प्राणी-पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढणारा कलाकार काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 13:19 IST2019-02-10T13:16:13+5:302019-02-10T13:19:31+5:30
ज्यांनी आदिवासी भागातील लोककला ‘कांबडनृत्य’ ‘दिल्ली’पर्यंत नेले, असे प्राणी-पक्षी यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करुन पयर्टकांचे मनोरंजन करणारे सुवर्ण पदकाने सन्मानित, अकोले तालुक्यातील उडदावणे येथील ठाकर समाजातील अवलिया कलाकार ठका कुशाबा गांगड यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने रविवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 8.30 वाजता निधन झाले.

प्राणी-पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढणारा कलाकार काळाच्या पडद्याआड
अकोले: ज्यांनी आदिवासी भागातील लोककला ‘कांबडनृत्य’ ‘दिल्ली’पर्यंत नेले, असे प्राणी-पक्षी यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करुन पयर्टकांचे मनोरंजन करणारे सुवर्ण पदकाने सन्मानित, अकोले तालुक्यातील उडदावणे येथील ठाकर समाजातील अवलिया कलाकार ठका कुशाबा गांगड यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने रविवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 8.30 वाजता निधन झाले.
‘ठकाबाबा’ म्हणून ते तालुक्यात परिचित होते. भंडारदरा धरणाच्या पाणलोटातिल दुर्गम आदिवासी खेड उडदावणे येथे १९३२ मध्ये ठकाबाबाचा जन्म झाला. पशु-पक्ष्यांचे हुबेहूब आवाज आणि अंगी बाणलेल्या विनोदीवृत्तीच्या ‘नानाकळा’ हेच ठकाबाबांचे आयुष्याचे भांडवल होते. अगदी सहजगत्या ते जीभ स्वत:च्या नाकाच्या शेंड्याला टेकवत आणि रामदेवबाबा सारखा पोटाचा गोळा करुन ‘नागफणा’करुन दाखवत.
सह्याद्रीच्या डोंगररांगात धुंवाधार बरसणारा पाऊस,घोगावत वाहणारा बेफान वारा, कड्यावरुन कोसळणाऱ्या धबधब्यांचा धीरगंभीर आवाज,ओढ्यानाल्यांचा खळखळाट, बिबट्याच्या डरकाळ्या, मोरांचा केकारोे, पशुपक्ष्यांचे मंजूळ आवाज असे निसर्ग संगीताचे हुबेहूब आवाज तोंडने काढण्याची कला त्यांना अवगत होती. ही कला आणि पारंपारिक नृत्याच्या जोरावर ठकाबाबांनी दिल्लीपर्यंत धडक मारली.
सन १९६५ च्या प्रजासत्ताकदिनी येथील आदिवासी कलाकारांचे पथक दिल्लीतील राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रथम क्रमांक मिळविला. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री तसेच इंदिरा गांधी यांच्या हस्ते पथकाला सुवर्णपदकाने सन्मानीत करण्यात आले, या पथकात ठकाबाबांचा समावेश होता.
हरहुन्नरी ठकाबाबा यांनी आदिवासी भागातील ‘बोहडा’लोककला जोपाण्याचे काम ही केले आहे. एक दिड वर्षांपूर्वी ‘चला हवा येवू द्या’चा कार्यक्रम संगमनेरला झाला त्यावेळीही ठकाबाबा यांचा सन्मान करण्यात अला होता.त्यांच्या निधनाने आदिवासी भागात हळहळ व्यक्त कोत आहे.