पंधरा राज्यात होणार अण्णा हजारे केंद्र
By admin | Published: July 7, 2016 11:10 PM2016-07-07T23:10:05+5:302016-07-07T23:26:52+5:30
पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल, ग्रामसभेला अधिकार व निवडणूक सुधारणा या मागण्यांवर देशभर पुन्हा जनजागरण करण्याचा निर्णय इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेने घेतला
पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल, ग्रामसभेला अधिकार व निवडणूक सुधारणा या मागण्यांवर देशभर पुन्हा जनजागरण करण्याचा निर्णय इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेने घेतला आहे. त्यासाठी देशभरातील पंधरा राज्यात अण्णा हजारे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. गुरूवारी राळेगणसिद्धीत झालेल्या देशभरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हजारे यांनी रामलिला मैदान, जंतरमंतर येथे जनलोकपालसाठी आंदोलन केल्यानंतर देशभरात अण्णांच्या नावाचा महिमा सुरू होता. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ ही संघटना कार्यरत करून अनेक लोक जोडले होते. मात्र केजरीवाल राजकारणात गेल्यावर त्या संघटनेतील अनेक स्वयंसेवक दूर गेले. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ मध्ये काम करणाऱ्या मात्र राजकारणात नसलेल्या स्वयंसेवकांनी गुरूवारी राळेगणसिध्दीत बैठक घेतली. बैठकीस सुमारे पंधरा राज्यांचे प्रतिनिधी हजर होते.
हजारे यांची मागणी असलेल्या जनलोकपालची अंमलबजावणी, ग्रामसभेला कायद्याने अधिकार व निवडणुकांमध्ये पक्षाचे चिन्ह हद्दपार करणे यासाठी लढा देण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. तीन महिन्यांत यासाठी प्रत्येक राज्यात अण्णा हजारे केंद्र स्थापन करण्यात येणार असून त्यातून अण्णांच्या आंदोलनाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवून संघटन उभारले जाणार असल्याचे स्वयंसेवक सुनीललाल यांनी सांगितले. यावेळी संजय पठाडे, अमोल झेंडे, शाम पठाडे, कृष्णमूर्ती (तामिळनाडू), पंकजनाथ करणसिंह (पंजाब),चंद्रशेखरन (हैद्राबाद), विजयकुमार (रामपूर) आदी हजर होते.
(तालुका प्रतिनिधी)
अण्णांनी दिला तीन महिन्यांचा अवधी
४‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ च्या कार्यकर्त्यांनी बैठकीनंतर अण्णा हजारे यांची भेट घेतली. हजारे यांनी सर्व कार्यकर्त्यांना संघटना वाढीसाठी व जनजागरण करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला आहे. सगळीकडे संघटन उभारल्यानंतर अण्णा प्रत्येक राज्याचा दौरा करणार आहेत.