पाणी पेटले : नगरचे पावणेसहा टीएमसी पाणी जायकवाडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:18 AM2018-10-25T11:18:56+5:302018-10-25T11:36:56+5:30

नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंगावत असताना मुळा व भंडारदरा धरणातून ५़ ७५ टीएमसी पाणी जायकवाडीला जाणार आहे.

Water pellet: TMC water in the town of Jaiwakwadi | पाणी पेटले : नगरचे पावणेसहा टीएमसी पाणी जायकवाडीला

पाणी पेटले : नगरचे पावणेसहा टीएमसी पाणी जायकवाडीला

Next

अण्णा नवथर
अहमदनगर : नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंगावत असताना मुळा व भंडारदरा धरणातून ५़ ७५ टीएमसी पाणी जायकवाडीला जाणार आहे. जायकवाडीला पाणी गेल्यास राहुरी, कोपरगाव, अकोले, नेवासा, संगमनेर, राहाता, पारनेर या तालुक्यांना उन्हाळ्यात शेतीसाठी मिळणाऱ्या आवर्तनावर पाणी सोडावे लागेल़ रब्बीच्या पिकासाठी मुळा व भंडारदरा धरणातून प्रत्येकी एक आवर्तन दिवाळीनंतर सोडण्यात येईल. पण, ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी एकही आवर्तन सुटणार नसल्याने बळीराजाची झोप उडाली आहे. 
मुळा, भंडारदरा आणि कुकडी धरणावर जिल्ह्यातील साखर कारखानदारी अवलंबून आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याने नगर जिल्ह्यातील शेतीचे अर्थकारण पूर्णपणे बिघडले आहे. लाभक्षेत्रात जरी पाऊस पडला नाही, तरीही या भागातील शेतीला धोका नव्हता.  कारण मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होऊन १५ आॅगस्टपर्यंत धरणे भरत होती. यंदा झालेही तसेच परंतु, आॅक्टोबर उजाडला आणि समन्यायी पाणी वाटपाची चर्चा सुरू झाली. नगर व नाशिकचे पाणी जाायकवाडीला जाणार, या नुसत्या चिंतेने बळीराजाचे अवसान गळाले़ पिक घ्यावे की शेती पडीक ठेवावी, याचा अंदाज बांधणे त्यांना कठीण झाले.  ऐन दिवाळीच्या तोंडावर समन्यायी पद्धतीने पाणी वाटपावर प्रत्यक्षात कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. पुढील दोन- चार दिवसांत मुळातून १.९० तर भंडारदरातून ३.८५ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले जाईल. या दोन्ही प्रमुख धरणांतील पाणी जायकवाडीला गेल्यास दक्षिणेप्रमाणेच उत्तरेतील तालुक्यांनाही दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. दुष्काळात प्रशासनाला दक्षिणेतील तालुक्यांनाच फक्त पिण्याचे पाणी देण्याची आवश्यकता भासत असे. यंदा मात्र अकोले, कोपरगाव आणि श्रीरामपूर वगळता ११ तालुक्यांना टंचाईच्या झळ सोसाव्या लागणार असल्याने प्रशासनही धास्तावले आहे. पुढील जून व जुलैपर्यंत पिण्यासाठी पुरेल एवढा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. पिण्याचे आरक्षण वगळून मुळातून साडेपाच टीएमसीचे एक आवर्तन रब्बीसाठी देता येईल़ भंडादरातून रब्बीसाठी एक आवर्तन मिळेल.  कुकडी प्रकल्पातून उद्या गुरुवारपासून शेतीसाठीचे आवर्तन सुटणार आहे. तिन्ही धरणांतील शेतीचा वाटा नोव्हेंबपर्यंत संपेल. त्यानंतर धरणांतून पाणी सुटणार नाही.
काय होणार परिणाम
मुळातून रब्बीचे एकमेव आवर्तन
च्जायकवाडीला १.९० टीएमसी पाणी सोडल्यानंतर मुळा धरणात सहा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. उजव्या कालव्यातून साडेपाच टीएमसीचे एक आवर्तन रब्बीच्या पिकांसाठी सोडण्यात येईल. तसेच डाव्या कालव्यातून अर्धा टीएमसीचे एक अवर्तन सोडण्यात येईल. दोन्ही कालव्यातील आवर्तने नोव्हेंबरमध्ये देण्यात येतील़ त्यानंतर मुळातून शेतीसाठी पाणी सुटणार नसल्याने शेतक-यांनी त्यादृष्टीने पिकांचे नियोजन करावे.
भंडारदरा उन्हाळ्यात रिकामे होणार
नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून सर्वाधिक ३. ८५ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात येईल. भंडारदरा व निळवंडे धरणात एकूण १६ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी चार टीएमसी पाणी जायकवाडीला जाईल.त्यामुळे या धरणांत १२ टीएमसी पाणी शिल्लक राहील. त्यापैकी सुमारे १ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होईल. भंडारदरा धरणातून सध्या रब्बीचे आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन साडेतीन टीएमसीचे आहे. याशिवाय भंडारदरा धरणातून संगमनेर, राहाता, राहुरी आणि श्रीरामपूर नगरपालिकांना पिण्यासाठी महिन्याला एक आवर्तन सोडावे लागेल. त्यासाठी तीन टीएमसी एवढे पाणी लागणार आहे.
नद्या कोरड्या:
नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून मुळा, प्रवरा आणि गोदावरी नदीपात्रातून पाणी सोडण्यात येणार आहे. दुष्काळ असल्याने या तिन्ही नद्या सध्या कोरड्याठाक आहेत. पाणी नसल्याने नदीपात्रातून मोठ्याप्रमाणात वाळू उपसा झाल्याने मोठे खड्डे पडलेले आहेत.  त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातून सोडण्यात येणारे नऊ टीएमसी पाणी जायकवाडीला पोहोचणार नाही. निम्मपेक्षा अधिक पाणी वाया जाणार असल्याने पाणी सोडण्याचा अट्टाहास कशासाठी, असा सवाल या भागातील शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे.

