नेत्यांची प्रतिष्ठा पणाला...
By admin | Published: January 27, 2015 12:19 PM2015-01-27T12:19:50+5:302015-01-27T12:19:50+5:30
जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी निवडणूक होत आहे. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार असून त्या त्या गटात स्थानिक नेते, तालुक्याचे आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी निवडणूक होत आहे. या ठिकाणी बुधवार दि.२८ ला मतदान होणार आहे. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार असून त्या त्या गटात स्थानिक नेते, तालुक्याचे आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यात प्रामुख्याने अकोल्यात ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, श्रीगोंद्यात माजी आमदार बबनराव पाचपुते आणि शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा समावेश आहे. पक्षीय पातळीवर या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सदस्य होते. यामुळे त्या जागा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे.
जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य बळ असणारा पक्ष राष्ट्रवादी होता. मात्र, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन गटातील राष्ट्रवादीचे सदस्य आमदार झालेले आहेत. अपवाद वगळता शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सदस्या मोनिका राजळे यांनी भाजपाच्या तिकिटावर राष्ट्रवादीच्या चंद्रशेखर घुले यांचा पराभव केला. आता या ठिकाणी होणार्या निवडणुकीत घुले यांना त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. त्याचा ते कसा लाभ उठवितात, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
या गटात सेनेचा उमेदवार तगडा आहे. मात्र, आतापर्यंत ते चार वेळा जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. या गटात चौरंगी लढत होणार असून शिवसेना-भाजपाने एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. यात राष्ट्रवादीला संधी साधण्यासाठी घुले कशी रणनीती आखतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अकोले तालुक्यात राजूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या पिचड पिता पुत्रा समोर सर्व विरोधक एकत्र आलेले आहे. विरोधकांची एकवटलेली ही राजकीय ताकद भेदण्यात पिचड यशस्वी होतात की नाही, हे निकालानंतर पहावयास मिळणार आहे. यापूर्वी अकोले तालुक्यात पिचड यांच्या विरोधात विरोधक एकत्र आलेले आहेत. मात्र, पिचड यांचा पारंपरिक मतदार असणारा आदिवासी पट्टा नेहमीच त्यांच्या मागे राहिलेला आहे. त्याची पुनरावृत्ती होते की नाही हे निवडणुकीत दिसणार आहे.
सर्वाधिक चुरस श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव जिल्हा परिषद गटात निर्माण झालेली आहे. या ठिकाणी पाचपुते यांच्यादृष्टीने या गटातील निवडणूक अस्तित्वाची आहे. या निमित्ताने तालुक्यातील राजकारणात आपले वर्चस्व असल्याचे दाखविता येणार आहे. तर जिल्हा परिषदेतून पहिल्या प्रयत्नात विधानसभेत उडी घेणार्या आ. राहुल जगताप यांना निवडणुकीत आपला गट राखण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
■ या तीन गटातील निवडणुकीचा कोणताच परिणाम जिल्हा परिषदेच्या सत्तेवर होणार नाही. मात्र, पक्षीय पातळीवर निवडणुकीला महत्त्व आले आहे. यामुळेच कोळगाव गटात भाजपाने ऐनवेळी उमेदवार बदलला. तशी अवस्था पाथर्डी तालुक्यात असून या ठिकाणी सेना-भाजपा आणि राष्ट्रवादीत चुरस आहे. अटीतटीच्या या लढाईत कोणता नेता बाजी मारतो हे २८ तारखेनंतर सिध्द होणार आहे.