विधानसभेसाठी चेहरे बदलणार ?
By Admin | Published: May 25, 2014 12:03 AM2014-05-25T00:03:36+5:302014-05-25T00:34:47+5:30
राष्ट्रवादी : पवारांनी दिले मुंबईच्या बैठकीत संकेत
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चिंतन करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आयोजित राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत नवीन तरूण चेहर्यांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे जिल्ह्यात अनेक मतदारसंघात विधानसभेचे उमेदवार बदलले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत नगर लोकसभा मतदारसंघाच्या अहवालावर पवार काय कारवाई करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत देशभर काँग्रेसविरोधी लाट होती. त्याचा फटका युपीएच्या घटक पक्षांना बसला, असा सूर पवार यांनी आळविला. मात्र, त्यानंतर लगेच पाच महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मात्र, यासाठी पाय जमिनीवर ठेवा, कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागावे. विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून नवीन तरूण चेहर्यांना संधी देण्यात येईल. नवीन नेतृत्व घडविणे आवश्यक आहे असे त्यांनी स्पष्ट केले. पवार यांच्या घोषणेमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे उमेदवार बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.कोपरगाव, पारनेर,शेवगाव- पाथर्डी, राहुरी, अकोले या ठिकाणी तरूण उमेदवारांची चर्चा सुरू असतांना पवार यांच्या संकेतामुळे या ठिकाणी इच्छुक असणार्यांना बळ मिळणार आहे. या बैठकीपूर्वी लोकसभा निवडणुकीबाबत जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, पालकमंत्री मधुकरराव पिचड आणि उमेदवार राजीव राजळे यांनी स्वतंत्रपणे आपला अहवाल पवार यांना सादर केलेला आहे. या अहवालावर पवार काय कारवाई करतात, याकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे लक्ष लागलेले आहे. (प्रतिनिधी)बैठकीत विधानसभा निवडणुका जिंकायच्याच असा ठराव पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. त्यास मंत्री मधुकरराव पिचड यांनी अनुमोदन दिले. मात्र, यावेळी पिचड यांनी नगरला मोदी लाटेच्या नावाखाली पक्ष विरोधी काम केलेले आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई होणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. पवार यांनी ते ऐकून घेतले.