटी कापसाचे बियाणे खुलेआम विक्री करण्यात आले. या पृष्ठभूमीवर अकोला जिल्हा कृषी विभाग व गुण नियंत्रण विभागाच्या अधिका-यांना तसेच कृषी विभागाला अधिक दक्ष राहावे तर लागणारच आहे, शिवाय शेतकºयांनादेखील काळजीपूर्वक बियाणे खरेदी करावे लागतील.

पण मागील पाच वर्षात सापडलेल्या बोगस खताचा किती साठा विकला गेला, काय कारवाई केली, याची अद्याप पूर्ण माहिती नाही. ही खते शोधून काढण्यासाठी अधिका-यांची मोठी कसोटी लागणार असल्याचे ‘लोकमत’ने यासंबंधी वारंवार कृषी विभागाला सतर्क केले आहे, हे विशेष. यावर्षी पश्चिम विदर्भात यंदा मोठ्या प्रमाणात बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता वाढली असून, अप्रमाणित सोयाबीनचे बियाण्याचे साठे तयार करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. कृषी विभाग यंदा लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येत असले, तरी मागीलवर्षी अकोला जिल्ह्यात सापडलेला बोगस बियाणे व खताचा साठा बघता, शेतकºयांनी बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे.
पश्चिम विदर्भातील मागील वर्षी अमरावती, यवतमाळ व इतर जिल्ह्यात गेल्या वर्षी अप्रमाणित, बोगस बियाणे व बोगस रासायनिक खताचा साठा जप्त करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे सोयाबीनचे बोगस बियाणे तयार करणारा चक्क कारखानाच निदर्शनास आला होेता. -

अप्रमाणित खते; प्रकरण न्यायालयात
अकोल्यातील आद्योगिक वसाहतीत २०१६-१७ च्या खरीप हंगामात अप्रमाणित खताचा साठा सापडला होता. त्या प्रकरणाची न्यायालयात सुणावणी सुरू आहे. ६ एप्रिलला हे प्रकरण न्यायालयासमोर आले होते. आता येत्या १० एप्रिलला यावर सुनावणी होणार असल्याची शक्यता असल्याने न्यायालयाच्या निकालाकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

- पोलिसांची घेणार मदत
यावर्षी कृषी विभागाने अमरावती विभागीय स्तरावर ६१ भरारी पथके तयार केली आहेत. यावर्षी याकामी पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांना बोगस, अप्रमाणित बियाणे ओळखण्यासाठीचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

- अकोला अप्रमाणित बियाणे, खते, कीटकनाशकाचे केंद्र
पश्चिम विदर्भात बियाण्यांचा काळाबाजार होत असून, अकोला जिल्ह्यातही अप्रमाणित सोयाबीनचे बियाणे विक ले जात आहे. येथील औद्योगिक वसाहतीतील गोदामात या बोगस कृषी निविष्ठा साठवल्या जात आहेत. यामध्ये दिल्ली, काश्मीर, गुजरात, मध्यप्रदेशसह इतर राज्याशी थेट कनेक्शन आहे. त्याचा प्रत्यय मागील वर्षी पकडलेल्या या साठ्यावरू न समोर आला. त्यांच्या मागील वर्षी मूर्तिजापूर येथे बोगस खताचा साठा सापडल्यानंतर पुन्हा ही बाब अधोरेखित झाली होती. असा माल सापडल्यानंतरच कृषी विभाग खडबडून जागा होतो; पण पुढे काय कारवाई झाली, असा प्रश्न शेतकºयांकडून सातत्याने विचारला जात आहे. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमधील दोन गोदामातून विनापरवाना कीटकनाशकांचा साठा गुणनियंत्रण विभागाने जप्त केला होता. या प्रकरणाची सुनावणी कृषी आयुक्तासमोर होणार होती. मागील काही वर्षात अशी अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत; परंतु अद्याप एकही ठोस कारवाई न झाल्याने कृषी विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

- गुणनियंत्रण, कृषी विभागाला हे माहीत नसते का?
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात दरवर्षी बोगस, अप्रमाणित कृषी निविष्ठा सर्रास येतात आणि विकल्या जातात, याची कोणतीच पूर्वसूचना कृषी व संबंधित गुणवत्ता नियंत्रण विभागाला मिळत नाही का, हा प्रश्न प्रकर्षाने शेतकººयांकडून विचारला जात आहे. हे एवढ्यावरच थांबलेले नाही, तर अनेक नामांकित कृषी निविष्ठा निर्मात्या कंपन्याचे बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी मागीलवर्षी केल्या आहेत. बियाणे उगवलेच नसल्याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

