राळेगाव : वीज पुरवठा खंडित काळात कामात व्यत्यय येवू नये यासाठी येथे बसविण्यात आलेली पवनचक्की फ्लॉप शो ठरली आहे. गेली दोन महिन्यांपासून तहसील कार्यालयाच्या आवारात असलेली ही वस्तू केवळ देखावा ठरत आहे. तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेण्यात आली नाही. सध्या निवडणुकीचे कामकाज सुरू आहे. मात्र वीज पुरवठा खंडित झाल्यास त्यात व्यत्यय येत आहे. लाखो रुपये खर्च करून येथील तहसील कार्यालयात पवनऊर्जेवर चालणारे टॉवर उभे करण्यात आले. याद्वारे विद्युत निर्मितीही सुरू झाली. काही दिवस या कार्यालयाला वीज मिळालीही. मात्र गेली दोन महिन्यांपासून हा पवनऊर्जा संच अचानक बंद पडला. ही बाब तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी संबंधित विभागाला कळविली. परंतु अजूनही हा संच दुरुस्त करण्यात आलेला नाही. येथील तहसील कार्यालयात ७७ राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे मुख्यालय आहे. कळंब, बाभूळगाव, राळेगाव येथील कर्मचारी, उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी या ठिकाणाहून काम सांभाळत आहे. मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने कामाच्या गतीला ब्रेक लागला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्याय म्हणून असलेला ऊर्जा संचही बंद आहे. त्यामुळे साधे लाईटसुद्धा सुरू होत नाही. मेणबत्तीच्या उजेडात काम भागवावे लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी पवनऊर्जेवर वीज निर्मितीचा प्रयोग सुरू झाल्याने नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. आता शासकीय कार्यालयांच्या कामकाजात विजेअभावी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, अशी आशा त्यांना होती. मात्र अवघ्या काही दिवसातच त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. पवनऊर्जा संच दोन महिन्यातच बंद पडला. त्यातून कुठलीही वीज निर्मिती होत नाही. केवळ दोन महिन्यात हा संच कसा बंद झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्नही कुणाकडून झाला नाही. मात्र यासाठी झालेला लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ ठरल्याचे चित्र सध्या तरी आहे. (प्रतिनिधी)
पवनचक्की ठरली ‘फ्लॉप शो’
By admin | Updated: October 7, 2014 23:42 IST