लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे माणसे घरात बंदिस्त झाली, पण निसर्गाला पायबंद घालणार? उन्हाळ्यात तळपणारा सूर्य आणि कोरोनाचा कहर यामुळे अवघे वातावरणच मरगळलेले होते. माणसांचा वावर अजूनही अडखळलेला असला तरी निसर्गाने मात्र आपला अवखळ बदल सोडलेला नाही. पाऊस आला, गारवा वाढला, शेती हिरवी झाली, ओहोळ वाहते झाले अन् डोंगररांगा बहरल्या... पण दुर्दैवं माणसांच्या पर्यटनावर मात्र निर्बंध कायम आहेत.यवतमाळ शहर म्हणजे हिरव्या डोंगरांनी अलगद उचलून धरलेला पाचूच. सध्या या हिरवाईवर आषाढाचा पाऊस कोसळतोय. जंगलातले छोटे-छोटे ओहोळही धवल अमृत घेऊन धावू लागले आहेत. जामवाडी परिसरातील टेकड्या, शेतशिवार तर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कोरोना, त्यामुळे आलेला लॉकडाऊन यात माणसांना ही निसर्गश्रीमंती पाहण्यासाठी प्रत्यक्ष फिरणे शक्य नाही. किंबहुना माणसांचा वावर कमी झाल्याने निसर्गदूत पाखरांनाही खऱ्या अर्थाने मोकळे रान मिळाले आहे. काही छायाचित्रकांनी सृष्टीच्या सौंदर्याचे जिवंत प्रतिरूप सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
आषाढाला पाणकळा.. सृष्टी लावण्याचा मळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST