कट मारल्याने दोन गटात तणाव
By admin | Published: July 7, 2016 11:13 PM2016-07-07T23:13:01+5:302016-07-07T23:25:46+5:30
जामखेड : स्कॉर्पिओ गाडीने कट मारल्याच्या कारणावरून अज्ञात दहा ते पंधरा जणांनी स्कॉर्पिओ चालक व त्याच्या सहकाऱ्यास लाठीकाठीने जबर मारहाण करून जखमी करीत गाडीची काच फोडली.
जामखेड : बीड रस्त्यालगतच्या सरकारी दवाखान्यासमोर स्कॉर्पिओ गाडीने कट मारल्याच्या कारणावरून अज्ञात दहा ते पंधरा जणांनी स्कॉर्पिओ चालक व त्याच्या सहकाऱ्यास लाठीकाठीने जबर मारहाण करून जखमी करीत गाडीची काच फोडली. मारहाण झालेले तिघे स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला.
उमेश निळकंठ नायकिंडे, भाऊसाहेब महादेव मुंढे, एकनाथ अश्रुबा मुंढे (सर्व राहणार पारसांगवी ता. भूम जि. उस्मानाबाद) हे जामखेडमध्ये शेतमालाची खरेदी करून स्कॉर्पिओ (क्रमांक एमएच ०२ बी झेड ३५५१)गाडीने बीड रस्त्यावरून गावी जाताना सरकारी दवाखान्यासमोर त्यांच्याकडून मोटारसायकल चालकाला कट बसला. स्कॉर्पिओ चालकाने कट मारल्याचा राग धरून दहा ते पंधरा जणांना बोलावून स्कॉर्पिओ चालक उमेश नायकिंडे व गाडीमध्ये बसलेले भाऊसाहेब मुंढे, एकनाथ मुंढे यांना लाठीकाठी, गज यांनी जबर मारहाण सुरू केली. मारहाणीच्या भीतीने वाहनचालकाने वाहन घेऊन पळ काढला.
खर्डा चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे हे वाहन तेथे थांबले असता तेथे मागून आलेल्या टोळक्याने वाहनचालकास व वाहनातील दोघांना लाथाबुक्कयाने व काठीने जबर मारहाण केली. काहींनी गाडीच्या काचा गज, काठ्याने फोडून वाहनाचे नुकसान केले. जबर मारहाणीमुळे हे तिघे गंभीर जखमी झाले. उमेश नायकिंडे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी अज्ञात दहा ते पंधरा मारहाण, शिवीगाळ, वाहनाची तोडफोड तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हा दाखल केला.
(तालुका प्रतिनिधी)
या घटनेनंतर जामखेड येथील काही कार्यकर्त्यांनी स्कॉर्पिओ वाहनातील मारहाणीत जखमी झालेले तिघे जण निघून चालले असता त्यांना खर्डा - भूम रस्त्यावरील शिवूरफाटा येथून परत जामखेड पोलीस ठाण्यात आणले. यावेळी दोन समाजातील लोकांचा जमाव जमला होता. मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी एका गटाने केली. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर जातीय तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी रात्री उशिरा अज्ञात दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला. त्यामुळे वातावरण निवळले.