लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी जून महिन्यात सर्वाधिक पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. यामुळे शेतकरी बिनधास्त झाले होते. प्रत्यक्षात जून महिन्यात प्रारंभी जोरदार पाऊस बरसला. धडाक्याच्या या पावसाने शेतकऱ्यांना बेचैन केले आणि शेतकरी धुमधडाक्यात पेरणीलाही लागला. आता पावसाने पाठ फिरविली आहे. यामुळे झालेल्या पेरण्याही अडचणीत सापडल्या आहे. मृगनक्षत्रापासून पावसाला सुरुवात होते. यावर्षी मृगनक्षत्रातच चांगला पाऊस बरसला. गाढवाच्या नक्षत्रात बरसलेला पाऊस कोल्ह्याच्या नक्षत्रात नावाप्रमाणेच बरसत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. हवामान विभाग दरवर्षी पावसाचा अंदाज व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्यावर हा हवामानाचा अंदाज व्यक्त होणेच बंद होऊन जाते. अनेक वेळा हवामानाचा अंदाज केवळ पोकळ ठरला आहे. याचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणासोबतच हवामान विभागाचाही लहरीपणा पाहायला मिळत आहे. यातून शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहे. पावसाच्या खंडाने शेतकरी हादरले आहे.