यवतमाळ : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यामध्ये सातत्याने नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेकडून आंदोलन केले जाते. कालबद्ध आश्वासीत पदोन्नतीचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर उर्वरित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी बरेच दिवस प्रतिक्षा केली. प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषणाची सुरूवात केली आहे. जिल्हा परिषद समोर १७ मार्चपासून हे आंदोलन सुरू आहे. कर्मचारी संघटनेने बदली नियमातील अधिकाराचा वापर करून मुख्याधिकाऱ्यांनी अपंग, हृदयरोगी, कुमारिका, कर्करोगी अशा कर्मचाऱ्यांच्याच बदल्या कराव्या अशी मागणी केली आहे. नियमित पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढण्यापूर्वी त्यातील चुका दुरूस्त करण्यात आलेल्या नाही, कालबद्ध देयके सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात यावी, वेतनातून अंशदान निवृत्ती योजनेंतर्गत कपात करण्यात आली. याची कुठल्यास्तरावर माहिती नाही. अंशादान निवृत्ती वेतनाची रक्कम अद्यापही खात्यात जमा झालेली नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेल्या रकमा संबंधित संस्थेला पाठविण्यात आलेल्या नाही. २४ वर्षाचे कालबद्ध आश्वासित पदोन्नतीचा लाभ मिळाला नाही. समायोजन, अंशत: बदली प्रकरण, विशेष बाब बदली यांचीही प्रकरणे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागण्यांसाठी संघटनेचे सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, शुभांगी गावंडे, हेमलता वैद्य, छाया काळे, कल्पना शामसुखा, रामभाऊ भगत, मोरेश्वर गडलिंग, रमेश ठवरे, गणेश बिहाडे, जयदेव पाटील, पुरूषोत्तम शेणमारे, सरचिटणीस अनंत सावळे, कार्याध्यक्ष दिलीप गोल्हर, सचिव गणेश आंबिलकर, स्नेहल काकड, नरेंद्र वासनिक, पूनम खामणकर, धनंजय मेश्राम, संगीता किन्नाके, जगदीश शुक्ला, अनिल जयसिंगपुरे, अनिल खडसे, राजेश वाडी, राजेंद्र राऊत, रुपेश खापर्डे, किरण तुळजापुरे आदी सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण
By admin | Updated: March 20, 2015 01:59 IST