शारदीय नवरात्रौत्सव - 'दुसरी माळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 01:57 PM2018-10-11T13:57:31+5:302018-10-11T14:28:48+5:30

महादेवी शक्तीची उपासना हा सप्तशती पाठाचा मुख्य उद्देश आहे. शक्तीशिवाय आयुष्यात मनुष्य कशाचीच अपेक्षा करू शकत नाही.

shardhiy navaratrotsav second day of navratri | शारदीय नवरात्रौत्सव - 'दुसरी माळ'

शारदीय नवरात्रौत्सव - 'दुसरी माळ'

googlenewsNext

प्रा. अशोक झाल्टे शास्त्री

महादेवी शक्तीची उपासना हा सप्तशती पाठाचा मुख्य उद्देश आहे. शक्तीशिवाय आयुष्यात मनुष्य कशाचीच अपेक्षा करू शकत नाही. मनुष्यशक्ती, समूहशक्ती, राष्ट्रशक्ती, बलशक्ती, धनशक्ती, राजशक्ती, रूपशक्ती ही सर्व त्या एकाच शक्तीची विकसित रूपे आहेत. पतंजली ऋषींनी योगशास्त्राचे निरूपण करताना असे म्हटलेय की, ‘शरीर आद्यम्ऽखलू धर्म साधनम्।’ म्हणजे जीवनाचे सर्वधर्म साध्य करण्याचा सर्वात आधीचा धर्म म्हणजे शरीरस्वास्थ्य. हे स्वास्थ्य जसे शारीरिक, तसेच ते मानसिकही असावे लागते.

सप्तशती पाठाच्या प्रारंभी जे कवच नावाचे प्रकरण आलेले आहे ते या शरीराची मनाची शक्ती म्हणजेच आपले स्वास्थ्याचे संरक्षण करणार असा आहे. शरीराची सर्व प्रकारे, सर्वांर्गांनी, सर्व बाजूंनी रक्षा होणे म्हणजे आपली प्रतिकारशक्ती. आजच्या युगात सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध असतानादेखील त्यांचा उपयोग केवळ शारीरिक, मानसिक अस्वास्थ्यामुळे घेता येईनासा झाला आहे. प्रत्येक घटकाच्या प्रदूषणाबरोबरच आज वैचारिक प्रदूषणाची प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे त्या मानसिकतेचा शरीरावर परिणाम होऊन अनेक रोगांना आपण बळी पडत आहोत, शक्तिहीन होत आहोत. आमच्यात ही शक्ती पुन्हा संचारली पाहिजे. कारण कुणा अदृश्य शक्तीच्या विचारातूनही सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे. विज्ञानाचे युग निर्माण करणाऱ्या एझॅल न्यूटनने ‘त्याच्या प्रिन्सपिआ’ ग्रंथात असे म्हटलेले आहे की, ‘The most beautiful system of sun, plants and comets could only proceed from the counsel and dominion of an intelligent and powerful beings’ याचा थोडक्यात अर्थ असा की, सूर्य, ग्रह, धूमकेतू आदींनी निर्माण झालेली ही सुंदर रचना कुणा सर्वज्ञानी आणि सर्व शक्तिमान अशा अस्तित्वाची निर्मिती असली पाहिजे.

आपल्यात ही शक्ती निर्माण व्हावी, वाढावी, टिकावी आणि सुरक्षित राहावी, यासाठी दहा हजार वर्षांपूर्वी मार्कण्डेय ऋषींनी लिहिलेल्या पुराणातून या ‘सप्तशती’ ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. त्यात प्रारंभी आलेल्या कवचाचा आपण विचार करीत आहोत. कवच म्हणजे संरक्षण. पूर्वी लढाईसाठी जाणारे राजे, सेनापती व सैनिकही आपल्या शरीर रक्षणासाठी अंगावर जे चिखलत, शिरस्त्राणाचा वापर करीत असत, तर महाभारतातील कर्णाला कवचकुंडले होती. हे आपणास माहीतच आहे. सप्तशतीतल्या मंत्ररूपी कवचात आपली सर्वांगांनी, सर्वबाजूंनी सुरक्षा व्हावी याचा अत्यंत सूक्ष्मपणे विचार केलेला आहे. त्यासाठी त्या मूळ शक्तीला तिच्या विविध रूपांनी या शरीर व मनाला संरक्षण देण्याचे आवाहन किंवा प्रार्थना, विनंती केलेली आहे. कारण तिने जर संरक्षण दिले, तर जगातील कुठलीही दुष्ट किंवा वाईट शक्ती आपले नुकसान करू शकत नाही. एक शायर असा म्हणतो की, ‘फानूस बनके हवा जिसकी हिफाजत करें। वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करें।’ म्हणजे हवेनेच त्या दिव्याला दीपज्योतीला कवच बनून संरक्षण देण्याचे जर ठरविले असेल, तर तो दीप-दिवा विझूच शकत नाही. कारण देवानेच तो सतत तेवत राहावा, असे ठरविलेले असते. म्हणजेच दुस-या शब्दात ‘जाको राखे साईया मार सके नहीं कोय। बाल न बाका कर सके । जो जगबैरी होय। ’ अशा कवचाचा प्रारंभ ‘मार्कण्डेय उवाच’ इथपासून सुरू होतो. मार्कण्डेय ऋषी ब्रह्मा जो सृष्टीनिर्माता आहे त्याला म्हणतात की, या जगात मनुष्याचे सर्व प्रकारे रक्षण करणारे आणि आपण आतापर्यंत कोणासही न सांगितलेले गुप्त साधन हे पितामह मला सांगा. ब्रह्माला त्यांनी पितामह म्हटलेले आहे, तेही अगदी योग्यच आहे. कारण सृष्टीनिर्माता ब्रह्मा हा आपला पितामहच आहे आणि मग ‘ब्रह्मोवाच’पासून या कवचाची सुरुवात होते. हे कवच पठण केल्यावर, वाचल्यावर असे लक्षात येते की, महादेवी शक्तीच्या नऊ अवतारांची कल्पना किंवा माहिती ब्रह्मदेव करून देतात. त्या अवतारातून आम्हाला जे काही संरक्षण हवे आहे ते किती व्यापकतेने, सूक्ष्मतेने, प्रतिपादित केलेले आहे, याची प्रचिती येते. आजच्या आधुनिक काळात मनुष्य अत्यंत असुरक्षित झालेला आहे. सकाळी घरून निघालेला मनुष्य संध्याकाळी सुरक्षित घरी परत येईल की नाही, याची शाश्वती नाही. कबीर म्हणतात, ‘यह तन काचा कुंभ है। लिया फिरैता साथी। ढबका लागा फूट गया । कछू न आया हाती।’ म्हणजे कच्च्या मातीच्या घटाप्रमाणे हे शरीर आहे. त्याला धक्का लागल्यावर ते फुटून जाईल आणि जीवन संपून जाईल. आज नित्य होत असलेल्या अपघातांतून असाच धक्का अनेकांना बसून ते घट फुटून जात आहेत. त्यांची आज काहीच सुरक्षा नाही. हेल्मेट नावाचे शिरस्त्राण त्यांना वाचवू शकत नाही आणि म्हणून कधी नव्हे एवढी सुरक्षा कवचाची आवश्यकता आज निर्माण झालेली आहे. सप्तशतीतील हे मंत्ररूपी कवच अस्त्र रूपाने जर आमचे संरक्षण करणार असेल, तर त्याची आज आम्हाला अत्यंत गरज आहे. कशी ते पुढे पाहू.
 

Web Title: shardhiy navaratrotsav second day of navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.