उमरखेड (कुपटी) : ग्रामीण जनता आणि प्रशासनाचा दुवा असलेल्या ग्रामसेवकाची उमरखेड तालुक्यात अनेक पदे रिक्त आहे. सध्या तर १२५ गावांच्या ९२ ग्रामपंचायतीसाठी केवळ ५६ ग्रामसेवक आहे. त्यातही अर्धेअधिक ग्रामसेवक शहराच्या ठिकाणी वास्तव्यास असतात. त्यामुळे विकासाचे तीन-तेरा वाजले असून अनेक गावात महिनोंमहिने ग्रामसेवकाचे दर्शनच होत नाही. ग्रामीण भागात शासनाच्या योजना पोहोचविणे आणि जनतेच्या समस्या दूर करणे ही महत्वाची जबाबदारी ग्रामसेवकांवर आहे. मात्र उमरखेड तालुक्यात आता ग्रामसेवकच समस्या होऊ पाहत आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. उमरखेड तालुक्यात अनेक गावात ग्रामसेवकांचे दर्शनच होत नाही. त्यामुळे शासनाच्या योजना माहीत होत नाही. उलट मजुरी पाडून शहराच्या ठिकाणी ग्रामसेवकाला शोधावे लागते. अनेक ग्रामसेवक १५ दिवसांपासून किंवा आठवड्यातून एकदा आपल्या कर्तव्याच्या गावी दिसतात. उर्वरित सहा दिवस घरी आराम करतात. पंचायत समितीचे दुर्लक्षित धोरण याला कारणीभूत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रकार बंद झाला नाही. त्यामुळे आता नागरिकांनी तक्रारी करणेही सोडून दिले आहे. एखाद्या गावात गैरप्रकार उघडकीस आल्यास संबंधित ग्रामसेवक वरिष्ठांच्या संगनमताने त्वरित ग्रामपंचायत बदलून घेतो. या प्रकाराला आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याला आधीच चहा-पाणी झालेले असते. ग्रामीण भागातील विकासाला बळकटी देणारी संस्था असली तरी सध्या ग्रामसेवकच दिसत नाही. सध्या पावसाळा सुरू आहे. अनेक गावात साथीचे आजार पसरले आहे. परंतु ग्रामसेवकांना त्याचे काही देणे-घेणे दिसत नाही. गावाच्या स्वच्छतेकडेही ग्रामसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे. कुणी विचारणा केली तर आम्ही करणार तरी काय आमच्याकडे तीन-तीन ग्रामपंचायतीचा कारभार असल्याचे सांगतात. काही ग्रामसेवकांवर कामाचा बोझा असला तरी इतर ग्रामसेवक मात्र तीनही गावातील नागरिकांना वेगवेगळी कारणे सांगतात आणि सदर ग्रामसेवक तीनही गावाऐवजी घरीच आराम करीत असतो. या सर्व प्रकारात सर्वसामान्य जनता मात्र भरडली जात आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
गावे १२५, ग्रामसेवक ५६
By admin | Updated: September 11, 2014 00:00 IST