शेतकऱ्यांना दिलासा : अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मन:स्तापाचे प्रकरण विडूळ : येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच वरिष्ठ व्यवस्थापनाने दखल घेत शनिवारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच शेतकऱ्यांची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेत गत १५ दिवसांपासून गोंधळ सुरू होता. बँकेचे दोनही मुख्य अधिकारी सुटीवर गेल्याने शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण रखडले होते. कर्ज पुनर्गठण होणार की नाही अशी अवस्था निर्माण झाली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत तत्काळ शनिवारी या ठिकाणी पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे येथील शाखेत एक लाख रुपयांचा विड्रॉल करण्यासाठी पाच स्लीप भराव्या लागत होत्या. मात्र आता अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने यातूनही ग्राहकांची सुटका होणार आहे. यवतमाळ येथील सेंट्रल बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कर्मचारी पाठविल्याने शेतकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे. लवकरच पीक कर्ज आणि कर्ज पुनर्गठण प्रकरण निस्तारले जाईल. (वार्ताहर)
विडूळ सेंट्रल बँकेत कर्मचारी नियुक्त
By admin | Updated: June 28, 2015 00:10 IST