- या नावाने विकली जाते बोगस बीटी
आरआर, राऊंड अप बीटी, तणावरची बीटी, वीडगार्ड बीटी असे अनेक बोगस व बेकायदेशीर बीटी कापसाचे बियाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाजारात विकले जाण्याची शक्यता आहे. बोगस तणनाशक तंत्रज्ञानयुक्त बियाणे नुकतेच तेलंगणा राज्याच्या सीमेवर आदिलाबाद येथे पकडण्यात आले आहे. हे बियाणे अधिकृत नसून, या बियाण्यांना विकण्याची शासनाने परवानगी दिलेली नाही. या बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केलेली आहे, याचा उल्लेख नाही. असे असताना या बीटीची विदर्भात गेल्या वर्षी सर्रास विक्री होत असते.

-तणनाशक बीटी लवकरच बाजारात!
एका नामांकित कंपनीचे तणनाशक बीटी बियाणे लवकरच बाजारात येण्यार असल्याची चर्चा चार ते पाच वर्षांपूर्वी होती. या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक कृषी विद्यापीठ व संस्था घेत असल्याचेही सांगण्यात येत होते. या बीटीमध्ये राऊंड अप म्हणजे तणनाशक आणि रेडी फ्लॅक्स म्हणजे या कापूस पिकावर केव्हाही फवारणी केली तरी चालेल, असे हे तंत्रज्ञान असल्याचे बोलले जात होते. हे तंत्रज्ञान बाजारात येण्याअगोदरच अशा स्वरू पाचे तंत्रज्ञान आल्याचे भासवून बोगस बीटीची विक्री करण्यात येत आहे.

- ही सापडली होती कीटकनाशके
पहिल्या गोदामातून रेम्बो जिब्रालिक अ‍ॅसिड, रेनफिट प्रेटिकाक्लोर, आॅक्सिजन ट्रायाकॉन्टानॉल एकूण २,१३४ लिटर किंमत १४ लाख ९६ हजार ६८८ रुपयांचे जप्त केले. दुस-या गोदामातून ७७५ लिटर पिलर तणनाशक जप्त केले. या रसायनाची किंमत ही ११ लाख ६८ हजार ६९० रुपये आहे. दोन्हीची किंमत २६ लाख ६५ हजार ३७८ रू पये एवढी होती. ही २ हजार ९१४ लिटर कीटकनाशके जप्त केली होती.

- जहाल कीटकनाशकांमुळे शेतक-यांचा मृत्यू !
जहाल कीटनाशकांच्या फवारणीमुळे मागीलवर्षी विदर्भात २७ च्यावर शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, पाचशेच्यावर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती. यातील अनेक जणांची दृष्टी गेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २० च्यावर शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. ४०३ शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. अकोला जिल्ह्यात ६ मृत्यू तर १०५ च्यावर मजुरांना विषबाधा झाली होती; पण विनापरवाना तसेच बोगस कीटकनाशकासंदर्भात एकही ठोस कारवाई झालेली नाही. एमआयडीसी फेज २ मध्ये माहेश्वरी बायो फ्यूएल प्लॉट क्रमाक १४ मलकापूर येथे मे. रेनबो क्रॉप हेल्थ लिमिटेड तसेच न्यू रवी स्पिनिंग मॅन्युफॅक्चर कंपनी एमआयडीसी फेज २ प्लॉट न.एफ -२२ मध्येच मे.भारत इन्सेक्टिसाइट लि. गोदाम आहे. या दोन्ही ठिकाणाहून परवाना नसताना अप्रमाणित तण व कीटकनाशके बाजारात पुरविली जात होती. गुणनियंत्रण विभागाने येथे छापा टाकला होता. त्यावेळी अधिकाºयांनी कागदपत्रांची तपासणी केली असता, कंपनीच्या संचालकांकडे विक्रीची कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे विभागीय गुणनियंत्रक विभागाच्या चमूने दोन्ही ठिकाणचे गोदाम सील करू न तण व कीटकनाशके जप्त केली होती. पुढे काय झाले, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

- बियाणे खरेदी करताना काळजी घ्या
कापसाच्या बोगस बियाण्यांमुळे शेतीचे तसेच पर्यावरणाचे नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठी शेतकºयांनी कापूस बियाण्याची खरेदी करताना अधिकृत परवानाधारक दुकानदाराकडून बियाणे खरेदी करावे.

 

Web Title: Untreated Soyabean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी