उपाययोजना शून्य : मुले शिक्षणापासून वंचितवणी : शासन भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध योजना आखते. मात्र तरीही भटक्यांची भटकंती अद्याप सुरूच आहे. वितभर पोटाची टिचभर खळगी भरण्याकरिता त्यांना अद्याप भटकंती करावी लागत आहे. भटक्या जमातीची अनेक कुटुंबे तालुक्यात वास्तव्याला आहेत. वणी शहरताही दीपक टॉकिज परिसरात हे बांधव दिसून येतात. त्यापैकी अनेक जण गेल्या कित्येक वर्षांपासून तेथेच ठिय्या मांडून आहेत. हाताला काम मिळत असल्याने ते तेथे ठाण मांडून बसले आहे. मात्र इतर अनेक भटके बांधव सदैव भटकत आहेत. ते विकासापासून कोसो दूर आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या भटक्या जमातीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करते. त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही. त्यांना राहायला साधी जागा मिळत नाही. परिणामी कोणत्याही गावानजीक रस्त्याच्या कडेला किंवा गावातील पडिक जागेवर तंबू, पाल ठोकून ते उन्हा-तान्हात, पावसात वास्तव्य करतात. त्याच पालात चिलीपाली बागडतात. त्यांना शाळेचे तोंडी बघता येत नाही. या गावातून त्या गावात सतत भटकंती सुरू असल्याने त्यांना शिक्षण मिळत नाही. परिणामी अनेक चिमुरडे हातात ‘घण’ लोखंडाचेच चणे फोडतात. या घणाचे घाव घातल्यानेच त्यांच्यासह कुटुंबाची पोटाची आग शांत होण्यास मदत मिळते. ही मुले शिक्षणापासून अद्याप दूर आहे. सतत भटकंती सुरू असल्याने त्यांच्याजवळ कायम रहिवासी असल्याच कुठलाही पुरावा नसतो. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेतानाही अडचण निर्माण होते. कागदपत्रांअभावी त्यांना योजनांचा लाभ मिळणे दुरापास्त होते. तालुक्यात अनेक गावांमध्ये भटका समाज वास्तव्यास आहे़ मात्र त्यांच्या चिमुकल्यांच्या शिक्षणाची पंचाईत होत आहे. लिहिता, वाचता येत नसल्याने त्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभही घेणे आता प्रचंड कठीण झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
भटक्यांची भटकंती अद्याप सुरूच
By admin | Updated: June 1, 2015 00:16 IST