लग्नाला जाताना आजनकर कुटुंबावर आले विघ्नयवतमाळ : लग्नाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भल्या पहाटे आजनकर परिवार कारने यवतमाळातून उत्साहात रवाना झाला. दुपारचे २ वाजले तरी लग्नात कसे पोहोचले नाही, अशी शंका घरी असलेल्या लहान भावाच्या मनात आली. त्याने दोन्ही भावांच्या मोबाईलवर संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी भावाने दुचाकी काढून शोध सुरू केला. नातेवाईकही शोध मोहिमेत सहभागी झाले. अखेर जे होऊ नये तेच झाले. अमरावती जिल्ह्यातील जहागीरपूरजवळच्या नाल्याच्या पुरात कारसह चौघेही वाहून गेल्याचे पुढे आले. ही वार्ता कळताच वृद्ध पित्यासह सर्वच हादरले. सकाळी उत्साहात गेलेल्या चौघांचे कलेवर पाहण्याचीच वेळ रेणुकानगरावर आली. अमरावती जिल्ह्यातील जहागीरपूरजवळील नाल्याच्या पुराने पती-पत्नी, मुलगी आणि मोठा भाऊ असे एकाच परिवारातील चौघांना हिरावले. डॉ. संजय गोविंद आजनकर (४५), गजानन गोविंद आजनकर (४२), गायत्री गजानन आजनकर (३५), सानवी गजानन आजनकर (५) रा. रेणुकानगर वडगाव यवतमाळ अशी मृतांची नावे आहेत. आजनकर कुटुंबातील गजाननच्या चांदूररेल्वे येथील साळभावाच्या मुलाचे आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथे बुधवार ५ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लग्न होते. डॉ. संजयच्या अल्टो कारने (क्र. एम.एच-२९-एडी-४४९६) आजनकर परिवार वर्धमनेरीकडे सकाळी ७ वाजता घरुन निघाला. जहागीरपूर मार्गे जात असल्याचे घरी सांगितले. दोन ते अडीच तासांचेच अंतर असतानाही हे कुटुंब दुपारी २ वाजेपर्यंत लग्नस्थळी पोहोचलेच नाही. लग्नात सहभागी नातेवाईकांनी यवतमाळात आजनकर यांच्या घरी फोन लावला. तेव्हा ते सकाळी ७ वाजताच निघाल्याचे सांगितले. इकडे लहान भावाच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली. त्याने तिन्ही मोबाईलवर संपर्क केला. मात्र मोबाईल बंद येत होते. शेवटी दुचाकी काढून तो शोधात निघाला. जहागीरपूर मार्गे जाताना थांगपत्ता लागला नाही. लग्नातील पाहुणे मंडळीही वाहने घेऊन शोधात सहभागी झाले. बुधवारी रात्री ११ वाजेपर्यंत संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र उपयोग झाला नाही. गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास एक अल्टो कार अंजनसिंगी (ता. धामणगाव) येथील नाल्यात वाहून आल्याची माहिती मिळाली आणि शोधणाऱ्यांच्या हृदयात चर्र झाले. सर्वांनी अंजनसिंगीकडे धाव घेतली. पाहतात तो काय, एका कारमध्ये चौघेही निपचित पडल्याचे दिसले. घात झाल्याचे त्याच क्षणी लक्षात आले आणि सर्वांनी एकच हंबरडा फोडला. डॉ. संजय आजनकर हे यवतमाळच्या पशु चिकित्सालयात पशुधन पर्यवेक्षक होते. तर गजानन आजनकर हा एका खासगी शो-रुममध्ये नोकरी करीत होता. सेवानिवृत्त तलाठी गोविंद आजनकर यांची तिन्ही मुले एकत्र राहत होती. काही दिवसांपूर्वीच डॉ. संजयने रेणुकानगरात घर बांधले होते. मात्र या तिघाही भावांचा लळा कायम होता. प्रत्येक सुख-दु:खात ते सहभागी व्हायचे. डॉ. संजय आई-वडिलांसोबत राहत होता. तर दोन लहान भाऊ प्रगतीनगरातील वडिलोपार्जित घरात राहत होते. या घटनेने डॉ. संजय यांचा अपंग मुलगा श्रीपाद (१०), त्यांची मोठी मुलगी साक्षी (१५) आणि गजाननची मोठी मुलगी पौर्णिमा (८) या चिमुकल्यांचे मातृ-पित्रृ छत्र हरविले. दुर्दैव म्हणजे सहा महिन्यांपूर्वी डॉ. संजयच्या पत्नीचा मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. गुरुवारी सकाळी दोन मुले, सून आणि नातीचा मृत्यू झाल्याचे कळताच वृद्ध गोविंदराव आणि सुमन या दाम्पत्याच्या दु:खाला पारावार उरला नाही. परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. सोशल मीडियावरून ही घटना यवतमाळात वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येक जण या घटनेने हळहळत होता. दरम्यान सायंकाळी शवविच्छेदन केलेले प्रेत यवतमाळात दाखल झाले. दिवसभर आजनकर यांच्या घरी नातेवाईकांची गर्दी होती. पार्थिव आल्यानंतर परिसरातील शेकडो नागरिकांनी या घराकडे धाव घेतली. नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यालाही धारा लागल्या होत्या. रात्री वडगाव रोड स्थिती मोक्षधामात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. मायलेकीला एका चितेवर भडाग्नी दिली, तेव्हा वातावरण सुन्न झाले होते. (कार्यालय प्रतिनिधी)
चौघांच्या मृत्यूने यवतमाळ हादरले
By admin | Updated: August 7, 2015 02:14 IST