नगरसेवकांना मुख्याधिकारी वैतागले
By admin | Published: June 27, 2014 11:29 PM2014-06-27T23:29:11+5:302014-06-28T01:11:39+5:30
कोपरगाव : शिवाजी कापरे यांनी विनंती करुन कोपरगावमधून बदली करुन घेतली़ त्यानंतर तब्बल चार महिने पालिकेला मुख्याधिकारी नव्हता़ श्याम गोसावी आले
कोपरगाव : शिवाजी कापरे यांनी विनंती करुन कोपरगावमधून बदली करुन घेतली़ त्यानंतर तब्बल चार महिने पालिकेला मुख्याधिकारी नव्हता़ श्याम गोसावी आले, परंतु तेही काही दिवसांतच नगरसेवकांच्या त्रासाला वैतागले़महिला सदस्यांच्या नातलगांकडूनही त्रास सुरू आहे़ ठेकेदार, नगरसेवक, महिला सदस्यांचे नातेवाईक यांच्याकडून मोठा त्रास होत असल्याचे पत्र मुख्याधिकारी गोसावी यांनी विभागीय आयुक्तांना धाडले आहे़ तर या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी गोसावी ६० दिवसांच्या रजेवर गेले आहेत़
कोपरगावचे मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी नाशिक विभागाचे आयुक्त तथा प्रादेशिक संचालकांना तीन पानी पत्र लिहिले आहे़ यात म्हटले आहे, की नगरसेवकांनी वृत्तपत्रातून केलेले आरोप निराधार आहेत़ विकासाच्या नावावर ७० ते ७५ हजार रुपयांच्या कामाचे तुकडे करुन त्यास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेणे, वार्षिक ठेकेदारामार्फत कार्यादेश देऊन कामे करण्यात आली़ वार्षिक ठेकेदाराच्या नावावर नगर परिषदेतील काही पदाधिकारीच कामे करु लागली आहेत़ २ वर्षामध्ये साडे तीन कोटी रुपयांची बिले काढली़ याशिवाय दीड कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत़ कामे करताना कुठल्याही प्रकारची गुणवत्ता न ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होऊनही शहरामध्ये विकासाची कामे झाल्याचे दिसून येत नाहीत़ तेव्हा साठ दिवसांची रजा मंजूर करावी, अशी विनंती गोसावी यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आयुक्तांना केली आहे़
पालिकेच्या कामात लुडबुड
महिला नगरसेवकांचे नातेवाईक हे काम याला द्या, त्याला द्या, असे सुचवितात़ त्यांच्या सांगण्यावरुन कामे देणे शक्य नाही़ ही मंडळी नगरसेवक नाही़ परंतु पालिकेच्या दैनंदिन कामकाजात लुडबुड करतात़ त्याचा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा त्रास आहे, असे मुख्याधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना धाडलेल्या पत्रात म्हटले आहे़
कोपरगाव शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे़ शासनाच्या विविध योजनांतून साडे तीन कोटीची कामे प्रस्तावित आहेत़ मुख्य रस्ता, पालखी रस्त्याच्या कामाचे तुकडे केल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कामास स्थगिती दिली़
कामाचे तुकडे, निविदा पूर्वीच झाली होती़ कामाचे एकत्रिकरण करुन एकच ई-निविदा काढण्यात आली़
निविदा उघडण्याची शिफारस सभागृहाला केली़ प्रमुख रस्त्यांच्या निविदांना स्विकृती न देता थेट कार्यारंभ आदेश देण्यासाठी धमकावले जात असल्याचे मुख्याधिकारी यांनी पत्रात नमूद केले आहे़
पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून काम करुन घेताना आतताईपणा करु नये़ चुकीचे किंवा नियमबाह्य काम करुन घेण्यासाठी दबाव आणू नये़ अधिकाऱ्यांनीही समतोल विकास होण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे, जेणे करुन नागरिकांना त्यांच्या कररूपी पैशाचा विनियोग झाल्यासारखे वाटेल़ कोपरगावचे दुर्दैव आहे, येथे प्रत्येक ठिकाणी राजकीय हस्तक्षेप होतो़ त्यामुळे चांगले अधिकारी कोपरगावात येण्याचे टाळतात़
-डॉ़ अजेय गर्जे,
नगरसेवक
पूर्वी ७५ हजारांच्या कामाचे तुकडे करता येत होते़ मजूर संस्थांना कामे देता येत होती़ मात्र पालिकेच्या सर्वसाधारण सभेत कामाचे तुकडे करायचे नाही, मजूर संस्थांना कामे द्यायची नाही, असा ठराव मंजूर करण्यात आला़ त्यामुळे नागरिकांची छोटी-छोटी कामे होत नाही़ त्यामुळे मुख्याधिकारी व नगरसेवकांमध्ये वाद होतात़ ते होणारच, याला नगरसेवकच जबाबदार आहेत़ कारण त्यांनीच सभागृहात विषय मंजूर करुन घेतला़
-नयनकुमार वाणी
सत्ताधारी नगरसेवक