यवतमाळ : कापड धुलाई मशीन बंद पडल्याने येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय माहविद्यालयात शस्त्रक्रियेचा प्रश्न निर्माण झाला आहे. निर्जंतुकीकरण केलेले कापड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना वेटिंगवर राहावे लागते. रुग्णालय प्रशासनाला मात्र कोणतेच सोयरसुतक दिसत नाही. रुग्णालयातील वैद्यकीय सेवा ही चांगल्या दर्जाची असली तरी, त्याला पूरक वातावरण येथे नाही. रुग्णांवर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया नंतरही संसर्गाचा धोका कायम असतो. शस्त्रक्रियेसाठी रुग्ण आणि डॉक्टर तसेच इतर सहायक कर्मचारी यांना निर्जंतूकीकरण केलेले कापड लागतात. मात्र गत एक महिन्यांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. निर्जंतुकीकरणासाठी असलेले कापड धुलाई यंत्रच बंद पडले आहे. त्यामुळे परंपरागत पध्दतीने जितके कपडे धुणे शक्य होते, तितकेच कापड मिळत आहेत. रुग्णालयात दहा शस्त्रक्रिया गृह आहेत. त्यापैकी आठ ठिकाणी शस्त्रक्रिया केल्या जातात. याशिवाय दररोज किमान ५० ते ६० प्रसूती होते. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या कापडांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेकदा कापड नसल्याने रुग्णाना शस्त्रक्रियेसाठी वेटिंगवर राहावे लागते. शल्यचिकित्सा विभाग, नाक-कान-घसा, अस्थिव्यंगोपचार विभाग, स्त्रीरोग विभागात सातत्याने शस्त्रक्रिया होतात. कापडच वेळेत मिळत नसल्याने या विभागांच्या कामाची गती मंदावली आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. सोयी सुविधा देण्याऐवजी त्या बंद कशा करता येईल यासाठीच रुग्णालय प्रशासनाची धडपड सुरू असल्याचे दिसून येते. रुग्णालयाच्या आवारात एका बँकेने ना नफा ना तोटा या तत्वावर शुध्द पाण्यासाठी आरओ प्लांट लावला होता. मात्र यात पाण्याचा अपव्यय होत असल्याचा जावाईशोध लावून प्लांट रुग्णालय प्रशासनाने बंद केला. आता रुग्णांना पिण्यासाठी शुध्द पाणीच उपलब्ध नाही. स्वच्छतेच्या नावावरसुध्दा येथे केवळ देखावा निर्माण केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
धुलाई यंत्र बंदने शस्त्रक्रिया रखडल्या ‘मेडिकल’ : निर्जंतूक कापडांची कमतरता
By admin | Updated: February 25, 2016 02:22 IST