उत्तरेतील ३४ लघु प्रकल्पही कोरडेठाक
 अकोले,संगमनेर, पारनेर, पाथर्डी, राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातील लघु प्रकल्पांतील पाणी मार्च व एप्रिलपर्यंत पुरते. यंदा मात्र जिल्ह्यातील ३४ लघु प्रकल्पांमध्ये केवळ २ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ््यात या भागात भीषण टंचाई निर्माण होणार आहे.
कृष्णा व गोदावरी खोºयांवर भिस्त
 गोदावरी खोरे प्रकल्पातून राहुरी, कोपरगाव, अकोले, संगमनेर, राहाता, नेवासा, शेवगाव, पाथर्डी आणि पारनेरच्या काही भागाला पाणी मिळते. गोदावरी खो-यातून जायकवाडीला नऊ टीएमसी पाणी जाणार असल्याने या तालुक्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. कृष्णा खो-यातील कुकडी प्रकल्पातून नगर, पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी गुरुवारपासून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. ते ३५ दिवस चालणार असल्याचे कुकडीचे अभियंता सुभाष कोळी यांनी सांगितले.
केटीवेअरचे अडथळे
पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार मुळा व प्रवरा नदीपात्रातील केटीवेअरमध्ये पाणी साठविण्यात आलेले आहेत. मुळा नदीपात्रात ७, तर प्रवरा नदीत १५ केटीवेअर आहेत़ नदीतून पाणी सोडायचे झाल्यास दोन्ही नदीपात्रातील केटीवेअरच्या फळ्या काढून घ्याव्या लागतील. तसेच पुन्हा त्यात पाणी साठवावे लागणार आहे.
मुळा, भंडारदरातून मोजून पाणी
मुळा धरणातून १.९० तर भंडारदरातून ३.८५ टीएमसी पाणी मोजून दिले जाणार आहे. जायकवाडी धरणात किती पाणी पोहोचले, यानुसार पाणी सोडले जाणार नाही. जलसंपत्ती नियमक प्राधिकरणाच्या आदेशानुसारच पाणी सोडण्यात येणार असून, शेकडो कि़मी़ अंतर कापून पाणी जायकवाडीत पोहोचणार आहे. या प्रवासात मोठ्याप्रमाणात पाणी वाया जाणार आहे.
फेरनियोजनाला फाटा
जायकवाडी धरणातील पाणी वापराचे फेरनियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. तसा आदेश जलसंपदा विभागाने १२ सप्टेंबर रोजी काढला असून, त्यानुसार जायकवाडी धरणात सात टीएमएसी पाणी जास्त आहे. त्यामुळे गोदावरी खो-यातून जायकवाडीत पाणी सोडण्याची गरज नाही, असे शेतकरी संघटनांचे म्हणने आहे.जलसंपत्ती नियामक मंडळाने नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याची अंमलबजावणी पाटबंधारे विभागाने सुरू केली असून, पुढील चार दिवसांत पाणी सोडण्यात येईल.
काय आहे समन्यायी कायदा
समन्यायी कायद्यानुसार जायकवाडी, मुळा, भंडारदरा, गंगापूर, गोदावरी- दारणा आणि पालखेड धरणांतील पाणी वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आलेले आहे.  पाणी वाटपाचे सहा टप्पे जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने ठरविलेले आहेत. त्यानुसार गोदावरी प्रकल्पातील धरणांतील पाण्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे

गोदावरी प्रकल्पातील वरचे धरण पूर्णक्षमतेने भरल्यानंतरच खालच्या जायकवाडी धरणात पाणी सोडावे, असा नियम आहे. या प्राधिकरणाला दुय्यम न्यायालयाचा दर्जा असल्याने न्यायालयाने यासंदर्भातील याचिका दाखल करून घेतली नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही याबाबत बोलत नसल्याने नगर जिल्ह्यातील शेतक-यांवर हा अन्याय आहे.-  शिवाजी जवरे, जिल्हा     संपर्कप्रमुख, शेतकरी संघटना

जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने जायकवाडी धरणातील पाणी वापराचे फेरनियोजन करण्याबाबत हारकती मागविल्या होत्या.  परंतु, त्यावर सुनावणी न घेता प्राधिकरणाने जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. मराठवाड्यातील दुष्काळाचे भीषण चित्र दाखवून शेतक-यांच्या नावाखाली बिअर कंपन्यांना पाणी मिळवून देण्याचा घाट घातला जात असून, त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांवर मोठा अन्याय झाला आहे.-  अनिल औताडे, श्रीरामपूर     तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना 


जायकवाडी धरणात फेरनियोजनानुसार साडेसहा टीएमसी पाणी जास्त आहे. सेच समन्यायी कायदा सर्वांनाच लागू असून, त्यानुसार पारनेर, संगमनेर आणि पाथर्डी तालुक्यातील लघु बंधा-यांत पाणी सोडण्याचे आदेश जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने द्यावेत. कारण या तालुक्यातील बंधारे कोरडे असून, भागात भीषण दुष्काळ आहे.   - विराज जगताप,  जिल्हा संघटक, शेतकरी संघटना

 

Web Title: Water pellet: TMC water in the town of Jaiwakwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.